Skip to main content

भोग आणि ईश्वर १८३

 भोग आणि ईश्वर  १८३

या सर्व तीन प्रकारच्या लहरींमध्ये, म्हणजे सकारात्मक, नकारात्मक व न्यूट्रल अर्थात द्विधा मनःस्थितीत असणारे, या प्रकारात अजून एक चवथा प्रकार हल्ली प्रकर्षाने पाहायला मिळतो. खरतर आपल्या विश्वास अविश्वास या आतापर्यंतच्या सर्व प्रकारात व भोग आणि ईश्वराच्या सर्व लेखांमध्ये त्यावर कधीही मी, भाष्य केलं नाही किंवा आपण कधीही त्याबद्दल चर्चासुद्धा केली नाही. 

वास्तविक हे लेख आणि एकूणच अध्यात्मिक जगतात, यावर फार कधी चर्चा घडत नाही किंवा केली जात नाही. कारण हे सर्व विचारधन फक्त विश्वास व श्रद्धा असलेल्या लोकांचं विश्व आहे. अर्थातच त्यामुळे या विश्वाबाहेरील व्यक्ती, वृत्ती, प्रवृत्ती अथवा स्वभावविशेष यावर चर्चा घडत नाही. कारण ज्या गावाला जायचं नाही त्याचा रस्ता का विचारायचा, इतका सोप्पा तर्क आहे हा. 

पण तरीही, व्यक्तींचा एक प्रकार वा मानवी स्वभावाची एक बाजू म्हणून विचार करायला हरकत नाही, या एकमेव उद्देशाने नास्तिक या स्वभावगुणाची आपण चर्चा करूया. मुळात यांचा जर देव या संज्ञेवर विश्वास नाहीच, तर मग चर्चा का. तर आपल्याला एक माहिती असावी म्हणून आपण आज यावर चर्चा करू. मुळात नास्तिक हा एक स्वभावाचा भाग आहे. 

दुसरं असं की, सरसकट विश्वास नाही म्हणणारे नास्तिक लोक, या गटामध्ये अनेकांना ओढू इच्छितात, असा माझा अनुभव आहे. आस्तिक माणूस सहसा मी देव मानतो, माझी श्रद्धा, धारणा आणि विश्वास आहे म्हणून सर्वांनी विश्वास ठेवावाच असं म्हणणार नाही. तो आपल्यापुरतं पाहून व आपल्या आवडीप्रमाणे श्रवण, वाचन, चिंतन, नामस्मरण इत्यादी मार्ग अवलंबेल. पण सहसा विश्वास नसलेल्या व्यक्तीला त्यात ओढण्याचा प्रयत्न, जाणूनबुजून करणार नाही. 

पण माझा अनुभव असा आहे की, नास्तिक असलेल्या माणसाला, माझा विश्वास नाही, तुम्ही सिद्ध करा, अन्यथा मान्य करा की, देव नाही, यावर चर्चा व वाद घालण्यात भयंकर स्वारस्य असतं, अर्थात विशेष रुची असते. जणूकाही त्याच्यावर ही जबाबदारी आहे की, जास्तीतजास्त लोक नास्तिक होतील हे पहा. मागे एकदा मी लोकल ट्रेनने ऑफिस मधून येत असताना, एक धार्मिक पुस्तक अथवा श्लोक वाचत होतो.

शेजारी एक नास्तिक बसला होता. बराच वेळ मी गप्पपणे वाचत असलेलं पाहून, त्याला अस्वस्थ झालं. खूप वेळ वाट बघून त्याने मला विचारलंच. तुमचा देवावर विश्वास आहे का. म्हटलं अनादी काळापासून जग आहे, अनंतापर्यंत असणार आहे. त्यातील फक्त सत्तर ऐंशी वर्ष आपण आहोत. आपल्या  आधी व आपल्या पश्चात हा सर्व गाडा किंवा जगराहाटी अव्याहतपणे सुरू आहे.  म्हणजे आपण ते नक्कीच चालवत नाही. म्हणजेच कोणीतरी ते चालवतं, हे नक्की. 

मग त्या संकल्पनेला जाणकारांनी एक संज्ञा दिली, अर्थात नाम दिलं की, देव. संकल्पना रुजली आणि लोकं त्यावर श्रद्धा विश्वास ठेवून मार्गक्रमण करतात. हे सकारात्मक वाटतं आणि या श्रद्धा व विश्वास यामुळे मानसिक समाधान शांती व शारीरिक सुदृढता येते. रक्तप्रवाह सुरळीत होतो, रक्तदाब नियंत्रणात येतो. इतकं सगळं सकारात्मक फक्त एका श्रद्धेपोटी घडत असेल, तर मग त्या संज्ञेला नाम काहीही द्या, लाभ होतो,हानी नक्कीच होत नाही.

शिवाय योग, ध्यानधारणा, चंचल मनाला शांत करून, मनाची ऊर्जा, शक्ती नियंत्रित करून, माणसाला, त्याच्या क्षमतेचा पूर्ण उपयोग करायची संधी देतात. थोडक्यात काय तर चंचल मन शांत करून, त्याला योग्य मार्ग दाखवून, त्याला त्याच्या शक्तीचा परिचय देऊन मग कार्यान्वित करणं हे खूप मोठं मानसशास्त्र आहे. मनाला नियंत्रित करून त्याद्वारे, शरीरातील सर्व नसा, धमन्या, इंद्रिये, अवयव इत्यादी पूर्ण कार्यरत करून अशक्य गोष्टी शक्य करून दाखवता येतात.

हे पूर्ण शास्त्रीय आधारावर  आहे, हे आता सिद्ध आहे. मानसशास्त्र तर असं सांगतं की, योग, संगीत, ध्यान, नामस्मरण सकारात्मक व मन प्रफुल्लित करणारं, मनाला उत्साह उमेद देणारं जे काही घडेल वा घडवता येईल, त्या सर्व सकारात्मक मार्गांचा अवलंब जरूर करावा. या सर्व गोष्टी जगण्याचा आनंद तर वाढवतातच, पण आयुष्यसुद्धा वाढून माणूस सशक्त व सुदृढ जीवन जगू शकतो. 

माझं त्या सद्गृहस्थाना सांगणं आणि विषय दोन्ही अपूर्ण आहे, त्यामुळे उद्या यावर चर्चा करूया. आपण मात्र पूर्ण श्रद्धेने नाम घेत राहू. संकटं येतात, वादळं  घडवून जातात, पण श्रद्धा दृढ असेल तर, महापूरसुद्धा आपण सहजी पार करू शकतो. म्हणून श्रद्धा हलू देऊ नका. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत आणि श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ हे लवकरच प्रकाशित होणारं, पुस्तक ज्यांना  हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर मेसेज करून  वा फोन करून संपर्क करावा आणि नोंदणी करून घ्यावी . 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०१/०६/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...