भोग आणि ईश्वर १८७
परमार्थाच्या मार्गावर प्रत्येकजण,खरतर वाटचाल करत आहे, कळत वा नकळत. कारण जाणतेपणी वा अजाणते पणी प्रत्येकाला भोग भोगूनच पुढे जावं लागतं. भोग आणि उपभोग हे कर्माशी निगडित असल्यामुळे आणि प्रत्येक कर्माचा हिशोब चुकता करावा लागत असल्यामुळे, क्षणक्षण व कणकण आपण मार्गस्थ होतच आहोत,मोक्ष किंवा मुक्तीच्या वाटेकडे.
फरक इतकाच आहे की ज्ञानी मनुष्य त्यावर डोळसपणाने वाटचाल वा मार्गक्रमण करतो आणि अज्ञानी मनुष्य चुकत, धडपडत, खाच खळग्यात फसत, अडकत, टक्के टोणपे खात, पडत ठेचकाळत, दुःख कष्ट याचे घाव झेलत पुढे जातो आणि अर्थातच अत्यंत धीम्या गतीने वाटचाल करतो. म्हणजे थोडक्यात अनेक जन्मात एक पायरीसुद्धा पुढे न सरकता, त्याच ठिकाणी थांबून राहतो वा मागेपुढे होत, अंती तिथेच तिष्ठत राहतो.
वास्तविक विधाता मनात असुनही, नियमबद्ध असल्यामुळे, प्रत्यक्ष मदत काहीच करू शकत नाही. अश्या असहाय्य स्थितीतील ईश्वरानेच यातून अज्ञानी जनांना बाहेर काढून मुक्तीची वाट दाखवण्यासाठी, त्या खडतर मार्गावर वाट दाखवणारे वाटाडे अर्थातच गाईड नेमले वा स्वतः त्या रुपात तिथे प्रकट झाला आणि गुरुतत्व, संत महंत, या अनेक प्रतिकांना नेमून वा त्यांची निर्मिती करून, अज्ञ जनांना मार्ग व चालण्याचा सोप्पा उपाय सांगण्याची व्यवस्था केली.
या सद्गुरूरूप प्रतिनिधीचं काम अज्ञानी आणि जन्म जन्माच्या बंधनात अडकून पडलेल्या जनांना, यातून सुटकेचा मार्ग दाखवणं आणि त्यांच्या वाटचालीत त्यांना, हात धरून पुढे नेणं. अर्थात यामध्ये साधकांचं कर्तव्य तितकंच महत्वाचं आहे की, आपल्या सद्गुरूंचा हात आणि साधनेची कास न सोडणे. भोग आणि उपभोगाच्या या मार्गावर अनेक टप्प्यांवर आपल्या साधकांना सोबत घेऊन जाणं, हे सद्गुरू नित्य करत असतात.
यात सद्गुरूंची मुख्य जबाबदारी साधकांच्या जाणिवा प्रगल्भ करणं, जेणेकरून त्यांना स्वतःला मोहाच्या, मायेच्या मर्यादा व सापळे लक्षात येऊन, त्यात ते न अडकता, सुखरूप त्यावर वाटचाल करतील. कर्ममार्ग, ज्ञानमार्ग व भक्तिमार्ग या तिन्ही मार्गातून साधकांच्या कुवतीनुसार योग्य मार्ग त्यांना आखून देऊन, त्यावर त्यांना मार्गस्थ करणं आणि त्यांच्या अडीअडचणीत त्यांना सोबत घेऊन जाणं.
यामध्ये एक गल्लत वा गफलत होण्याची शक्यता आहे ती सांगणं गरजेचं आहे. सद्गुरू अडीअडचणीतून सोडवतात याचा तात्विक अर्थ असा आहे की, ज्या अडचणी, मायेचे जे पाश, मोहाचे जे क्षण, भोगाच्या आपत्तीच्या ज्या कसोट्या साधकाला अधोगतीला वा मागे ओढून नेण्याची शक्यता असते, त्या त्या ठिकाणी वा त्या त्या क्षणी, ज्याच्या त्याच्या साधनेनुसार, त्यांना सहाय्य करणं आणि संकटातून बाहेर काढणं, जेणेकरून साधकाचा पाय साधना मार्गावरून घसरणार नाही.
पण ते कधीही साधकाला पांगळा करत नाहीत. ते ठामपणे व खंबीरपणे मागे उभे असतातच आणि तोपर्यंत ते हस्तक्षेप करत नाहीत,जोपर्यंत तुमच्या स्वतःच्या इच्छाशक्तीचा व आत्मशक्तीचा जोर मर्यादेपेक्षा खाली येऊन तुमचा तोल जाण्याची स्थिती येत नाही. म्हणजेच ते पाठीशी आहेत याचा अर्थ, आपण आत्मशक्तीने व मनोशक्तीने दृढ आहोत आणि आपण संकटं, काळज्या, चिंता, भोग आणि अडचणी यातून स्वबळावर, पण गुरुकृपेने, सुखरूप बाहेर पडू.
याच सद् इच्छेच्या व आत्मबळाच्या सहाय्याने, सद्गुरूंकृपेचा हा ओघ हा कायम, बळ, ऊर्जा व उमेद वाढवण्यासाठी उपयोगात आणावा आणि त्याचसाठी गुरुचरणी लीन राहून, ती गुरुकृपा प्राप्त करण्याचा यत्न साधकाने करावा. कारण गुरूंकडे अधिकार आणि जबाबदारी दोन्ही गोष्टी ईश्वराने सुपूर्द केल्या आहेत. हा मार्ग व या मार्गावरील मार्गदर्शक, दिशादर्शक हा अधिकार देऊन,ईश्वरानेच ही व्यवस्था सामान्यांना भोगमुक्त, ज्ञानी व भक्त होण्यासाठी निर्माण केली. या मागचा परम दयाळू ईश्वराचा अंतिम उद्देश आपण योग्य मार्गावर राहून मुक्ती व मोक्ष या वाटेवर चालावं हाच आहे.
यावर अजून विवेचन पुढील भागात पाहूया. तोपर्यंत नाम घेत रहा, सद्गुरुकृपा प्राप्तीची याचना करत रहा. याचना याचा खरा अर्थ भावार्थ व मतितार्थ उद्या पाहू.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत आणि श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ हे लवकरच प्रकाशित होणारं, पुस्तक ज्यांना हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर मेसेज करून वा फोन करून संपर्क करावा आणि नोंदणी करून घ्यावी .
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०५/०६/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment