Skip to main content

भोग आणि ईश्वर २०९

भोग आणि ईश्वर  २०९

खरतर ज्ञानी असण्याची स्थिती, ही उत्तम स्थिती आहे. कारण माया, मोह, काम, क्रोध यांचं स्थान आणि महत्व कितपत आहे आणि त्यांचा उपयोग करून त्यांना कसं आणि का त्यागून पुढे जायचं, हे ज्ञात झालेलं असतं. ही स्थिती खरतर सर्वोत्तम आहे. पण इथेच घसरण्याचा धोका जास्त असतो. 

कारण या स्थितीत येताना मनुष्य बरेचदा , आपण जगता हून भिन्न आहोत आणि जगत मायकार व मी ब्रम्ह जाणणारा, या अभिमानात जाऊ शकतो आणि हा वृथा अहंकार, घात करतो आणि माणूस सर्व जगताकडे तुच्छतेने पाहायला लागतो. आत्म्यज्ञान प्राप्तीनंतर, जगत हे जरी मिथ्या वाटलं, तरीही ते मायाकारी ईश्वराचीच एक लीला आहे, हे ज्ञान लोप पावतं. मग अश्याच ज्ञानी उद्धवाला , श्रीकृष्णांना गोपींकडे पाठवावं लागतं, खऱ्या भक्तीच्या व खऱ्या आत्मज्ञानाच्या शोधार्थ. 

म्हणजे ज्ञानी होण्यात एक प्रकारे आत्मा स्वहित सुद्धा प्रसंगी विसरू शकतो. म्हणजेच ज्ञान हे साध्य नसून साधन आहे, याची विस्मृती होते आणि ज्ञान हे साध्य मानून ज्ञानी माणसाचा अहं जागा होतो. तो सर्व दृश्य जगत भ्रम मानून, आपण प्राप्त केलेलं ज्ञान हे श्रेष्ठ  म्हणजेच ते ज्ञान प्राप्त केलेले आपण श्रेष्ठ आहोत, या स्थितीला पोचतो आणि घात होतो. अर्थातच हीसुद्धा मायाकारी ईश्वराची मायाच आहे, हा विसर ज्ञानी माणसाला पडू शकतो आणि त्या स्थितीतून साध्या भोळ्या गौळणी, त्या ज्ञानी माणसाला बाहेर काढू शकतात. म्हणजेच साधी भोळी भक्ती ही सर्वात श्रेष्ठ.

कारण गौळणींनी काय केलं, काय मिळवलं,  हे त्यांनाही माहीत नाही. त्यांनी सर्व देहभान विसरून फक्त आणि फक्त श्रीकृष्णाची आळवणी केली, करुणा भाकली, आपल्या भोळ्या भक्तिभावाने,  त्याला हृदयातील परमोच्च स्थान दिलं. ज्या स्थानाला ज्ञानी उद्धवाने हात लावताच, उद्धवाला चोपण्याससुदधा मागेपुढे पाहिलं नाही.

त्यांनीच उद्धवाला खऱ्या आत्मज्ञानाची प्रचिती आणून दिली की, आपल्या आराध्याच्या भक्तीत, त्याच्या विरहा तील विरहिणीत खरा योग,खरं ज्ञान सामावलेलं आहे. म्हणजेच जगत मिथ्या प्रमाणे , ते ज्ञानसुद्धा मिथ्या आहे, जे खऱ्या ईश्वराला ओळखू शकत नाही. ईश्वराकडे जाण्याचा, त्याच्या प्राप्तीचा मार्ग दाखवू शकत नाहीत. गौळणींनी त्याला खरी भक्ती व खरा भक्तिमार्ग दाखवला, शिकवला आणि या यात्रेतून परत जाताना उद्धवाला खऱ्या भक्तीयुक्त ज्ञानाची ओळख व प्रचिती आली. येतानाचा उद्धव आणि गौळणींना भेटून परत जाणारा उद्धव हा भिन्न होता, भक्तीने ओतप्रोत भरलेला व भारलेला होता. 

ती भक्ती म्हणजे आराध्य, दैवत याच्या भेटीचा, प्राप्तीचा पुकारा, धावा, स्मरण करणे आणि त्या स्मरणात रममाण होणे. अर्थातच नाम घेणे. याच विरही स्थितीत जगण्याचा आनंद जाणूनच, संतश्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात  "तुका म्हणे गर्भावासी सुखे घालावे आम्हासी". तुझ्या प्राप्तीच्या ध्यासात, स्मरणात, त्या विराहातील झुरण्यात, वेदनेत, जे सुख आहे व आनंद सामावलेला आहे, तो प्रत्यक्ष मुक्ती व मोक्षप्राप्तीतसुद्धा नाही.

भक्तीच्या भावाच्या या नित्य क्षणक्षण मिळणाऱ्या आनंदा करता, प्रसंगी शतजन्म गर्भातील वेदना दुःख आणि जन्ममृत्यूचं चक्र धारण करायला आम्ही तयार आहोत. पण प्रत्येक जन्मात तुझ्या प्राप्तीच्या प्रयत्नांचा, भक्तीच्या नामाच्या, स्मरणाच्या सुखमय आनंदाला आम्ही मुकणार नाही. म्हणून खरी भक्ती, खरा भक्तियोग आणि त्याबद्दलची माहिती पुढील भागात जाणून घेऊया. 

पण तोपर्यंत नामातील आनंद नित्य प्राप्त करूया, त्यामध्ये स्व विसरून जाऊया. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले दहा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  लिंक कॉमेंटमध्ये दिली आहे. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२७/०६/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...