भोग आणि ईश्वर २७३ - श्रवण-मनन-आनंद-नाम
श्रवणाचा आनंद घ्यायची गोडी मनाला हळूहळू लागेल. तशी गोडी लागते आहे किंवा लागली हा आत्मविश्वास जागृत झाला की मग, त्या श्रवणाच्या मननाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे जे आपण प्रत्यक्ष ऐकत आहोत, तेच कल्पनेत ऐकण्याचा किंवा कल्पनेत आणण्याचा प्रयत्न करावा. मन खरतर कल्पनेत अनेक गोष्टी करू शकतं किंवा करतं. आपण कल्पनेत दूरवर भरारी मारून अनेक गोष्टी पाहतो अगदी ऐकतोसुद्धा.
हो हे वास्तव आहे की कल्पनेत आपण अनेक गोष्टी करतो, ज्या प्रत्यक्षात शक्य नसतील, किंवा होऊ शकत नसतील. काहीजण ज्याला दिवास्वप्न म्हणतात ते. मग याच आपल्या कल्पना शक्तीचा सदुपयोग करून घ्यायला हरकत नाही, असं मला स्वतःला वाटतं. म्हणजेच जे आपण श्रवणातून मनापर्यंत पोचवलं
तेच डोळे बंद करून, मनातल्या मनात गुणगुणण्याचा प्रयत्न करावा. असा प्रयत्न तेंव्हाच जमेल जेंव्हा, श्रवण उत्तम व मनापासून केलं असेल.
या कल्पनेतील श्रवणाचा आनंदसुद्धा अलौकिक आहे. एकप्रकारे
ही सुद्धा ध्यानधारणा पद्धतीच आहे. ज्यामध्ये मनाने कल्पनेतील एखाद्या लक्षावर केंद्रित केलं जातं. आपण पहिल्या टप्प्यात नित्य ऐकून मनाला सवय लावलेली गोष्टी वा धून अथवा नाद आपण पुन्हा पुन्हा आठवून, त्याचा पुन्हा पुन्हा आनंद घ्यायचा. याची सवय होइपर्यंत मन हे बऱ्यापैकी या नाद वा धून यांच्या आनंदाची अनुभूती घ्यायला लागते.
नित्य आणि जाणीवपूर्वक सवय जडवत गेल्यास, मनाला आवड निर्माण होते. जसं सहवासाने प्रेम जडतं किंवा एखादी व्यक्ती ज्ञात होते आणि आपली धारणा किंवा आपले भाव सुधारतात किंवा बदलतात, त्याचप्रमाणे नित्य एखादी गोष्ट , एकाच वेळी सतत करत गेल्यास, ठराविक काळानंतर त्या गोष्टीची सवय मनाला जडते, असं मानसशास्त्र सांगतं आणि ते सत्य आहे.
त्याचप्रमाणे श्रवण आणि त्यानंतर मनन यांची सवय मनाला जडली आणि कल्पनेतील श्रवणाचा आनंद घेता यायला लागला की, या स्थितीपर्यंत मनातील, नकारात्मक विचार, चुकीच्या गोष्टी
चुकीचे विचार हे सर्व कुठे गेलं, हे कळणारसुद्धा नाही. म्हणजे असे नकारात्मक व त्रासदायक विचार दूर होऊन, मन सकारात्मक व सुदृढ विचारांचा विचार , करायला लागतं
या ठिकाणी, त्रस्त, चिंतीत मनाला शांततेचा अनुभव येऊ लागतो आणि तेच मन अश्या अनुभवांच्या मागे, आपल्याला घेऊन जातं किंवा अश्या आनंदाचा शोध, मन घ्यायला लागतं. अश्यावेळी त्याला नित्य नाम घेण्याची सवय लावायला सुरवात करायची. खरतर नाम घेण्याची, हीच उत्तम पद्धत आहे. कारण , निराश, हताश, दुःखी मन देहाला नामस्मरण या गोष्टीचा एकदम स्वीकार करायला देत नाही वा देणार नाही.
कधीही नाम न घेतलेल्या मनाला, एकदम नामाच्या नादी लावण्याचा प्रयत्न केल्यास, तसा प्रयत्न फसण्याचा संभव असतो आणि मग अशी व्यक्ती आवश्यकता असूनही नामाचा आनंद घेऊ शकत नाही. म्हणून आधी श्रवणाची सवय नन्तर त्याचं मनन, नन्तर कल्पनेतील आनंद आणि त्यानंतर नाम या मार्गाने गेल्यास, नामाचं महत्व व नामाचा आनंद दोन्हीकडे मन आपोआप वळतं आणि नामाची सुरवात व आनंद दोन्ही नित्य व दृढ होतं.
उद्या हाच मुद्दा व विषय पुढे नेऊ, तोपर्यंत श्रवण, मनन, कल्पना आनंद आणि स्मरण याचा अनुभव घेत रहा.
भाग २ ची नोंदणी आजच सुरू केली आहे. ३० ऑगस्ट रोजी पुस्तक प्रकाशित होईल आणि त्यानंतर लगेच कुरियर होईल. प्रकाशनपूर्व सवलत रु.१४०/- (रु.११०+ रु.३०). 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२५०/- कुरियरसह. यात लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख आहेत.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लांबलं. पण लवकरच हे पूर्ण होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
३०/०८/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment