भोग आणि ईश्वर २५९
वरिष्ठांच्या आदेशानुसार, त्या नवीन अकाउंटंटने, अंदाज पत्रक, पुनर्लेखीत केलं आणि मासिक अंदाजपत्रकात, त्या खर्चाची तरतूद केली. पण मनात त्याला खुप त्रास झाला, आधीच्या अकाउंटंटच्या चुकीमुळे, त्याने काटेकोर पणे बनवलेलं अंदाजपत्रक कोलमडून पडलं. निदान त्यात बदल करावे लागल्यामुळे, खर्चात काही कपात व काही फेरबदल करावे लागले.
आता आपण याचं विश्लेषण करूया. हा आधीचा अकाउंटंट म्हणजे आपला मागचा देहरुप जन्म, ज्यामध्ये आपण काही चुका करून ठेवल्यात. नवीन अकाउंटंट म्हणजे आपलाच देहरुप नवीन जन्म. या नवीन जन्मा मध्ये आपण, नीटनेटके, शिस्तशीर आहोत. वरिष्ठ म्हणजे अर्थात विधाता आणि तो देणेकरी म्हणजेच आपलं कर्मफल. आता सर्व चित्र स्पष्ट झालं असेल.
म्हणजे आपणच आधीच्या जन्मात केलेल्या चुका, या जन्मात आपल्यासमोर, आपल्या दृष्टीने अयोग्य वेळी, पण त्या देणेकऱ्याच्या दृष्टीने योग्य वेळी, समोर आल्या मुळे, आपण या जन्मात स्वतः नीटनेटके असूनही, नियती रुपात समोर आलेल्या, आपल्याच चुकीमुळे क्रुद्ध, हताश व निराश झालो. खरतर यात क्रोधीत व्हायचं कारण म्हणजे आपल्याला त्या आधीच्या अकाउंटंटने केलेली चूक, पण आपल्याला ती निस्तरावी लागत असल्यामुळे, आलेला राग.
एक मात्र आहे की, या उदाहरणात सर्व चित्र स्पष्ट आणि वेगवेगळी व्यक्तित्व आहेत, त्यामुळे आपण नीटपणे ते विश्लेषित करू शकलो. पण प्रत्यक्ष जीवनात अशी संगती जोडता येणं थोडं, कठीण आहे. तरीसुद्धा तर्काने अशी संगती नक्कीच जोडता येईल. कारण ज्या चुका वा प्रमाद, आपण या जन्मात कदाचित केलेही नसतील.
पण त्यांचे भोग, या जन्मात समोर येऊन उभे राहतात, त्यावेळी आपण नक्किच समजावं की, तो आधीचा अकाउंटंट अर्थात, आदल्या जन्मीचा आपलाच देह होता. त्याच जन्मात आपण केलेली चूक वा केलेल्या चुका, आज आपल्या या जन्मात, म्हणजेच नवीन, देहाला भोगाव्या किंवा निस्तराव्या लागत आहेत.
आता आपण मूख्य विषयाकडे येऊया. विचार करा की, आधीचा अकाउंटंट व नवीन अकाउंटंट यांना बांधणारं समान सूत्र काय होतं, ज्यायोगे, त्याच्या चुका या नवीन अकाउंटंटला निस्तराव्या लागल्या. एक सूत्र म्हणजे, तो हुद्दा किंवा ते पद, ज्यावर ते दोघेही आळीपाळीने विराज मान झाल्यामुळे, आधीचा आणि आताच्या व्यक्तींचा संबंध प्रस्थापित झाला. म्हणजेच ते पद हा त्यांना जोडणारा समान दुवा ठरतो. अर्थातच आपल्या संदर्भात, ते पद म्हणजे तो आत्मा, जो आधीचा देह बदलून वा सोडून, आता नवीन देहात प्रवेशता झाला आहे.
आता या निष्कर्षाला आपण आलो आहोत की, देह आणि आत्मा हे भिन्न आहेत. एका देहाने केलेल्या कर्माचं फलित, तोच आत्मा असलेल्या दुसऱ्या देहाला भोगणे प्राप्त होते. म्हणजे आता कर्मफलाची, आपल्या देहरुप अस्तित्वाची आणि त्यामागच्या चैतन्यरुप शक्तीच्या अस्तित्वाची पूर्ण कल्पना आली आणि आपल्या पुढे जे फलित येतं, ते आपणच कधीतरी केलेल्या कर्माचं मूर्तरूप आहे, हे नक्की.
याचं चिंतन करा, पुढील विचार व विश्लेषण उद्या पाहू. तोपर्यंत नाम घ्या, नामाचं या विषयासंबंधी महत्व आपण पाहूच.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लाभलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. त्याचबरोबर भोग आणि ईश्वर भाग २ चं काम पण सुरू आहे. त्याची सुद्धा घोषणा लवकरच करण्यात येईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१६/०८/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment