Skip to main content

भोग आणि ईश्वर १८८

भोग आणि ईश्वर  १८८

सत्ययुगापासून या भूमीची ही परंपरा आहे की दारात याचक म्हणून कोणी आलं तर,  त्याला विन्मुख पाठवता कामा नये. या तत्वाचे अनेक दुरुपयोग सुद्धा केले गेले. त्या विषयात न पडता, याचक या शब्दाच्या विवेचनाकडे आपण वळूया. याचक म्हणजे मागणारा,काही मिळावं यासाठी, ज्यांच्याकडे ते आहे, त्यांच्याकडे जाऊन, ती गोष्ट, वस्तू, प्राप्त व्हावी यासाठी प्रार्थना, अर्चना करणे म्हणजे याचना करणे. 

एखादा भुकेला भिक्षेची, अन्नाची प्राप्ती करण्यासाठी, ज्याच्या घरी ते आहे, त्याच्या घरी जाऊन, त्या अन्नाची याचना करतो. एखादा निर्धन, धनवानाकडे धनाची याचना करतो.अज्ञानी माणूस ज्ञानी माणसाकडे ज्ञानाची याचना करतो. म्हणजेच जे नाही आणि ते गरजेचं आहे, ते मागणं म्हणजे याचना करणं. 

मुळात याचक बनून याचना त्याच गोष्टीची केली जाते, ज्या गोष्टीची कमतरता आहे. म्हणजेच खरा याचक तोच ज्याला आपल्याकडे नसलेली गोष्ट हवी आहे आणि त्या गोष्टीने समृद्ध असलेला दाता अस्तित्वात  आहे. त्याच प्रमाणे सदर गोष्टींच्या बदल्यात दाता कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवत नाही. म्हणजेच दाता याचकाला निरपेक्षपणे सदर गोष्ट पुरवतो. 

म्हणजेच एखादी गोष्ट करताना त्या बदल्यात जेंव्हा काही घेतलं जातं नाही आणि दिलेली गोष्ट सदर गोष्टीची  मागणी करणाऱ्याच्या गरजेसाठी दिली जाते, त्यावेळी देणारा दाता, घेणारा  याचक आणि मागणी करणं याला याचना असं संबोधता येईल. हा शब्द किंवा या संज्ञा फक्त भौतिक जगासाठी न वापरता त्या बऱ्याच गोष्टीसाठी वापरता येतात किंवा वापरल्या जातात. तरीही मुळात जीवनाच्या अंतिम ध्येयासाठी, जी मागणी, अर्चना, प्रार्थना केली जाते ती सर्वोत्तम याचना होय.

ज्ञानी माणसाकडून ज्ञानाची याचना केली जाते. कारण ज्ञान ही अमूल्य गोष्ट आहे, जी जीवन उन्नत्तिकरता अत्यंत महत्वाची आहे आणि त्याच्या प्राप्तीने याचक जन्मजन्मां तरीच्या बंधनातून मुक्त होऊ शकणार असतो. साधक वा शिष्य आपल्या गुरूंकडे, त्या अमृत वचनांची वा ज्ञानाची याचना करतो, ज्याच्या योगाने वा प्राप्त होण्याने, मुक्तीचा, मोक्षाचा मार्ग प्राप्त होतो.

म्हणजेच विद्यार्थ्याने शिक्षकाकडे अखंड ज्ञानप्राप्तीसाठी याचक बनून अथवा त्या भूमिकेतून गेल्यास, प्राप्त ज्ञानाचा सद् उपयोग विद्यार्थ्याला होऊ शकेल.  त्याच प्रमाणे शिष्याने सद्गुरूंकडे आपल्या मुक्ततेसाठी, जीवनाच्या अंतिम ज्ञानासाठी, मोक्ष व मुक्तीच्या मार्गा साठी याचक बनून जाणे आणि याचक या जाणिवेने त्यांना प्रार्थना, याचना करणे किती गरजेचं आहे, हे लक्षात येईल. 

कारण जे नाही ते देणं, हे दाता तेंव्हाच करेल, ज्यावेळी याचक म्हणूनच आपण गुरुचरणी जाऊ आणि गुरूंना आपल्या याचक असण्याची, रिक्त असण्याची खात्री आणि सदर ज्ञानासाठी पात्र आहोत हे भाव पटवून देऊ. त्यामुळे सद्गुरूंकडून कृपेची अर्चना व अपेक्षा करताना आपण त्या कृपाप्राप्तीसाठी योग्य याचक आहोत आणि या कारणाने सद्गुरूंनी आपल्यावर कृपेची बरसात करावी आणि आपले जन्म जन्मांतर कृतकृत्य करावे, हे सद्गुरूंना मनोमन पटवून द्यावे लागते. 

कारण एका उत्तम दात्याकडे जे असायला हवे ते सद्गुरूंकडे असले, तरीही एका उत्तम याचकाकडे ते प्राप्त करण्याची पात्रता, याचकाच्या अंगी असलेली विनम्रता, याचनेसाठी योग्य भूमिका आणि सर्वात शेवटी सद्गुरूकृपेसाठी शरणागती असावी लागते. या गोष्टी ज्या साधकाकडे आहेत, त्याच्या अल्प साधनेलासुद्धा प्रतिसाद देण्याचं कार्य सद्गुरू करतात. 

म्हणून सदर पात्रता अंगी बाणवण्यासाठी आपण उत्तम याचक व्हावं, सद्गुरुकृपेचा ओघ अवश्य तुमच्यापर्यंत येईल हे नक्कीच. याचनेचं मर्म हे उत्तम याचक होण्यात आहे. म्हणून सद्गुरूंकडे मागताना याचकाच्या भूमिकेतून मागा. म्हणजे जाणवेल की, सद्गुरूंसारखा दाता त्रिलोकात सापडणार नाही. कृपावंत सद्गुरू याचनेसाठी आलेल्या याचकाना, कधीही विन्मुख पाठवणार नाहीत. म्हणून याचनेचे मर्म जाण, याचकाचा धर्म जाण, याचकाचे कर्म जाण सद्गुरुकृपा अवश्य होईल. 

आज इथेच थांबुया, उद्या पुन्हा बघूया पुढील विवेचन. पण नाम सोडू नका साधनेचा आणि याचनेचा तो प्राण आहे. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत आणि श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ हे लवकरच प्रकाशित होणारं, पुस्तक ज्यांना  हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर मेसेज करून  वा फोन करून संपर्क करावा आणि नोंदणी करून घ्यावी . 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०६/०६/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...