Skip to main content

राम अनुज भरत भाग २७

राम अनुज भरत भाग २७

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.

प्रभू आपल्या कोमल वाणीने, सुकोमल जनक नंदिनी राजदुलारी, विदेहकन्या देवी मैथिली, हिला सर्व काही समजावून सांगत होते. याचवेळी लक्ष्मण तीर कमठा सज्ज ठेवून, नागफण्यासम चारही बाजूला नजर ठेवून, भ्राता व देवी सीता, यांच्या रक्षणार्थ सज्ज होऊन, फिरत होता. अर्थातच लक्ष्मणाच्या या सर्व हालचालींवर, ज्येष्ठ भ्राता श्रीराम याचं लक्ष होतंच. त्या नयनरम्य निसर्गाचं वर्णन करताना प्रभू पुढे म्हणाले. 

"हे भार्यें सीते, हा एका बाजूला वनाचा विस्तीर्ण, घनदाट झाडीचा प्रदेश आहे. ज्यामधे मधुर मधुर फळं आणि विस्तीर्ण प्रदेशावर सावली देणारे मोठमोठे वृक्ष आणि विविध रंगी, मनमोहक सुगंध देणारी, नाजूक, सुकोमल फुलझाडं आहेत. तर दुसऱ्या बाजूला उंच पर्वतरांगा असलेला, हा चित्रकूट पर्वत आहे."

"या पर्वतामधे, अनेक प्रकारचे अनेक रंगांचे धातू, असलेले कातळ आणि त्या कातळाने सुशोभित कडे आहेत. काही पर्वताचे कडे ताम्रवर्णी, काही कडे पित वर्णी, काही गडद काळ्याशार रंगाचे तर काही रौप्य धातू प्रमाणे चकाकणारे आहेत. यांची शोभा अत्यंत अवर्णनीय असते. पण विशेष करून, ज्यावेळी सूर्यकिरणे, यांच्यावर पडतात, त्यावेळी, यांच्या रंगछटा आणि त्यातून परावर्तित होणारा समवर्णी व मिश्रवर्णी रंग,अत्यंत विलोभनीय असतो. या पर्वतांच्या रांगा, वर्षा ऋतूच्या सुरुवातीला येणाऱ्या काळया जलदांना अडवून, या संपूर्ण पर्वत राजी आणि आजूबाजूच्या घनदाट वनासह, सर्वच भूभागावर वर्षा ऋतूची प्रचंड कृपादृष्टी घडवून आणतात. 

वर्षा ऋतू मधे आणि विशेष करून श्रावण भाद्रपद या मासात, येथील निसर्ग सुखाची, आनंदाची पखरण करत असतो. हे विलोभनीय दृश्य सोहळा पाहण्यासाठी, अनेक प्रकारचे पक्षी खास इथे येऊन, आपल्या मनोहारी दर्शनाने मनाचा ठाव घेतात. किंबहुना ते पक्षी, हा सोहळा पाहण्या साठी न येता, येथील निसर्गाची शोभा वाढवण्यासाठी येतात, असच म्हणाव लागेल. ही मंदाकिनी नदी, त्या काळात आपला नित्य प्रवाह विसरून, मेघातून पडणाऱ्या संपूर्ण जलाला आपल्यामध्ये सामावून घेते. 

या संपूर्ण अवलोकन यात्रेत, देवी सीता, मनोहारी निसर्ग सौंदर्याने, अत्यंत प्रसन्न चित्त आणि आश्चर्य मुग्ध झाली होती. प्रभू श्रीराम आपल्या भार्येला, या सर्व विलोभनीय निसर्गाचे अवर्णनीय सौंदर्य, आपल्या शब्दात प्रस्तुत करून, सांगत होते. परंतु त्यांना शब्द संपदा पुरवायला, स्वये देवी शारदा, कौतुकाने पहात अवकाशात उपस्थित आहे, असच भासत होतं. अत्यंत बहारदार अश्या या समृद्ध आणि उन्नत प्रदेशात आपलं वास्तव्य होणार आहे,या कल्पनेने राजलक्ष्मी वैदेही, हरखून गेली होती आणि भान हरपून, आपल्या स्वामींचा प्रत्येक शब्द, कर्णावाटे, हृदयत साठवून घेत होती. 

त्याचवेळी देवी सीता, एकूणच या वातावरणाच्या आणि निसर्गाच्या प्रभावात भारलेली होती.भ्राता लक्ष्मण, सुरक्षा अवलोकन करण्यात मग्न होता. कारण परिसरातील निसर्गापेक्षा, भ्राता आणि देवी सीता यांच्या संरक्षणाच्या चिंतेने व्याप्त होता. त्यामुळे त्याचं ऐकण्याकडे कमी ध्यान होतं. हे जाणून, प्रभूंनी, लक्ष्मणाला प्रुच्छा केली, 

" हे अग्नीलोचनी लक्ष्मणा, या अत्यंत सुंदर निसर्ग शोभा असलेल्या वनात, पुढील चौदा वर्ष व्यतीत करण्याचा माझा मानस होतो आहे. त्याबद्दल तुमच्या दोघांचं काय मत आहे, हे मला जाणून घ्यायचं आहे." 

देवी सीता म्हणाली

" आपण जो निर्णय घ्याल तो योग्यच असणार. मी आपल्या कोणत्याही निर्णयात आपल्यासह आहेच. मी आणि आपण भेद माझ्यासाठी गैर आहे. आपण जिथे न्याल, तिथे माझा स्वर्ग असेल. त्यामुळे मी आपल्या मागे येईन, हे वचन तर मी आपल्याला विवाहात दिलेलं आहेच. त्यासाठी काहीही करण्याची माझ्या मनाची पूर्ण तयारी आहे. भ्राता लक्ष्मण तुझं काय मत आहे." 

लक्ष्मण क्षणाचाही विलंब न करता, नम्रपणे म्हणाला. 

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा, ही नम्र विनंती. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
०५/०७/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...