Skip to main content

भोग आणि ईश्वर १९१

भोग आणि ईश्वर  १९१
 
काल आपण पाहिलं की,ज्ञानी माणूस ज्ञानाच्या सहाय्याने आत्मोन्नती साधत अंती आत्मउध्दार साधतो. ज्ञानाने त्याच्या जाणिवा प्रगल्भ होतात, मनाच्या कक्षा रुंदावतात सत् असत् याचा बोध झालेला असतो. मोह माया, काम क्रोध यांचा प्रत्यय आलेला असतो, भगवंताचं सतस्वरूप जाणलेलं असतं. त्यामुळे साधायचं काय आणि सोडायचं काय, याची जाण आलेली असते. मुमुक्षत्व प्राप्त झालेलं असतं. 

उन्नती आणि अधोगतीचे मार्ग आणि खाचाखोचा माहिती असतात. मनःचक्षु उघडले असल्या कारणाने काय पाहायचं आणि काय न पाहता पुढे जायचं, हे समजलेलं असतं, मर्यादा आणि शक्तीस्थान, जाणिवा आणि उणिवा माहिती असतात. भरकटायचं का नाही आणि भरकटल्यास काय परिणाम होणार, हेदेखील समजलेलं असतं. 

हे ज्ञानी माणसाबद्दल झालं. आता कर्ममार्गी माणूस कर्तव्य आणि कर्माच्या मर्यादा यांनी बद्ध असतो. तो मुमुक्षु व ज्ञानी माणसाप्रमाणे प्रगल्भ नसला तरीही, कोणतं कर्म श्रेष्ठ व कोणतं कनिष्ठ यांना समजून असतो. आपल्या कर्माच्या कोणत्या हिश्श्याने आपण बद्ध होऊ आणि कोणते कर्म करूनही आपण अबद्ध राहू हे ओळखून, तो एखाद्या ज्ञानी माणसासम कर्मफल त्याग करून सत्कर्माच्या मार्गाने मार्गक्रमण करत, प्रत्येक जन्मात आपले हित साधत, पुढे जातो. विधातासुद्धा प्राप्त फळातील याचा हिस्सा त्याला प्रदान करतो. पण कर्ममार्गी माणूस त्यातूनही आपलं हित ओळखून बद्ध न होता, प्राप्त फलाला दान म्हणून  स्वीकारून मोक्षप्राप्ति कडे वाटचाल करत जातो. 

परंतु खरा प्रश्न असतो तो मध्यममार्गी सर्वसामान्य जीवाचा. ज्याला मायेचा फेरा अडकवत जातो, कर्माची बद्धता जन्म जन्मांतरासाठी बांधत जाते, वासना, इच्छा, कामना यांची अतृप्तता, पुढील प्रत्येक जन्मांसाठीचं संचित प्रारब्धाच्या रुपात साठवत जाते, मोक्षमुक्ती या मैलोगणती दूर असतात, तिथपर्यंत वाटचाल करण्याचा विचारसुद्धा मनात येऊ शकत नाही, अशी प्रारब्धाची गती प्राप्त झालेली असते,मायेचे पाश, षड्रिपुंचे खेळ, संसारात गुरफटून राहण्याची मानसिकता, जन्मोजन्मींची बंधनं, हे एखाद्या शृंखलेप्रमाणे वाटेत बांधून ठेवतात. अश्या परिस्थितीत सापडलेल्या सामान्य जनांना पुनरपि जननम पुनरपि मरणम हाच एक मार्ग दिसत असतो. 

अश्या अज्ञानी, मूढ, बद्ध जनांनी मोक्ष मुक्ती, फलाच्या बद्धते तून आपली सुटका कशी करावी, याला काहीच उपाय नाही का, की फक्त देह मानवाचा असूनही, भोग आणि उपभोग दोन्ही पशुसमान, असं आयुष्यच जगावं का. यावर काहीच मार्ग विधात्याने योजला नाही का. खरतर याच लोकांसाठी द्वैत अद्वैत या वादात न पडता, फक्त देवाचं नित्य स्मरण करत करत, आपलं कर्म करत राहण्याचा सर्वात सोप्पा, आचरण्यास उत्तम व विना सायास मोक्षाकडे घेऊन जाणारा हमखास भक्तीचा मार्ग भगवंतानी स्वतः सांगितला आहे.

आपलं कर्तव्य करत असताना, कर्माच्या गतीचा फेरा चालू असताना, भोगांच्या राशी संकट रुपात समोर असताना, संसाराच्या जाळ्यात अडकलेले असताना, काहीही न करता सर्व योग साधणारं साधन, फक्त आपल्या इच्छित देवाचं नाम घेऊन, त्याला स्मरून, कोणत्याही अद्वैत सिद्धांतात न पडता, अणुहून सूक्ष्म आणि आकाशाहून विशाल मन त्याच्या चरणी अर्पण करून, त्याच चरणांना लक्ष मानून, त्याच निर्गुण निराकार ईश्वराला, सगुण साकार रुपात कल्पून फक्त आणि फक्त त्याचं स्मरण करत, आपला सर्व भार त्याच्यावर सोपवून, आपण मिळालेल्या श्वासाचासुद्धा विचार न करता, फक्त या भक्तिमार्गात पडून राहायचं. 

कर्तव्याची इतकी चिंता वाहिली आणि मन पूर्णपणे त्याला वाहून, त्याच्या स्वाधीन केल्यानंतर, आपण फक्त त्याच्या स्मरणाची चिंता करत क्षणाचा आणि श्वासाचा हिशोब त्याला वाहायचा. त्याबदल्यात आपलं योगक्षेम वाहून नेण्याची हमी तो घेणार हे ब्रीद वा वचन त्यानेच दिलेलं आहे. पण हे केल्या नंतर मुख्य अट ही की, जे होईल ते, त्याची चिंता आहे, ही मनाची स्थिती कायमस्वरूपी आणि अत्यंत विपरीत परिस्थितीत सांभाळणं, एवढंच आपलं इतिकर्तव्य आहे.  

एवढं ज्याला समजलं त्याने जन्म साध्य केला, हे नक्कीच. पण आपल्याला हेसुद्धा जमायला कित्येक वर्षे वा जन्म जातात. म्हणूनच हाती योग साधण्याचं कसब असूनही आपण कोरडे राहतो. याचं महत्वाचं कारण म्हणजे आपण मनाने त्याचं स्मरणही करतो आणि त्याच मनात, मेंदूत सर्व चिंता काळज्या वाहतो. 

एकदाच डोकं त्याच्या चरणांवर ठेवून, मोकळ्या मनाने त्याला सांगून मोकळे व्हा की, माझं सर्व कर्म आणि कर्मफल तुला अर्पण करतो, इथून पुढे माझ्या सर्व चिंता तुझ्याच चरणांवर वाहीन आणि फक्त तुझंच स्मरण करून पुढे जगेन. एकवार सांगून पहा, नक्कीच विधाता आपल्या योगक्षेमाची चिंता पाहिलं, तो नित्य सोबत आहे याचा प्रत्यय येईल, सुखात आणि दुःखात सुद्धा. 

अजून पुढे विवेचन करूया उद्याच्या भागात. पण तोपर्यंत नाम अवश्य घ्या, सद्गुरू चरणी लीन रहा, आत्मसुखाचा मार्ग अवश्य सापडेल. 

लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं  भोग आणि ईश्वर भाग १ हे  पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत आणि श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ हे लवकरच प्रकाशित होणारं, पुस्तक ज्यांना  हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर मेसेज करून  वा फोन करून संपर्क करावा आणि नोंदणी करून घ्यावी . 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०९/०६/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...