Skip to main content

राम अनुज भरत भाग ३०(श्रीराम व लक्ष्मण यांचा ज्ञानप्रबोधप्रद संवाद -१)

राम अनुज भरत भाग ३०
(श्रीराम व लक्ष्मण यांचा ज्ञानप्रबोधप्रद संवाद -१)
श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.

प्रभूंनी आपल्या प्रेमळ, स्निग्ध हस्त स्पर्शाने, त्याचे मन स्नेहाने व करुणेने भारून टाकले. तद्नंतर ते वदले.

" हे लक्ष्मण, सर्वात प्रथम भरत हा तुझा ज्येष्ठ भ्राता आहे. त्याबद्दल असा अनुचित विचार करणे, तुला शोभायमान नाही. दुसरं, त्याच्या देहात, रघुकुलाचं दिव्य रुधिर, नसा नसात खेळत आहे. त्यामुळे, असला अनुचित विचार तो करणं अशक्य आहे. कृती तर तो स्वप्नात सुद्धा करणार नाही. मी जसा पितृ आज्ञेने बद्ध होऊन, इथे वनात आहे. तसाच माझा अनुज भरत सुद्धा मातृ आज्ञेने बद्ध होऊन, राज्यपदी विराजित झाला असणार. तोसुद्धा रघुकुल दीपक आहे. 

तिसरं म्हणजे, तो, राज्यपद प्राप्ती पश्चात, ज्येष्ठ भ्राता या नात्याने, स्नेहयुक्त अंतःकरणाने, माझा आशीर्वाद घेण्या साठी येत असणार. सर्वात शेवटी आणि सर्वात महत्वाचं तत्व ध्यानात घे. ज्यावेळी तुम्हाला तुमच्या सामर्थ्यावर पूर्ण श्रद्धा आणि शाश्वती असते, त्यावेळी अवचित क्रोध, अति उत्साह किंवा भय तिन्ही गैर आहे. 

त्यामुळे तुमच्या आत्मिक, मानसिक व शारीरिक बलावर विपरित व नकारात्मक परिणाम होतो. मनाची अति चंचलता, कोणत्याही स्थितीत अत्यंत घातक असते. माणूस अति उत्साही किंवा हतोत्साहित होण्याचा संभव असतो. हे दोन्ही अवगुण आहेत आणि ते गैर आहेत. कारण दोन्हींमध्ये अयोग्य वक्तव्य किंवा कृती होण्याचा धोका संभवतो.

म्हणून प्रत्येक मानवाने चित्ताची स्थिरता, शांतता व गंभीरता साधण्याचा नित्य अभ्यास व प्रयास केला पाहिजे. प्रयासाने अशक्य या जगतात काहीही नाही. किंबहुना प्रयासाने नराचा नारायण होऊ, शकतो, हे तू जाणतोस. याच प्रयासाला सातत्याची जोड मिळाली की तो प्रयास साधनेत परिवर्तित होतो. साधना हा अनेक क्षेत्रांचा, शास्त्रांचा, विद्येचा, भक्तीचा प्राण आहे. साधना माणसाला अंशातून, परम अंशात मार्गस्थ करू शकते. हे निर्विवाद सत्य आहे.

सर्व जगतात हाच प्राण व्याप्त असतो. तो चराचरात भरून, उरलेला आहे. तो अन्यत्र नाही, तर इतरत्र आपल्या आजू बाजूला आहे. अर्थात तो तुझ्या माझ्या सह, प्रत्येक देहातील पंचप्राणात आहे. स्थिर, शांत मनाने सातत्य पुर्ण रीतीने केलेले कोणतेही साधन, हे आपल्या साध्यापर्यंत नेते. म्हणून हे लक्ष्मणा प्रत्येक कार्याचा प्राण हे मन आहे. 

या मनाच्या स्थिरतेसाठी सुद्धा अन्यत्र जाण्याची किंवा अन्य काही शिकण्याची आवश्यकता नाही. ती स्थिरता मुळात देहातील बुद्धी व मन यांच्या एकग्रतेत आहे. ही एकाग्रता बुद्धिसह मनाला आत ओढून प्राप्त करावी लागते. एकाग्रता हा साधनेचा प्राण आहे. म्हणून ही एकग्रता प्राप्त करण्याचा प्रयत्न मानवाने केल्यास, योग्य साधन घडून, अनेक अलौकिक कार्ये, हाच देह लीलया करू शकतो. याचाच अभ्यास शास्त्र म्हणून, सिद्धता आणि कौशल्य प्राप्तीसाठी, युगानुयुगे अगणित ऋषी वरांनी केलेला आहे.

त्यांच्या अभ्यासाला, प्रयास, स्थिरता, एकग्रता यांच्यामुळे यशप्राप्ती मिळाली. म्हणून हे लक्ष्मणा, तू म्हणालास की, मी इतका धीर, गंभीर, स्थिर व शांत राहू शकतो. शांतपणे विचार करण्याचा एक लाभ म्हणजे सखोल विचार करण्याची व निर्णय घेताना, योग्य अयोग्य यांचे सर्व पैलू विचारात आणून, मग त्यातील योग्य तो एक विकल्प निवडण्याची क्षमता प्राप्त होते. स्थिर मनाने विचार करण्याने , माणूस चुकीचा विचार करू शकत नाही. 

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा, ही नम्र विनंती. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
०८/०७/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...