Skip to main content

उदघाटन (फर्मास विनोदी कथा १)

उदघाटन (फर्मास विनोदी कथा १)

आटपाट नगराचा राजा विनोदचक्रम, हा नावाप्रमाणेच खरच एक विनोदवीर होता. त्याचा प्रधानजी,कररमखुरर्म हे त्याच्यापेक्षा जरा बरा होता. राजाच्या बरोबर कुठेही प्रधान जात असे, कारण राजा काय घोळ घालेलं याचा नेम नसायचा. 

नेहमीप्रमाणे राजा आणि प्रधान नगरातील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघणार होते. त्यामुळे महालात सगळी लगबग सुरू होती. महाराज कुठेही निघाले की, त्यांच्या खानसाम्यापासून सर्व लवाजम्यासह, राजा कोणत्याही कार्यक्रमात जात असे. त्यामुळे सर्व गडबड गोंधळ सुरू होता. 

प्रधानजी महालाबाहेर, महाराजांची वाट पहात, तिष्ठत उभे होते. प्रधानजी महाराजांना, महालाबाहेरूनच, विचारतात.

प्रधान : महाराज आपण रेडी आहात काय

राजा : अरे काय अजय विजय सुजय काय असतं का नाही तुमच्यात

प्रधान: चूक झाली , घाईत विसरलो. महाराजांचा विजय असो.

राजा: कोण आहे तिकडे, काय काम आणि डायरेक्ट आतपर्यंत कसे आलात. 

प्रधान: महाराज मी प्रधानजी.

राजा: आम्ही पण जी म्हणायचंय का तुम्हाला.

प्रधान: नाही मी नुसताच प्रधान आहे.

राजा: खरं आहे, नुसतेच आहात तुम्ही, बोला का आलात एवढ्या आत, काय काम आहे.

प्रधान: आपल्याला आज एका फंक्शनला जायचं आहे ना म्हणून आलोय.

राजा: अरे हो तुम्ही आहात वाटतंसोबत. घोळ नका घालू नसते, नेहमीसारखे आणि आमच्या नावावर खपवू नका, म्हणजे झालं. होतच आलंय आमचं, होईलच इतक्यात, जरा पाच दहा पंधरा मिनिटं थांबा.

प्रधान: जी महाराज थांबतो बाहेर, 

राजा : निघायची सर्व व्यवस्था झाली ना, ते बघा आधी, नाहीतर निघण्याच्या घाईत गेल्यावेळसारखं आम्हाला विसरून एकटेच जाल. आम्ही आहोत का ते बघून या, जा लवकर.

प्रधान: जी पाहतो व्यवस्था सर्व

राजा जरा मोकळा श्वास घेत म्हणतो, सुटलो, आता निवांत आवरूया, उगाच नसती झेंगटं पाळलीत पिताश्रींनी. सकाळ सकाळी उठून, चला जायचं चला जायचं. आज काय उत्सव, उद्या काय जत्रा, परवा काय उदघाटन, तेरवा काय भूमिपूजन, नंतर काय वाटपाचा कार्यक्रम. हे कमी म्हणून कधीकधी मयत, तेरावा, दहावा हे आहेच. दोन दिवस सलग काही आराम मिळत नाही. बरं ते झाल्यावर काय तर भाषण द्या, परिषदा घ्या, पत्रकारांना तोंड द्या, जनतेला भेटा, एकना दोन सतराशे साठ कामं.

महाराज थोड्यावेळात तयार होऊन, प्रधानांना वर्दी देतात. प्रधानजी हजर होऊन लवून मुजरा करतात, पुन्हा एकदा तो अजय की विजय तो होतो. चला निघुया, असा घोष होतो आणि महाराज निघतात, मागे प्रधान मग बाकी लवाजमा सर्व गाड्यांजवळ येतात. मुख्य गाडीत राजा आणि शेजारी राजांचा खाजगी बसतो. प्रधान नाईलाजाने, मागच्याच गाडीत बसतो. खरतर त्यांना महाराजांना काही जुजबी व काही महत्वाच्या सूचना करायच्या असतात. ते चडफडत मागच्या गाडीत बसतात. सोबत सेक्युरिटीच्या सतरा गाड्या, निघतात.

