राम अनुज भरत भाग ३९
श्रीराम जयराम जय जयराम!!
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.
ईंगुदी पासून तयार केलेल्या पिंडाच्या, प्रभूंच्या कल्पनेला, गुरुदेवांनी दुजोरा देऊन, पिंडदानाच्या मंत्र उपचारास प्रारंभ केला. विधिवत पिंडदान आदी प्रेतकार्य व मर्त्यक कार्य संपन्न होत होते. स्वतः महर्षी वसिष्ठ याचं संचालन करत होते. याच दरम्यान, श्रीरामांच्या सूचनेप्रमाणे आर्य सुमंत, तीनही राण्या, स्नुषा आणि समस्त राज परिवार, याना घेऊन आले.
माता कौसल्या, तिथे आल्यापासून, तिच्या नजरेने, पुत्र राम याचा शोध सुरू केला होता. पती निधन आणि अत्यंत लाडका एकमेव पुत्र राम याच्या विरहात शोकमग्न माता कौसल्या, अन्न त्याग केल्यामुळे, गेल्या काही दिवसात कृश झाली होती. तिला मांडवी आणि सुमित्रा यांनी धरलं असल्यामुळे, माता संथ पावलांनी एक एक पाऊल टाकत मंद गतीने, मंदाकिनी घाटाकडे पोचली. अती कृश झाल्यामुळे मातेच्या दृष्टीवर सुद्धा त्याचा परिणाम झाला होता. त्यामुळे मातेने दुरून, घाटावर पिंडदान क्रिया चालली होती, तिथे पाहिलं.
वनातील जीवनामुळे, मृत्तिकेने आणि उन्हाशी संबंध आल्यामुळे असेल, मूळ नील वर्णी असलेली श्रीरामाची कांती, किंचित तापलेली किंवा मातकट रंगाची झाली होती. माता कौसल्या हिने, दुरूनच, प्रभूंना श्राद्ध कार्य करताना पाहिले. पुत्रविरही व्याकूळ लोचनात अश्रू धारा सुरू झाल्या. पुत्राला, राजवाड्यात, राजमहालात, समस्त अयोध्येत, परिवारात, प्रजेत, गुरुगृही, कौतुकात, स्वागतात, जनांच्या हृदयात हर्षे उल्हासे वावरतांना पाहिलं.
तोच पुत्र आज या इथे वनात पाहून, मातेच्या नेत्रातून अखंड अश्रूंची रत्नमाला सुरू झाली. त्या ओघळणाऱ्या अश्रूंना, मातेच्या गालावरून पुसणाऱ्या मांडवीला, माता म्हणाली.
" हे मांडवी, आता हे अश्रूच माझे सोबती आणि सांगाती आहेत. यांना आता माझ्या नित्य समीप राहूदे. त्यांना पुसण्याने, त्यांचं येणं थांबेल का.? हे अश्रू आता दीर्घ काळ माझेच राहणार आणि येतच राहणार. पतीच्या दुःखद स्वर्गात जाण्याचं अतीव दुःख आणि त्यावर कडी म्हणून, पुत्राच्या विरहाचं अती वेदनादायक दुःख, हेच आता या दुर्दैवी मातेचं जीवन आहे."
हे इतके बोल सुद्धा अत्यंत कष्टाने उद्गारून, मातेने आपले शरीर, गतप्राण झाल्याप्रमाणे, मांडवीच्या खांद्यावर सोडून दिले. मांडवीने मातेचा कृश झालेला देह सावरून, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.माता कौसल्या थोड्या सावरू न बसल्याचे पाहून, मांडवी म्हणाली.
" माता, आपण चिंता करू नये. आर्यपुत्र राजकुमार भरत यांनी प्रण केला आहे की, ते सर्व प्रकारे प्रयत्न करून, ज्येष्ठ भ्राता श्रीराम याना, अयोध्येला परत घेऊन येतील आणि त्यांना अभिषिक्त करून, अयोध्येचे महाराज म्हणून राज्यावर स्थापित करतील. आपण ईश्वराकडून, कृपेची याचना आणि अपेक्षा करून, त्याचीच प्रार्थना करत राहू."
मांडवीच्या शब्दांनी थोडासा हुरूप आलेली माता कौसल्या, मांडवीकडे कौतुकाने पहात होती. दोन्ही माता सुमित्रा आणि कैकयी हा हृद्य सोहळा, अश्रुयुक्त नयनांनी, पहात होत्या.
श्रीराम जयराम जय जयराम!!
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!
ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा, ही नम्र विनंती.
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
१७/०७/२०२३
9049353809
9960762179
Comments
Post a Comment