Skip to main content

भोग आणि ईश्वर १९६

भोग आणि ईश्वर  १९६
 
आपली खरी परीक्षा तिथेच सुरू होते जिथे आपण मनाने त्या परीक्षेला बसतो आणि नेटाने येणाऱ्या प्रश्नांची तयारी करून, गांभीर्याने उत्तरं देतो. हेच अध्यात्मात लागू होतं. म्हणजे आपण जर मनापासून ठरवलं की, संचिताचा भार आणि कर्माच्या गतीचा फेरा हा उलट फिरवायचा असेल आणि आपल्या मार्गाला सुलभ व सुकर करायचं असेल तर, येणाऱ्या अडचणींचा विचार न करणं, येणारे दुःखाचे आणि भोगांचे प्रसंग हे आपलं कर्म आणि संकल्पाची परीक्षा आहे, हे मनात ठाम योजूनच साधना सुरू करावी. 

आता कोणत्याही मार्गावर एकदा वाटचाल करायचं ठरवलं की, इच्छित स्थानक येईपर्यंत, मार्गात येणाऱ्या स्थानकांचा, अडथळ्याचा विचार न करता, आपण गती, नियंत्रण, तोल यावर लक्ष देतो. जर आपलं चित्त वाहन चालवताना विचलित झालं तर, अपघात होणं, मार्गभ्रष्ट होणं आदि गोष्टी संभवतातच. इथे तर आपलं अंतिम स्थानक कधी, कोणत्या वेळी वा कोणत्या जन्मी येईल, हे माहीत नाही, वाटेत कोणती स्थानकं, टप्पे, अडचणी, मार्गभ्रष्ट होण्यासाठीचे चकवे आहेत हे देखील माहीत नाही. 

चालणं गरजेचं आहे, हे एकदा नक्की झाल्यानंतर मार्गातील अडचणींचा विचार न करणं हा एकच उत्तम उपाय आहे. संसारात जशी प्रलोभनं पाठ सोडत नाहीत आणि नित्य आपल्याला संसारभ्रष्ट करण्यासाठी सज्ज असतात, त्याच प्रमाणे  इथेही माया आपली पाठ आणि आपली वाट सहजी सोडत नाही. बुद्धिभ्रष्ट होण्याचे अनेक मार्ग येतात, गती कमी होते, विचार बदलत जातात कधी कधी मार्ग बदलला जातो, साधन व साधना थांबवण्याचे विचार बळावतात, बरेचवेळा येणारी संकटं अचानक रौद्ररूप धारण करतात, अडचणी एकाचवेळी अनेक मार्गानी वाट अडवतात.

जर गंभीरपणे विचार केला तर, या गोष्टी आयुष्यात प्रथमच होतात अशातला भाग नसतो, पण त्याचा गांभीर्याने विचार केलेला नसतो, कारण कोणत्याच प्रश्नांची, अडचणींची, दुःखाची, भोगांची संगती लावलेली नसते अथवा सबंध जोडलेला नसतो. आता साधनेच्या मार्गात वाटचाल सुरू केल्यानन्तर याची जाणीव जागी होते,इतकाच भाग आहे. हे सर्व का करतोय, का करायचं आहे, का करणार आहोत, हे मनात पक्कं योजूनच मार्गक्रमण सुरू केलं असेल तर, परिक्षे साठीच्या अभ्यासक्रमाचा, अभ्यासाचा बाऊ आपण करत नाही.

तर सर्व पाहणी आधीच पूर्ण करून, अभ्यासाचं नीट नियोजन करून, मगच सुरवात करतो. पण एकदा का सुरवात केली की, वेळ, काळ यांचा विचार न करता फक्त आणि फक्त परिक्षेचाच विचार करतो. इथेही तेच आहे. आपलं लक्ष शांती,  पूर्ण शाती, समाधान, अविचल चित्त, स्थिर मन, उत्तम आणि स्थिर साधना, त्यायोगे नामस्मरण आपल्या लक्षातील ईश्वरी शक्तीला सर्वसमर्पण भावाने संपूर्ण शरणागती, कर्मफलाची शून्य आसक्ती, भोगांची स्वीकृती, मनाची त्यासाठीची तयारी, विषयातीत वृत्ती इत्यादी स्थानकांतून पार होत फक्त नाम मी, मी आणि नाम, इतकी आत्मसंयमी स्थिरता प्राप्त करणं हेच ध्येय असावं. 

एकदा ध्येयनिश्चिती झाली की त्या मार्गावर मार्गक्रमण करत राहणं हे पक्के ध्यानात ठेवावं. आपली श्रद्धा स्थिर आणि पूर्ण सद्गुरुचरणी वा नामाच्या देवतेवर नेऊन ठेवली की, सद्गुरू वा नामाची देवता आपलं मार्गदर्शन कशाही प्रकारे करणार हा विश्वास दृढ ठेवावा, म्हणजे मार्ग भ्रष्टता होणार नाही किंवा होण्याची वेळ आलीच तर ते नक्की येऊन सावरतील. चित्त शुद्ध आणि वृत्ती स्थिर ठेवण्याचा संकल्प व प्रयत्न करावा. संकल्प दृढ असेल तर प्रयत्न हे इच्छेनुसार होतीलच, हे ध्यानात ठेवावं.

उद्या हाच विषय पुढे नेऊ,पण तोपर्यंत नामाच्या मार्गावर पथिक व्हा, असाल तर दृढपणे पावलं टाका, सद्गुरुकृपा नक्की होईल. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत.

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१४/०६/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...