मुख्य कार्यक्रम स्थळी, सर्व लगबग, जमाव, मुख्य कार्यकर्ते, मंडळाचे सदस्य आणि कार्यकारिणी असा सर्व जामानिमा घेऊन, मंडळाचे अध्यक्ष फुरफुरकर उभे असतात. प्रत्यक्ष महाराज येणार म्हणून सर्वजण खास ठेवणीतल्या कपड्यात (अर्थात मंडळाच्या खर्चात) सजूनधजून आलेले आहेत. मंडळाच्या कार्यकारिणीतील महिला आणि वरील या सर्व मंडळींची मंडळी, असा भरगच्च स्त्रीपरिवार मिळून, मानाचेच शेपाचशे जमा आहेत.

मुख्य इमारतीमागेच, विस्तीर्ण पटांगण आहे,  जिथे भव्य मंडप उभारूलेला आहे, तिथे अर्थात त्या मैदानात, प्रचंड जनसमुदाय जमला आहे. या सर्वांना जमून दोनचार तास लोटले आहेत. त्यामुळे त्यांची सर्वांची चलबिचल हळूहळू कालवाकालव ते कोलाहल, या वेगात वाढत आहे. लाऊडस्पीकर, माईक, सजावट, इत्यादी सर्वांची व्यवस्था पाहणारे आपापल्या कार्यात मग्न आहेत. त्यांच्या दृष्टीने मुख्य पाहुणे उशिरा येणं ही पर्वणीच, तयारी पूर्ण करण्यासाठी.

गावच्या वेशीवर पाळतीसाठी, पण एरवी उनाड म्हणून टाकून दिलेल्या गटातले दहा पंधरा टपोरी बसवले आहेत. राजांच्या गाड्यांचा ताफा, लांब डोंगरावरून येताना दिसतोय असा निरोप घेऊन, टोळक्यातील 2,3 जण येतात. निरोप देऊन बाईकवर टांग टाकून निघून जातात. जाणकार मंडळी अंदाज काढतात की, पंचवीस तीस मिनिटात ताफा इथे येईलच. कार्यकारिणी मुख्य सभागृहात येते आणि अर्ध्या मंडळ सदस्यांना मंडपापाशी जाऊन व्यवस्था चेक करण्यास सांगितले जातं.

अर्ध्या तासावर अजून अर्धा तास जातो,  वेशीकडून निरोप येतो, त्यांचा अंदाज चुकला, कोणी दुसराच पाहुणा, तिसऱ्याच गावाकडे जायला, या मार्गाचा वापर करून, शॉटकटने पुढे गेला. पुन्हा पांगलेली कार्यकारिणी, एकत्र आली. परत निरोप घेऊन आलेल्या पोरासोरांना, दोन चार उत्तम शब्दात अमृतबोध ऐकवून, कार्य कारिणीने आपलं मन मोकळं करून घेतलं. आता अर्धा दिवस सरायला आला होता.

इकडे पोरासोरांनी, आपल्या आयांना रडून आणि आयां बायांनी आपल्या नवऱ्याना दरडावून, अल्पोपहार म्हणून आलेला नाश्ता, मुलांसाठी उघडायला सांगितलं. आधी आढेवेढे घेत कार्यकारिणीने, वाढणाऱ्या खर्चाचा अंदाज घेत, आपापल्या बायकांकडे संदेशात्मक कटाक्ष टाकून, हो आणि नाही याच्या मधल्या, मानेच्या हालचाली केल्या. अपेक्षितांनी त्याचा होकारात्मक अर्थ लावून, आलेल्या सर्व अल्पोपहाराचा, अल्पावधीत फडशा पाडला. एवढं होऊनही पोरांच्या भुका भागल्याच नव्हत्या. त्यामुळे पुन्हा उरलेल्या कोल्ड ड्रिंक्सचा फडशा पाडला गेला. 

कार्यक्रम अजून बाकीच आहे. 

क्रमशः

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
०५/०८/२०२१

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...