Skip to main content

भोग आणि ईश्वर २४८

भोग आणि ईश्वर  २४८

काल ज्याला आपण क्ष म्हणून संबोधलं, तो सांसारिक आणि अध्यात्मिक जीवनाच्या वाटचालीत, प्रचंड उलथा पालथ करू शकतो. किंबहुना हा क्षच बऱ्याच गोष्टी ठरवतो, ठरलेल्या वा ठरवलेल्या बिघडवतो, वादळं निर्माण करतो किंवा निर्माण झालेली शमवतोसुद्धा. याचा ताबा वास्तविक कोणाकडेच असत नाही. कारण तसा तो क्ष स्वयंपूर्ण आहेच. पण प्रारब्ध संचित याने मार्गदर्शीत असतो.

म्हणजे असं की, जर एखादी गोष्ट आपल्या पूर्वकर्मांनी लिहून ठेवली असेल आणि त्याच्या फलिताची वेळ आली की, योग्यवेळी मन बुद्धीला प्रेरणा देऊन, त्या ठिकाणी जाण्याची प्रेरणा देतं. वास्तविक ही संचित प्रेरणा असते. अगदी साक्षात मृत्यूची वेळ व ठिकाण ठरलेलं असतं, त्यानुसार त्यास्थळी मनुष्य या मनाच्या प्रेरणेने पोचतो आणि कार्यभाग साधला जातो. म्हणूनच अशी अनेक उदाहरणं आहेत, ज्यामध्ये एखादी व्यक्ती आपल्या राहत्या घरापासून कित्येक योजनं म्हणजे कित्येक मेल वा किलोमीटर दूर, हे जग सोडून जाते.

प्रारब्धाप्रमाणे मनाला प्रेरणा मिळते, मन ती प्रेरणा बुद्धीला देते आणि बुद्धी देहाकडून ते कार्य करवून घेते. ज्याला आपण मृत्यूने ओढून नेलं म्हणतो. अर्थात हे खूप टोकाचं उदाहरण झालं. पण जन्म ते मृत्यू यामधल्या जीवनात अशी अगणित उदाहरणं सापडतील, जी प्रारब्धाच्या योगाने घडली आहेत किंवा घडतात. इथे मला एक गोष्ट आठवली. दक्षिण भारतातील एका प्रांतात, एकदा एक पोपट, एका झाडावर बसला होता. तिथे यमदेव स्वतः येऊन, थोड्या थोड्या वेळाने प्रकट होऊन, त्या पोपटकडे पाहून, अशक्य, निश्चितच अशक्य अश्या प्रकारचे आश्चर्यकारक उद्गार काढून पुनः अंतर्धान पावत होते. 

हे पाहून तो पोपट भीतीने त्या झाडावरून उडून, प्राण पणाने शक्ती लावून, गरुड उडेल एवढ्या उंचीपर्यंत गेला. तिथे , एक गरुड, इतक्या उंचीवर आलेल्या पोपटाला पाहून, आश्चर्याने त्याला म्हणाला, तू इतक्या उंचावर कसा आलास, पण आधी माझ्या पाठीवर बस आणि सांग, कारण तू निश्चितच दमला आहेस. पोपट त्या गरुडाच्या पाठीवर आनंदाने बसला आणि थोडा दम खाऊन म्हणाला. 

मी ज्या झाडावर बसलो होतो तिथे, आता थोड्यावेळा पूर्वी यमराज दर काही क्षणांनी येऊन, अशक्य अशक्य इतकंच म्हणून अंतर्धान पावत होते. म्हणून मी घाबरलो आणि सर्व शक्ती लावून इथपर्यंत आलो. पण हे गरुडराज तू नसतास तर मी नक्कीच इथून खाली पडून, गतप्राण झालो असतो. त्यावर त्या गरुडाने त्या पोपटाला दिलासा दिला आणि न घाबरण्याचा सल्ला दिला. गरुडाच्या पाठीवरून, इतक्या उंचीवरून, जग बघताना, पोपट धास्ती आणि आश्चर्य अश्या दोन्ही स्थितीचा अनुभव घेत होता. 

त्या गरुडाने त्याला सांगितलं की, मी तुला दूर हिमालयात एका गुह्य गुंफेत नेऊन ठेवतो. तिथे तू सुरक्षित राहशील. असं म्हणून, गरुडाने त्या पोपटाला हिमालयात एका गुहेत नेऊन सुरक्षित ठेवत म्हटले की, तुला कधीही भीती वाटली किंवा काही गरज लागली तर, तू मला साद घाल मी लगेच येईन. मी भगवान श्रीविष्णूंचं वाहन आहे. हे ऐकून पोपटाने गरुडराजाला नमस्कार केला.

त्याच्याशी बोलून, गरुड तिथून अंतर्धान पावलं. वाटेत यमराज आणि गरुड यांची भेट होते. गरुड यमराजांना रागे भरून, त्यांच्या कृत्याचं कारण विचारतो. यमराज मंद स्मित करून सांगतात की, मी या पोपटाचे प्राण हरण करण्यासाठी निघालो, तेंव्हा चित्रगुप्तांच्या रोजनिशीत या पोपटाचे प्राण हिमालयातील एका गुहेतून घेऊन यायचे अशी नोंद होती. 

म्हणून मला राहूनराहून आश्चर्य वाटत होतं की, हा एवढासा पोपट दक्षिण प्रांतातून, इतक्या कमी वेळेत, हिमालयातील गुह्य गुंफेत जाऊच कसा शकेल. म्हणून मी आश्चर्याने त्याला पाहून, ते आश्चर्य व्यक्त करत होतो, इतकंच. पण हे पक्षीराज गरुड, तुम्ही माझा प्रश्नही सोडवलात आणि कार्यभाग साधून दिलात. श्रीमहा विष्णुना माझा प्रणाम जरूर सांगा. गरुड अपराधी मनाने वैकुंठाच्या दिशेने प्रस्थान करतो आणि यमराज हिमालायकडे. 

वरील गोष्टीवर आपण उद्या विस्तृत विवेचन करू. पण नाम घेत रहा, मनाला निग्रहाने नामाचा आग्रह करत रहा. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लाभलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. त्याचबरोबर भोग आणि ईश्वर भाग २ चं काम पण सुरू आहे. त्याची सुद्धा घोषणा लवकरच करण्यात येईल.

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०५/०८/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...