Skip to main content

भोग आणि ईश्वर १९२

भोग आणि ईश्वर  १९२
 
बरेचवेळा असं वाटतं की, इतकं सर्व ज्ञान देवाने, विधात्याने, विश्वनिर्मात्याने भूलोकी वेगवेगळ्या रुपात येऊन मांडलं, वेद, उपनिषदे, पुराणं, अध्यात्मिक वाङ्मय, सद्गुरूरुपात  अध्यात्मिक मार्गी साधकांच्या, चिंतन कर्त्यांच्या माध्यमातून आजपर्यंत करोडो लोकांपर्यंत पोचेल अशी व्यवस्था निर्माण केली. जशी मायेमुळे व वासनेमुळे विषयाकडे ओढ निर्माण होते आणि वैषयीक माणूस त्यासाठी जे शक्य आहे ते सर्व करू धजावतो.

त्याच्या विरुद्ध टोकाला हे ज्ञान मिळवण्याची, जोपासण्याची, जतन करण्याची, त्याचा प्रसार करण्याची जिज्ञासा, लालसा, ओढ निर्माण होऊन, संसाराच्या पसाऱ्यात सर्व तापत्रयांकडे दुर्लक्ष करून, हा व्याप लोकांपर्यंत पोचवण्यासाठी धडपड करून, प्रसंगी अवहेलना सहन करून, या ज्ञानाप्रत लोकांना पोहोचण्या साठी, कष्ट घेणारे देखील याच जगतात आहेत. 

दोघांनाही मायेच्या वासनेची आंच आहे. पण एकजण त्या मध्ये स्वतःला बुडवून सर्वस्व, म्हणजेच सर्व कर्म त्याचसाठी करतो. तर दुसऱ्या बाजूला एक आपली वृत्ती स्थिर राखून, आपल्या साधनेच्या तापात त्या वासनेला जाळतात आणि त्यावर आरूढ होऊन स्थिरचित्त, स्थिर वृत्ती राहून आपल्या सह अनेकांची प्रगती साधतात. एकाच जगतात वावरणारे दोन्ही, खरतर एका अर्थाने जगताची व स्व चीसुद्धा परवा करत नाहीत. पण एक प्रवाहासोबत जाऊन अंती गटांगळ्या खातात आणि पुनर्जन्माच्या चक्रात स्वतःला अडकवून घेतात.

दुसरीकडे काही द्रष्टे काळाची पावलं ओळखून, स्वेच्छेने आपल्यातील अनेक इच्छांचा बळी देऊन, आपली आत्मोन्नती साधून, इतरांचा देखील कार्यभाग साध्य करतात. एका अर्थाने या दोन टोकाच्या वृत्ती याच जगतात, याच वातावरणात निर्वाह करतात. खरतर ही दोन टोकं विधात्याने एक माध्यम म्हणून वा उदाहरण म्हणून आपल्यापुढे, या जगतात मांडली आहेत. यातून दोन वेगळे व टोकाचे आदर्श समोर ठेवले आहेत. 

माझ्या चिंतनातील अनेक विषयात हा विषय देखील असतो की, एक विषयासक्त आणि एक विषयरहीत या जगतात, एकाच छत्राखाली, दोन वेगळे परिपाठ सादर करत आहेत. मग यातूनच शिकण्यासारखं खूप काही आहे.  म्हणजे एका बाजूला विषयात गुंतून, किड्यां सामान आयुष्य जगून, जाताना काहीही न नेता, फक्त पापांचे भरलेले घडे नेणारे वीर आणि दुसऱ्या बाजूला विषयांच्या हल्ल्यात, आपली मती, मनःस्थिती, बल, इच्छा व साधनेची दृढता, अखंडता राखत, आपलं चिंतन आणि त्यातून प्राप्त कर्मफल, समाजालाच अर्पण करत व्यावहारिक अर्थाने रिक्तहस्त, पण अध्यात्मिक अर्थाने बरच काही प्राप्त करून जाणारे महावीर.

आपण या दोन्हींच्या मध्ये आहोत. आपण दोलायमान स्थितीत आपला संसार, विषयवासनेचे हल्ले परतवून लावताना दमणारे, भोग, दुःख, दैन्य, ताप यांनी त्रस्त होऊन कधीकधी साधनेच्या उठाठेवीवर प्रश्न निर्माण करणारे, कधी साधनेला उरापोटी जपणारे, अनावश्यक काळज्या, चिंता यातून जीव मेटाकुटीला आल्यामुळे पुन्हा साधनेचाच आधार धरणारे आणि सर्व होऊन पुन्हा संसाराच्या चिंतेत मग्न होणारे असे मध्यममार्गी आहोत. 

या दोन आदर्शांच्या मध्ये असल्यामुळे, दोन्हीकडे जीवाचा मनाचा व देहाचा ओढा येत जात असल्यामुळे, त्रस्त असूनही जगण्यावर प्रेम बाळगून, त्याची विरक्ती न येणारे आहोत. म्हणजे अत्यंत आसक्ती आणि अत्यंत विरक्ती यामध्ये जीव टांगून जगणारे अनोखे वीर आहोत. म्हणूनच आपली दोलायमान स्थिती सावरायला हातात आदर्शाचा, धर्माचा, नामाचा व साधनेचा दीप घेऊन मार्गदर्शन करणारे प्रभुसेवक व त्याचा परिणाम न झाल्यास दुसऱ्या टोकाला आसक्तीच्या सागरात बुडून जन्माचं वा जन्मजन्मांचं नुकसान करून घेणारे वीर, उदाहरण म्हणून दुसरीकडे मुद्दाम विधात्याने आणून उभे केले आहेत. 

आपण कोणाचा आदर्श ठेवायचा हे आपण ठरवावं. कारण त्यासाठी लागणारं विचार स्वातंत्र्य देवाने माणसाला दिलं आहे. उद्या पुढील चिंतनासाठी भेटू,पण तोपर्यंत नामात रहा, मार्गात रहा, कृपेचा प्रसाद कधीही मिळेल, पण मिळेल नक्की. 

अजून पुढे विवेचन करूया उद्याच्या भागात. पण तोपर्यंत नाम अवश्य घ्या, सद्गुरू चरणी लीन रहा, आत्मसुखाचा मार्ग अवश्य सापडेल. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत आणि श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ हे लवकरच प्रकाशित होणारं, पुस्तक ज्यांना  हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर मेसेज करून  वा फोन करून संपर्क करावा आणि नोंदणी करून घ्यावी . 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१०/०६/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...