भोग आणि ईश्वर २०१
आत्मविश्वास ही पहिली पायरी असण्याचं कारण, आत्मा व आत्म्याचा आधार असलेला श्वास हे आहेत म्हणजे तो ईश्वर आहे आणि तो ईश्वर आहे म्हणजे मला दृढतेने त्याच्यापर्यंत जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. दुसऱ्या अर्थाने जेंव्हा एखादी गोष्ट श्वासापासून करायची असेल तेंव्हा आत्मा ओतून ती गोष्ट केल्यास परिणाम निश्चित सकारात्मक होईल. दुसऱ्या अर्थाने सर्व विश्वाचा चालक मालक याच्यावर आस ठेवून, आपण फक्त कर्म करत राहणं. तिसऱ्या अर्थाने स्व म्हणजेच आत्मा यावर पूर्ण विश्वास असेल, तरच प्रत्येक कृती वा कर्म हे ठामपणे होतं.
आत्मविश्वास हा दृढ यासाठी सुद्धा असावा किंवा धरावा की, कर्मगतीच्या फेऱ्यात फलाची आस सोडून ती परमात्म्यावर ठेवली की, बाकी कुठेही ती आस ठेवायची गरज पडणार नाही किंवा गरज वाटणार नाही. एकदा स्वतःसह ईश्वरावर विश्वास ठेवला की घडणाऱ्या प्रत्येक कर्माचा अंत हा त्याच्या चरणांशी होणार. मन निश्चिन्त होणार आणि आपोआप, भय, चंचलता या सर्वांची जागा संयम घेईल वा घेतो. कारण माझं प्रत्येक कर्म योग्य करून घेण्याची जबाबदारी, आपण आत्मा अर्थात ईश्वरीय प्रतिनिधी याच्यावर सोपवली आहे. आपण कर्मासाठी बद्ध आहोत , आणि ते योग्यच होईल, कारण आत्म्यावरील विश्वासामुळे प्राप्त संयम, कार्य उत्तमरीतीने आणि पूर्ण क्षमतेने करून घेईल.
याशिवाय संयम हा माणसाला बुद्धीने, मनाने देहाने स्थिर करतो. स्थिर बुद्धी मनाला योग्य पद्धतीने विचार करायला मदत आणि वेळ देते. त्यामुळे घेतलेले निर्णय हे सर्व गोष्टींचा साकल्याने विचार करून घेतलेले असल्या कारणाने, नंतर मनाची चलबिचल होत नाही आणि केलेल्या कृतीची वा परिणामांची जबाबदारी घेण्यास, मन कचरत नाही. यदाकदाचित परिणाम इच्छेनुसार न आल्यास, मन त्यावर पुनः विचार करून चुका लक्षात आणून, त्या सुधारण्याचा विचार करेल.
म्हणजेच एक आत्मविश्वास आणि संयम अनेक सकारात्मक गोष्टी साध्य करतात. हा नियम अध्यात्मिक व भौतिक दोन्हीही ठिकाणी लागू होतो. अध्यात्मिक बाजूचा विचार करता, आत्म म्हणजे स्व यावर पूर्ण विश्वास ठेवून, त्यायोगे श्रद्धा परम आत्म्यावर राहते. त्यामार्फत, साधन, साधना व साध्य यावर आपोआप श्रद्धा बसते. संयम साधकाला, साधनेत योग्य मार्ग, विचार आणि योग्य कर्म करण्यासाठी पुरेसा अवधी व शक्ती प्रदान करतो.
संयम माणसाला समोर आलेलं वा प्राप्त झालेलं फल स्वीकारण्याची शक्ती व मानसिक बळ देते. परिणाम वा फल, योग्य असेल तर आत्मविश्वास वाढतो, पण फल मनाविरुद्ध आल्यास तोल व विश्वास न जाण्याचा ठाम पणा संयमच प्रदान करतो. साधनेच्या मार्गात लागणारी चिकाटी, दृढता, संकल्पावर टिकून राहण्याची सिद्धता, ही संयमाने प्राप्त होते.
संयम मनाला स्थिरता देतो, बुद्धीला मनाशी योग्य पद्धतीने बांधून विचारांची गती आणि मार्ग योग्य ठेवतो. म्हणजेच आपण करत असलेल्या साधनांवर मनात उगाचच शंकाकुशंका, उगाचच वेगवेगळे मार्ग अवलंबून बघणं, आपल्या साधनेची दुसऱ्या साधनेशी तुलना करणं, हे मन करत नाही. आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवायला संयमच मदत करतो. संयमाने माणूस सुखात वर जात नाही व दुःखात खचून जात नाही. संयमाने माणूस जमिनीवर राहायला मदत होते.
संयमित असलेल्या माणसाला प्राप्त बुद्धीचा सुयोग्य वापर करण्याचा विचार येतो व मार्ग सापडतो. म्हणूनच जगातील अनेक उच्च क्षेत्रातील आणि अध्यात्मातील सर्वच माणसं, कमी अधिक प्रमाणात सारख्याच आणि अत्युत्तम संयत वृत्तीची होती व आहेत. आज आत्मसंयम या विषयावर सखोल चर्चा करून झाल्यानंतर, उद्या हाच विषय पुढे नेऊया. स्थिर बुद्धी व मन यावर बोलू. पण तोपर्यंत नाम घ्या, घेत रहा. आपापल्या सद्गुरुंच्या सदिच्छा पाठीशी राहतील हा विश्वास ठाम राहुद्या.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१९/०६/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment