भोग आणि ईश्वर २७१
मनात उसळणाऱ्या विचारांच्या लाटा, मनाची खोली किती आहे यावर अवलंबून आहेच. परंतु मनाची सशक्तता अर्थात बल व क्षमता यावर देखील अवलंबून आहे. म्हणजेच येणारे विचार हे किती खोलवर बुडी मारून, मनात लाटांचा मारा निर्माण करतात हे वास्तविक ती व्यक्तीच ठरवू शकते. कारण मनात येणारे विचार आपणच नियंत्रित करू शकतो, हे पटत नसलं तरी सत्य आहे.
रेकी, प्राणिक हिलींग किंवा संमोहन या प्रकारात आपले मन आपल्या ताब्यात पूर्ण आणून, त्याद्वारे समोरच्या व्यक्तीवर मानसिक नियंत्रण मिळवून, इच्छित कार्यभाग साधायचा असतो. यामध्ये इच्छा आपली असो वा एखादया इतर व्यक्तीची, ज्याच्यासाठी ही प्रक्रिया वा ते कार्य हाती घेतलं आहे त्याची असो. पण इच्छा आणि त्या इच्छापूर्तीचा संकल्प या दोन गोष्टी वरील प्रकारच्या कार्याचा आधार असतो.
म्हणजेच इच्छा आणि संकल्प या पायानंतर प्रत्यक्ष कृती याला सुद्धा अनन्यसाधारण महत्व अश्या सर्व कार्यात आहे. म्हणजेच याची त्रिसूत्री आहे इच्छा, त्या इच्छेच्या पूर्तीसाठी दृढ संकल्प आणि त्या दृष्टीने कर्म. या तिन्ही साठी मन आत्म्यावर स्थिर असणं आणि त्याची एकाग्रता काही काळासाठी राखता येणं हा याचा मुख्य नियम आहे. आता एवढं सर्व चिंतन केल्यानंतर, मुद्दा हा उरतो की, अश्या काही व्यक्ती हे कार्य इतरांसाठी किंवा स्वतःसाठी करताना या त्रिसूत्रीचा आधार घेतात, त्यासाठीचा अभ्यास करतात, तशा प्रकारचं नियंत्रण स्व मनावर मिळवून, त्याचा लाभ इतरांना मिळवून देतात, मग आपण निदान स्वतःसाठी मनावर व विचारांवर नियंत्रण मिळवू शकत नाही का.
याचं उत्तर दोन प्रकारे देता येईल. एक तर हो पूर्ण नियंत्रण मिळवता येतं. पण ज्याचं मन अत्यंत दोलायमान वा अस्थिर आहे त्यांना हे दोन टप्प्यात साध्य करता येईल. यामध्ये पहिली पायरी जी खुप महत्वाची आहे, ती म्हणजे, ज्यावेळी विचार पूर्ण जाणं शक्य नसतं, त्यावेळी त्यांचा मार्ग वळवण्याचा अभ्यास आधी करावा. हे साध्य करण्यासाठी आपल्या विचारांचा आपणच थोडा अभ्यास करावा.
यासाठी सहजसाध्य बैठकीत आपण बसून, येणाऱ्या विचारांचा किंवा विचारांच्या लाटांचा स्वतंत्र दृष्टीने किंवा तटस्थपणे अभ्यास करावा. यामध्ये, येणाऱ्या विचारांचं, काही सूत्र वा वेळेचं काही गणित वा कोष्टक आहे का याचा अंदाज घ्यावा. तसं काही करणं शक्य नसेल किंवा जमत नसेल तर, निदान शांतपणे बसून, त्यांना येऊ देत जावं आणि आपण फक्त त्यांना बघत रहावं. बघत रहावं म्हणजे त्यांच्या येण्याकडे पहावं.
आपण त्यामागे जाणार नाही, याची काळजी घ्यावी. हे सुरवातीला कठीण वाटलं तरी, अशक्य नाही. सुरवातीला आपल्याला भान रहात नाही. आपण विचारांच्या मागे धावत जातो. पण आपण अभ्यास करतो आहोत, हे सतत बुद्धीने समजावत राहिल्यास, मनातील विचारांच्या मागे धावणारे आपण, पून्हा पुन्हा आपल्या बैठकीवर येत राहू. बैठकीवर म्हणजे भानावर येत राहू.
हा अभ्यास नियमाने, काटेकोरपणे व घड्याळ लावून, सुरवातीला पाच सात मिनिटं व नन्तर वाढवत न्यावा. यातून हळूहळू आपण विचारांच्या पसाऱ्यातून योग्य व अयोग्य काय हे बघण्या इतपत जागृत, आपण होऊ शकतो किंवा होतो. यापुढील स्थिती बाबत उद्याच्या भागात चिंतन करूया. तोपर्यंत नामाचा अभ्यास सुरूच ठेवा. सहजावस्थेत जितकं नाम येईल ते जास्त महत्वाचं आहे.
भाग २ ची नोंदणी आजच सुरू केली आहे. ३० ऑगस्ट रोजी पुस्तक प्रकाशित होईल आणि त्यानंतर लगेच कुरियर होईल. प्रकाशनपूर्व सवलत रु.१४०/- (रु.११०+ रु.३०). 9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र रु.२५०/- कुरियरसह. यात लेख क्र ६८ ते १३६ पर्यंत लेख आहेत.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत. श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक नोंदणी साठी सुध्दा संपर्क करू शकता. काही अपरिहार्य कारणांमुळे पुस्तक छपाईचं काम लांबलं. पण लवकरच हे पूर्ण होईल.
भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत. भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.
.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२८/०८/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment