Skip to main content

अथर्वशीर्ष भावार्थ भाग ९

अथर्वशीर्ष भावार्थ भाग ९

त्वं चत्वारिवाक्पदानि।

श्रीगणपती अथर्वशीर्षातील पाचव्या श्लोकातील हा एक भाग आहे. ज्याचा भावार्थ आज जाणून घेऊया. मुळातच श्रीगणेश हा सर्व भाषा, वाङ्मय, साहित्य, संस्कृती, कला, ज्ञान, विज्ञान या सर्वांचा कर्ता आणि धर्ता असल्यामुळे, सर्वांचाच उगम त्यापासून अर्थातच श्रीगणेशापासून होतो. 

म्हणजेच आपलं लहानपणापासून बोलायला शिकणं, शब्द, त्यानंतर वाक्य, उच्चारण, त्यांचे अर्थ जाणून संवाद साधणं, प्रश्न समजून उत्तरं देणं, शब्द त्यांचे अर्थ, मतितार्थ, गर्भितार्थ, गुह्यर्थ, गहनार्थ इत्यादी जाणणं, ते जाणून मस्तिष्क मन , हृदय आणि सर्वात शेवटी अंतरात्मा, यामध्ये ते झिरपून, आत्म्याद्वारे, अंततः परम आत्मा त्याचं गुह्य जाणणं आणि ते जाणून त्या परम ज्ञानाचा अर्थ लक्षात येऊन जीवनात संतोष पावणं हे सर्व श्रीगणेशामुळे साध्य होतं.

म्हणजेच जर श्रीगणेशाची कृपा लाभली तर, या सर्व गोष्टी साध्य होऊन, जन्माचं सार्थक होतं. हे सर्व श्रीगणेशामुळे साध्य होतं, याचं कारण हे सर्व मूळ श्रीगणेशापासून उत्पन्न झालं. विधात्याने सर्व सृष्टी घडवताना, तर्कसंगत पणे प्रत्येकाला विशिष्ट शक्तींकडून ऊर्जा, चेतना प्राप्त करून, या विश्वासह विश्वातील प्रत्येक जीव, निर्माण केला. 

जिज्ञासा, ज्ञान, ज्ञानाची आस, जाणिवा, गुह्य व मर्म जाणण्याची इच्छा, जीवनाच्या वाटचालीत पशु आणि मानव यातील अंतर स्पष्ट करणारं मन, विचार, मेंदूची आणि मनाची सांगड, जाणल्यानंतर ते प्रकट करून इतरांना सांगून त्या ज्ञानाला विस्तारित करणं, म्हणजेच समांतर पातळीवर आपला आणि आपल्यासम इतरांचा विकास करणं आणि ऊर्ध्व पातळीवर आपण वर चढत जाणं आणि अधो पातळीवरून इतरेजनांना वर नेणं हे सर्व श्रीगणेशाची कृपा असल्यावरच शक्य आहे. 

या सर्व ज्ञानविस्तारात धर्म अर्थात हे सर्व करण्याचं कर्तव्य म्हणून मिळालेली वाणी हीदेखील श्रीगणेशा पासून उत्पन्न झाली आहे. वाणी आहे त्यामुळे संवाद आहे. पुन्हा या वाणीची शुद्धता, सात्विकता राहावी आणि संवादाची गरज, ही अनेक कारणांसह मुख्यतः धर्म विस्तार, ज्ञानविस्तार, ज्ञानवृद्धी, संवादातून एकत्रीकरण आणि त्यातून समाज व वैश्विक अनुभूती या सर्व गोष्टी साध्य होण्यासाठी खरतर वाणीची निर्मिती श्रीगणेशाने स्वतःपासून केली.

अगदी आत्म्याचा उद्धार हासुद्धा चार वणींचा प्रवास जसा वैखरी पासून मध्यमा, पश्यंती आणि अंती परा वाणीपर्यंत होतो, त्या चारही वाणी या श्रीगणेशापासूनच उत्पन्न झाल्या आहेत. त्वं चत्वारिवाक्पदानि म्हणजेच ज्या आत्मउन्नतीसाठी परमात्म्याने श्रीगणेशरूपात या चारही वाणी, केवळ मानवी उद्धारासाठी उत्पन्न करून माणसाला इतर प्राणीमात्राहून भिन्न घोषित केलं, त्या चारही वणींचा कर्ता तूच आहेस, तुझ्याच पावलांबरोबर  या चारही वाणी तुझाच हात धरून चालत आहेत .

त्या वणींच्या सहाय्याने आणि हे गजानना तुझ्या कृपेने आम्ही टप्प्याटप्प्याने आत्मउद्धार साधून पुन्हा तुजप्रत पोचू. हे करत असताना तुझ्याच वाणीरूपातील प्रकटनाला, आम्ही नमन करून, त्या वणींचा सदुपयोग करून तुझी आराधना, अर्चना व प्रार्थना करून, हे हित साध्य करू.

आमच्या जाणिवा प्रगल्भ करून गुह्यातील गुह्य ज्ञान आम्हाला समजून येवो आणि त्या वाणीद्वारे ते समाज व धर्महीतास्तव आम्ही सतत जागृत आणि प्रसारित करत राहावे,  जेणेकरून हे श्रीगणेशा ज्या कारणास्तव तू ह्या वाणी आम्हाला प्रदान करून उपकृत केलंस, त्या वाणींचा सदुपयोग होईल आणि त्या वाणींद्वारे आत्मउन्नती व आत्मउद्धार साध्य होईल. 

यासाठी आवश्यक सद्बुद्धी व सदवासना, हे श्रीगणेशा तूच आम्हाला दे आणि आम्ही ते पेलण्यासाठी समर्थ होऊ हे बल आणि सद्भाग्य देखील तूच आम्हा पामरांना दे, हीच तुझ्या श्रीचरणी प्रार्थना आहे.

अथर्वशीर्षातील भावार्थ हे सलग न मांडता जसे सापडत जातील तसे मांडतोय. परंतु नन्तर त्याचं संकलन करून पुस्तकरूपात नक्की प्रकाशित करीन.

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
०८/०६/२०२१
०८:३३
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...