भोग आणि ईश्वर २७२
मनात येणाऱ्या विचारांच्या लाटांवर विचार करत, पण त्यात न गुंतता, तटस्थपणे, आपण अभ्यास करण्याचा सराव काही काळ नियमाने व नित्य केला तर लक्षात येईल की, यात चिंता जास्त आहेत. म्हणजे काही गतकाळातील आपल्याच चुकांची जाणीव वा जागृती आणि त्याच्या भविष्यात होऊ शकणाऱ्या वा येईल असं वाटणाऱ्या परिणामांची भीती.
हे दोन मुख्य भाव मनाचा वा मनाच्या अवकाशाचा बराचसा भाग व्यापून उरतात. जर ही भीती आपल्या कर्मांची नसेल तर इतर अनेक चिंतांची असते. जर ही भीती गतकर्माची असेल तर जे फल समोर येईल, त्यातून जाण्यासाठीची ऊर्जा व शक्ती आपल्याला, सद्गुरूंचं अखंड कवच आणि आपली श्रद्धा नक्कीच मिळवून देईल.
आपण मुख्यतः चिंतन करतो ते चिंतांचं. हे चिंतांचं चिंतन आपल्या मनातील सुप्त भीती करवून घेते. भीती भविष्याची असते. मुख्यतः ही भीती सांसारिक चिंता, पुढील काळ कसा असेल, कशी स्थिती येईल, आर्थिक घडामोडी व परिस्थिती काय असेल, आपण त्यातून कसे पार पडू, मुलं व त्यांचं भविष्य, त्यांच्या शिक्षणाची चिंता हे सर्व विषय सतत आपलं डोकं बुद्धी व मन पोखरत असतात. यातील सर्वच चिंता चुकीच्या असतात असाही भाग नाही. काही नित्य व नैमित्तिक असतात.
या सर्व गोष्टी आपण मनात, नित्य बाळगून असतो. त्यामुळे ज्या ज्यावेळी आपण शांत वा स्थिर बसण्याचा अभ्यास करतो, त्या त्यावेळी हे विषय आपलं डोकं वर काढतात. याचं मुख्य कारण मन हे सवयीचं गुलाम आहे. ज्याप्रकारे आपण त्याला सवय लावू, त्याप्रकारे त्याला सवय लागते. सवयी जायला किंवा बदलायला खूप कठीण जातं. विशेषतः त्या जडतात आपोआप, पण आपण जाणीवपूर्वक त्यांना वळवण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्या जास्त हट्टी होतात, अगदी एखादया हत्तीप्रमाणे.
पण याच गोष्टी नकळत व सहज करायला गेलं तर मनाला या गोष्टींची जाणीव सुद्धा होत नाही, की त्याला काही नवीन शिकवलं जातंय. उदाहरणार्थ आपण लहान मुलांना ज्यावेळी शिकवायला सुरवात करतो, त्यावेळी शब्द वा अक्षरं, ही आपण त्यांना चित्रातून शिकवतो. कारण ते पटायला व समजायला सहज सोपं जातं. म्हणजेच हे पचत जाईल ते रुचत जाईल. मनाचं अगदी असच आहे.
त्याला जितका गुंता देत जाऊ तितकं ते गुंतत जातं आणि त्यावेळी आपण करत असलेली चिंता वाढत जाते. त्याऐवजी मनाला शिकवण्यापेक्षा विसरायला लावणं हे जास्त सोपं आहे. यात मनाला कळत नाही की, आपल्याला शिकवलं जातंय. उदाहरणार्थ जर चिंतनात मन गुंतत नसेल तर त्याला असा विचार जोडून द्यावा जो अत्यंत सकारात्मक असेल आणि त्या विचारात मनाला गुंतवून ठेवेल.
अश्या वेळी अध्यात्मिक वाचन, मनन, चिंतन वा श्रवण खुप उपयोगी येतं. सुरवात फक्त श्रवणाने करावी. कारण नवविधा भक्तीमध्ये सर्वात प्रथम क्रमांकावर श्रवणभक्ती सांगितली आहे. एखादी छानशी ओंकाराची धून किंवा एखादं मधुर पण शांत भक्तीगीत, किंवा हरिपाठ, किंवा राम वा कृष्णनामाची, सद्गुरू नामाची धून लावून, डोळे मिटून शांतपणे ऐकण्याचा अभ्यास करावा.
मनाला त्याची हळूहळू गोडी लागते. त्या स्थितीत मनातील सारी स्थित्यंतरं, वाद, विसंवाद, नकारात्मकता, अनिष्ट गोष्टी इत्यादी सर्व नष्ट करण्याची शक्ती अश्या एखाद्या भक्तीरसपूर्ण नादात असते. अशी धून वा असं संगीत मनातील नकारात्मक लहरींना नष्ट करून, मनात सकारात्मक ऊर्जा व शक्ती निर्माण करतं. कदाचित असं एखादं नाम, धून नित्य कानावर पडत गेल्यास, त्याचा सकारात्मक परिणाम शरीरावर, रक्तप्रवाहावर आणि मेंदूतील पेशींवर होतो. याचा उत्तम परिणाम हृदयाच्या कार्यावर सुद्धा होतो.
अशी सकारात्मक सुरवात करत करत, मनाला हळूहळू आपण चिंतेपासून चिंतनापर्यंत नेऊ शकतो. यावर जरूर विचार करून, ते अमलात आणा. उद्या पुढे बोलूच. तोपर्यंत सकारात्मक ऊर्जा प्राप्ती करत रहा, नकारात्मक ऊर्जा व शक्ती दूर करत रहा.
भाग २ ची नोंदणी आजच सुरू केली आहे. ३० ऑगस्ट रोजी पुस्तक प्रकाशित होईल आणि त्यानंतर लगेच कुरियर होईल. प्रकाशनपूर्व सवलत रु.१४०/- (रु.११०+ रु.३०). 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२५०/- कुरियरसह. यात लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख आहेत.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लांबलं. पण लवकरच हे पूर्ण होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२९/०८/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment