Skip to main content

भोग आणि ईश्वर १९७

भोग आणि ईश्वर  १९७
 
आता आपण प्रश्नाच्या गाभ्याकडे वळूया, जो १९५ व्या भागात सुरू केला. चित्तशुद्धी, साधनेचा आटापिटा, सन्मार्गावर सुरळीत वाटचाल, भोगाच्या तापापलीकडे जाऊन, फक्त आत्मिक स्व, म्हणजेच देहाचा स्व विसरून मार्गक्रमण करत राहिलो की, वासना सुटत जातात. हा प्रवास किंवा ही प्रक्रिया दीर्घकाळ चालेल किंवा थोड्याच काळात साधेल किंवा एखाद्या जन्मांतसुद्धा पूर्ण होईल.

या विषयी निश्चितपणे सांगणं कठीण आहे. पण साधना, वृत्तीतील बदल, चित्तशुद्धी या पायऱ्या आत्मा जितक्या लवकर, देहाच्या माध्यमातून प्राप्त करू शकेल, तितक्या लवकर हे साध्य होईल. चित्तशुद्धी नन्तर साधना केल्याने, मन पूर्ण शरण जाण्यास अटकाव राहात नाही. म्हणजेच समर्पण, भक्तीतील प्रेमातून शरणागती,  आत्म्याला परमात्म्याची ओळख ही चित्तशुद्धी नन्तरच होऊ शकते. 

चित्तशुद्धीवर इतका भर देण्याचं महत्वाचं कारण की, शुद्ध अंतःकरण हेच गुरुकृपा, ईश्वरकृपा होण्याचं मोठं माध्यम आहे. शुद्ध अंतःकरण व शुद्ध मन हे स्वच्छ पाण्यासमान आहे. पाणी जर स्फटिकासमान स्वच्छ असेल तर, त्या पाण्याचा ठाव वा तळ उत्तमरीत्या दिसतो. शुद्ध अंतःकरणाने केलेली कोणतीही कृती वा कर्म हे ईश्वरचरणी त्वरित।रुजू होतं. याचं महत्वाचं कारण ईश्वराला देह नाही तर मनच दिसतं. म्हणजेच आत्म्याच्या शुद्धतेची कसोटी, मनाच्या शुद्धतेवरून केली जाते.

शुद्ध चारित्र्याच्या, शुद्ध मनाच्या व्यक्तींनी केलेल्या चुका वा अपराध, त्यांच्या वृत्तीच्या व मनाच्या सचोटीवर, सोडून दिल्या गेल्याची अनेक उदाहरणं व्यवहारात पहायला मिळतात. कायदासुद्धा कोणत्याही गुन्ह्यात इंटेन्शन अर्थात हेतू किंवा हेतूंची शुद्धता वा अशुद्धता तपासतं. गुन्हा करणाऱ्याचा हेतू गुन्हा करणं नसून, कृतीच्या ओघात जर ते कृत्य घडलं असेल, तर कायदासुद्धा गुन्हेगाराला शिक्षा माफ अथवा कमी करतं. अगदी तुरुंगातील वागणुकीवर शिक्षा कमी होऊन कैदी लवकर सुटल्याची उदाहरणं सुद्धा पाहायला मिळतात.

मग यासर्वांमागे जे तत्व आहे ते, मानवनिर्मित नसून, ईश्वरी प्रेरणेने व शास्त्राधार, परंपरागत प्रचलित पद्धती व एकूणच मानवी मूल्यांची जपणूक यातून आलेलं आहे. मानवी मूल्य ही वेद शास्त्र, पुराणं इत्यादी मध्ये मांडलेल्या कथा व सूत्र यातून आलेली आहेत. त्यांचाच आधार घेऊन कायद्यातील ही तत्व निर्माण झाली. 

आता लक्षात घ्या, जर मानवाने मानवासाठी इतकी विचार पूर्वक व्यवस्था निर्माण केली असेल, तर मग ज्याने या मानवालाच निर्माण केलं, त्या ईश्वराच्या मनात करुणेचा, प्रेमाचा किती ओलावा वा झरा अथवा सागर असेल, याची वास्तविक कल्पना आपल्याला नाही. त्याच ईश्वराला मानवी मनातील भाव हाच आधार घ्यावा लागतो. शुद्ध मानवी मनातील, अणूसमान तरंगसुद्धा ईश्वरी मनाचा ठाव घेतात. 

अर्थातच इतक्या शुद्धतेला पोचलेला प्राणी सद्य जन्मात कोण व कुठे आहे, हा प्रश्न ईश्वरासाठी गौण आहे. किंबहुना उरली सुरली कर्मगती भोगण्यासाठी आवश्यक तरतूद एकाच जन्मात करून, ईश्वर त्या शुद्ध आत्म्याला मोक्ष मुक्ती या मार्गाला स्वतः घेऊन जातो. म्हणूनच वाल्या कोळ्याला नारदांच्या रुपात येऊन बोध देऊन, कायमस्वरूपी उद्धार, तो ईश्वरच करवून घेतो. 

ज्याप्रमाणे हुशार विद्यार्थ्यांचा  शोध शिक्षकांना असतो, त्या प्रमाणेच अश्या शुद्ध सात्विक, निर्मोही, सद्गुणी आत्म्यांची ईश्वरालासुद्धा गरज असते आणि त्यांच्यासाठी, ईश्वरी हृदयाची कवाडं कायम उघडी असतात. नव्हे अश्यांच्या सेवेसाठी तोच ईश्वर श्रीखंड्याच्या रुपात येऊन सेवाचाकरी करतो किंवा पुडलीक दर्शनार्थ अठ्ठावीस युगे विटेवर तिष्ठत उभा राहू शकतो. 

म्हणजेच सरतेशेवटी मनाची व आत्म्याची शुद्धता अर्थात चित्त व वृत्ती यांची शुद्धता ही प्रथम साध्य झाली पाहिजे. नाम अश्या शुद्धीकडे नेणारं महत्वाचं माध्यम व साधन आहे, म्हणून नामात रहा, त्या शुद्धतेकडे वाटचाल करा. भोग, कर्मगती या गोष्टी ईश्वरी कृपेसमोर अत्यंत क्षुल्लक  आहेत, त्याची चिंताही करण्याचं कारण नाही. आत्मशुद्धीकडे वाटचाल करा. 

ही चर्चा उद्या पुढे सुरू ठेऊच. तोपर्यंत नाम घेत रहा, शुद्ध व्हा.

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत.

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१५/०६/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...