Skip to main content

भोग आणि ईश्वर २४४

भोग आणि ईश्वर  २४४

नाम हे परिणामकारक होत आहे, याच्या काही कसोट्या आहेत. आज आपण त्याचा जरा विचार करू. मुळात वरवर घेतलेले नाम हे घेऊन न घेतल्यासारखेच असते. तो एक निव्वळ उपचारच असू शकतो. पण म्हणून यातून मागे येण्याचा व सोडून देण्याचा प्रयत्न करू नये. कारण नाम कशाही प्रकारे घेतलं तरीही ते आपला परिणाम करणार. 

फक्त तो परिणाम योग्य तऱ्हेने होण्यास तेंव्हाच सुरवात होईल, जेंव्हा नाम हे एकाग्रतेने घेतले जाईल. याबाबत एक उदाहरण घेऊ म्हणजे मुद्दा लक्षात येईल. एका इमारतीला बाहेरून रंगकाम सुरू आहे आणि वारा व कामाचा वेग इत्यादींमुळे बाजूच्या एका इमारतीच्या भिंतीवरसुद्धा रंग उडत आहे.  

आता यात ज्या इमारतीला रंग दिला जात आहे, ते म्हणजे पूर्ण जाणिवेने, आतमधून, अंतःकरणाने घेतलेले नाम आणि बाजूच्या इमारतीवर उडणाऱ्या रंगामुळे त्या इमारतीवर होणारं रंगकाम म्हणजे वरवर व उडतउडत घेतलेले नाम. परिणाम दोन्ही प्रकारे होईल, पण आतून व मनाने घेतलेले नाम म्हणजे ईश्वराच्या सान्निध्यात घेतलेले नाम. 

विचार करा की, आत्म्याचा अंश हा तोच स्वतः ईश्वर, भगवद्गीतेत त्यांनी सांगितलं की, इंद्रियांमध्ये मन मी आहे आणि देह नश्वर आहे. मग आपल्या हातात, आपलं असं काय आहे. तर बुद्धी आणि त्या बुद्धीने करायचा विचार. मग तो विचार सारासार आणि विवेकपूर्ण असावा की, अर्धवट व पुढचा विचार न करता केलेला फक्त वर्तमाना तील क्षणांचा असावा. 

बुद्धी ही म्हटलं तर आपल्या हातात आहे आणि म्हटलं तर आत्मघात करू शकणारी पण आहे. मागील घटना या वर्तमानातील भोग ठरवतात आणि त्या मागील घटना आपल्याच कर्माचा परिणाम आहे, हे तर निर्विवाद. म्हणजे आत्ता घडत असलेल्या घटना, दुःख वा सुखसुद्धा भविष्य ठरवू शकत नाहीत. तर आता आपण करू शकणारी कृती, विचार हे, पुढील मार्ग ठरवणार. हे जर पक्के असेल, तर मग आता मी काय करायचं, हा पेच निर्माण होतो. 

इथे एक उदाहरण घेऊ, म्हणजे मुद्दा लक्षात येईल. महा भारत युद्धानंतर छत्तीस वर्ष भगवान श्रीकृष्ण यांनी द्वारकेत राज्य केलं. गांधारी आणि दुर्वास ऋषींच्या शापाचा परिणाम म्हणून संपूर्ण यदुवंश अर्थात वृष्णी  व अंधक या दोन्ही उपशाखेतील सर्व यादव आपा पसातील युद्धात अर्थात यादवीमध्ये, मारले गेले. 

भगवान श्रीकृष्ण यांना ही भविष्यवाणी ज्ञात होती. त्यांनी मनात आणलं असतं तर, या शापाचा परिणाम ते टाळू शकत होते. परंतु याबाबत त्यांनी तत्वतः असा विचार केला की, कलियुग आता लवकरच सुरू होईल. सर्व जगात अजेय ठरल्यामुळे आधीच उन्मत्त झालेले यादव, कलियुगाच्या प्रभावाने, अजूनच अनियंत्रित होतील. 

त्यांना अडवणं, हे आपल्याशिवाय समस्त जगतात, कोणालाही शक्य होणार नाही. आपल्या अवतारकार्याची आता समाप्ती जवळ आलीच आहे. त्यामुळे कलि युगाच्या सुरवातीलाच ही भूमी मदमस्त आणि पापी विचारांनी प्रभावित राहू नये. अन्यथा या अवतारातून साधलेला, पापीनाशाच्या कर्माचा परिणाम, कलियुग सुरू होतानाच शून्य वा प्रभावहीन होईल. 

म्हणजेच मन या इंद्रियात प्रत्यक्ष परमात्मा आहे. पण बुद्धी, माया व कर्मफल जसे मार्गदर्शन करेल, तसं कर्म प्राणी करतो. प्राण्यांची बुद्धी ही मर्यादित आणि योनी भोगांसाठीच असल्यामुळे त्यांना विवेक असण्याचा प्रश्नच येत नाही. राहता राहिला प्रश्न मानवाचा. 

तर त्यासाठीच मनाला बुद्धी व विचार यांची जोड व याला विवेकाचा आधार, हे भगवंतानी दिलेलं वरदान आहे. ज्या द्वारे मानव त्रिगुणातील तम आणि रज गुणांना नियंत्रणात ठेवून, सत्व गुणयुक्त विवेकाची साथ, मन व बुद्धी यांना देऊन, पुढील कर्माच्या फलातून माणसातील आत्म्याची सुटका करू शकतो. 

या विवेकाला जागं ठेवण्यासाठी मन एकाग्र असणं आणि ध्येयावर स्थिर असणं क्रमप्राप्त आहे. नाम या सर्वात, मनातील वृत्तींवर नियंत्रण ठेवून,  स्थिरता देऊ शकतं. यासाठीच एकाग्रतेने म्हणजेच एका अग्रावर अर्थात टोक किंवा ध्येय, यावर मन वा चित्त स्थिर करण्याचा आग्रह, शास्त्र, ऋषीमुनी, वेद संतामहंत, करतात. याचसाठी पहिल्या परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे नाम हे वरवर न घेता, ते आत जाऊन घेतलं पाहिजे. अजूनही मुद्दे आहेत, त्याचा उद्या परामर्ष घेऊ. तोपर्यंत मनाने, मनातून एकाग्र तेने नाम घ्या, सर्व साधेल. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लाभलं. पण लवकरच हे पूर्ण होईल. त्याचबरोबर भोग आणि ईश्वर भाग २ चं काम पण सुरू आहे. त्याची सुद्धा घोषणा लवकरच करण्यात येईल.

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०१/०८/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...