भोग आणि ईश्वर २५४
खरच मनाचा डोलारा सांभाळणं हे म्हटलं तर अत्यंत जिकिरीचं आणि म्हटलं तर सहजसाध्य असं कर्म आहे. मुळात आपण ज्यावेळी नकारात्मक वा निराश वा अनुत्साही असतो, त्यावेळी कुठेतरी मनात एखाद्या गोष्टीची नाराजी, एखाद्या कटू आठवणींचा पडदा, एखादी सल किंवा एखादा नकारात्मक विचार बॅक स्टेजला अर्थात मनात पडद्यामागे कार्यरत असतो.
किंबहुना मी म्हणेन, तसं काही नसल्याशिवाय मन उगाचच निराश वा निरुत्साही वा नकारात्मक असणार वा राहणार नाही. अश्यावेळी आपल्याच मनाशी आपण संवाद साधून, त्यातून ही नाराजी वा नकारात्मकता काढून त्याजागी उत्साह, उमेद, चैतन्य भरलं पाहिजे. पूर्वीच्या काळी मानसोपचार तज्ञ ही संकल्पनाच नव्हती. पण त्यावेळी मानसिक समस्या नसतील असं म्हणणं धाडसाचं आहे.
मागे आपण पाहिलं, त्याप्रमाणे मन म्हणजे अवकाशा समान आहे. हे अवकाश वा ब्रह्मांडातील कोणतीही गोष्ट अथवा काळाचं चक्र हे वर्तुळाकार आहे. म्हणजेच कुठेतरी त्या वर्तुळाचा एकशेऐंशीवा बिंदू आणि तिनशे साठावा बिंदू नक्कीच असणार. या वर्तुळाच्या परिघामध्ये आपलं मन घिरट्या घालतं किंवा भ्रमण करतं. म्हणजे एकशेऐंशीव्या बिंदूला, शून्य बिंदू हा समोर येतो आणि तिनशेसाठावा बिंदू हा शून्य बिंदूशी संयोग करतो.
म्हणजेच मनाचं विश्व हे, या परिघात फिरतं आणि मध्या वर मनाच्या विश्वाचा भवरा अर्थात केंद्रक असतो. केंद्रकात वा भोवऱ्यात सर्व गोष्टी गाडल्या वा गिळल्या किंवा साध्या भाषेत नष्ट केल्या जातात. या इतक्या विस्तृत विवेचनातून एक गोष्ट नक्की की, ज्या गोष्टी आपण विसरू शकत नाही वा ज्या गोष्टी मनाला ताप देतात किंवा ज्यांची सल वा बोच मनाला कायम होत असते, त्या एकतर बोलून किंवा केंद्रकात नष्ट कराव्या लागतील.
यातील कोणाशी बोलून मन हलकं होईलही, पण तशी व्यवस्था वा व्यक्ती आपल्या आयुष्यात असली पाहिजे आणि तिला मनातील सर्व गोष्टी सांगता आल्या पाहिजेत. पण तशी व्यवस्था नसेल वा नसताना काय केलं म्हणजे, मनाला सकारात्मक स्थितीत आणाता येईल, याचं एक शास्त्र वा तंत्र कित्येक हजार वर्षांपूर्वी प्राचीन सनातन संस्कृतीने विकसित केलं आणि युगानु युगे ते वापरात आहे.
ते तंत्र वा शास्त्र जे आज पाश्चिमात्य देशांनी संपूर्णपणे स्वीकारलं आहे आणि किंबहुना त्यामध्ये ते अग्रेसर होत आहेत. ते तंत्र म्हणजे मेडिटेशन अर्थात ध्यान. हे आपल्या पूर्वजांनी कित्येक युगांपासून आपल्या हातात एक उत्तम संशोधित तंत्र म्हणून दिलं आहे. आपल्या घरात पूर्वीच्या काळी हे तंत्र पूर्णपणे प्रयोगात होतं. जे पाश्चिमात्य संस्कृतीच्या रेट्याने आपण स्मरणातून मागे सारलं.
ब्रिटिशांनी सर्वात प्रथम येथील संस्कृतीवर हल्ला करून इथल्या सर्व चांगल्या गोष्टी व ज्ञान एकतर नष्ट केल्या किंवा येथून स्वतःकडे नेल्या. त्यावर जर्मनी व अमेरिके सारख्या देशात संशोधन करून, त्यातील उत्तम ज्ञान तंत्र त्यांनी अंमलात आणून त्याचे लाभ जाणले, आत्मसात केले. आज mind techniques किंवा मेडिटेशन या नावाने आपण त्यांच्याकडून शिकतो आहोत, हे दुर्दैव आहे. कालाय तस्मै नमः
या सर्व तंत्रांचा, म्हणजे ध्यान, धारणा, योग याग इत्यादी सर्व तंत्रांचा उद्देश, आधीच्या परिच्छेदात स्पष्ट केल्या प्रमाणे मनाच्या परिघावरील वा मनाच्या अवकाशात फिरणाऱ्या अनिष्ट कल्पना, विचार, विकार, नकारात्मक गोष्टी इत्यादी सर्व केंद्रकात आणून, त्या तिथून नष्ट करून, मनाचं अवकाश स्वच्छ करणं. या सर्व माईंड टेक्निक्सचा आधार आहे, एखाद्या गोष्टीवर ध्यान, मन वा लक्ष केंद्रित करून, त्यायोगे जशी आपण आरश्याची काच स्वच्छ करतो, त्याप्रमाणे मनातील धूळ, धुरळा, नकार, अनिष्टता काढून मनाचा आरसा तिनशेसाठ कोनातून पुन्हा लक्ख करणं.
विषयाचा आवाका मोठा असल्यामुळे उद्या हेच चिंतन पुढे सुरू ठेवू. पण नामावर लक्ष केंद्रित करून आपल्या मनाला सर्व बाजूनी स्वच्छ व शुद्ध ठेवण्याचा आपला क्रम सुरूच ठेवा.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लाभलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. त्याचबरोबर भोग आणि ईश्वर भाग २ चं काम पण सुरू आहे. त्याची सुद्धा घोषणा लवकरच करण्यात येईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
११/०८/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment