भोग आणि ईश्वर २५०
आज सलग २५० दिवस या विषयावर लिहिण्याचं कार्य, माझे सद्गुरू माझ्याकडून करवून घेत आहेत, याचा आनंद होत आहे. त्याचप्रमाणे हे काम, जितके दिवस त्यांना करवून घ्यायचं आहे, तितके दिवस, माझ्याकडून ते होत राहो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना.
परवाच्या उदाहरणाला पुढे नेऊ आणि थोडा अजून सखोल विचार करूया. पोपट म्हणजे आपलं मन, सुखात असताना, समोर भोग, संकट, काळजी, अडचणी या रुपात मागील कर्म आपल्याला, त्या सुखाच्या क्षणांचा आनंद घेऊ देत नाही. क्षणात मनातील भय विचारांना उंचावर घेऊन जातं आणि बुद्धीच्या व देहाच्या गरुडाला त्वरित कामाला लावतं.
विचार मन करतं, बुद्धीला चालना व प्रेरणा देतं आणि या इंधनाने देहाचं वाहन कार्यरत होतं. बर केलेली कृती योग्य की अयोग्य हे परिणाम समोर दिसेपर्यंत समजत नाही. जेंव्हा समजतं, तेंव्हा समोर येणारे परिणाम देहाला भोगावे लागतात आणि बुद्धी व मन विचारात पडतात की, हे समोर येऊन उभं आहे, ते वास्तव काय आहे आणि हे कसं आलं.
पण त्यावेळी बिथरलेलं हे मन, हे मान्य करायला तयार होत नाही की, यामागे माझंच कर्म कारणीभूत आहे. बरं गोंधळात पडलेलं मन पुन्हा, त्या गोंधळामुळे व भीतीने, चुकीची कृती करून बसतं. या कृतीने काही सावरायच्या ऐवजी गोंधळ वाढतो. मग या सर्वांचं एक दुष्टचक्र तयार होतं. याच चक्राला भेदून, ही कर्मफलकर्माची साखळी तोडण्यासाठी, माणूस अनेक प्रकारे, हिंडतो, फिरतो, तऱ्हेतऱ्हेचे उपाय करतो.
पण या सर्वांच्या मागे उद्देश, त्या भोगांचा अंत व्हावा हा नसून, त्यापासून पळ कसा काढता येईल हा असतो. आपल्या पोपटाच्या उदाहरणातील मृत्यू ही एक गोष्ट किंवा बाब बाजूला ठेवली, तरी, त्या उदाहरणात, ते पोपट रूप मन अगदी तेच करतं. पण हे करताना, किंवा एका परिणामांतून सावरायच्या आधी वा न सावरता, त्याची प्रतिक्रिया व प्रतिसाद म्हणून, अजून एक चुकीची कृती करून, आणखीन एका कर्मफलाची वाढ केली.
या सर्व साखळीचा परिणाम म्हणून, असा चुका करणारा प्रत्येक जीव, जन्मजन्मांतरीच्या चक्रात अडकत जातो. पण या सर्वात एक महत्वाची गोष्ट ही की, आपण प्राप्त फलाच्या विचारात, सध्याच्या म्हणजे वर्तमानातील सुखाला हरवतो आणि अर्थात भविष्यातील फल दूषित करतो. या दोषाला दूर करण्याचा किंवा या साखळीला तोडण्याचा उपाय, म्हणजेच आजचं कर्म सुधारून, आधीच्या कर्मांचा हिशोब, विधात्यावर सोपवून, चिंतामुक्त स्थितीत त्याच विधात्याचं नाव घेत, त्याला आपल्या सर्व फलाची चिंता वाहणं. हा सहजसोपा उपाय अनेक युगं अनेकांनी केला.
त्यावर उद्या पुन्हा चिंतन करूया, पण नाम सदैव घेत रहा.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लाभलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. त्याचबरोबर भोग आणि ईश्वर भाग २ चं काम पण सुरू आहे. त्याची सुद्धा घोषणा लवकरच करण्यात येईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०७/०८/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment