राम अनुज भरत भाग २३
श्रीराम जयराम जय जयराम!!
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.
महर्षी उन्मनी ध्यान लावून, पुढे म्हणाले
"तिथे जाणारा संपूर्ण मार्ग, वनातून जातो. या मार्गाने जाताना, तुमचं सैन्य आणि प्रजाजन यांचा,वन्य जीव, मूल निवासी आदींना कोणताही उपद्रव होणार नाही, याची काळजी घ्यायला सांगा."
यावर भरताने महर्षी भारद्वाज यांना सांगितल की,
" आपल्या आज्ञेनुसार, वनातील वन्य जीव, मूलनिवासी आदीना, कसलाही उपद्रव होणार नाही,याची स्पष्ट सूचना सैनिक, मंत्री, अधिकारी आणि जनसाधारण याना देण्यात येईल."
पुढे नम्रपणे भरत महर्षींना म्हणाला
" माता कौसल्या याना आपली विशेष भेट घेण्याची मनीषा आहे."
मुनिवर म्हणाले
" अवश्य घेऊन ये, यात विशेष अनुमतीची आवश्यकता नाही."
भरताने विनम्रतेने अनुमती स्वीकृत करून,माता कौसल्या याना घेऊन, तो उपस्थित झाळा.
भारद्वाज ऋषींनी मातेला म्हणाले.
"राजमाता आपल्याला प्रणाम. आपण दुःख, शोक आणि पुत्र विरह यामुळे कृश दिसता आहात. "
यावर भरत क्षमा मागत म्हणाला
" हे सूर्यतेज धारण केलेले तपोनिधी, मातेने ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांच्या वनात गमन आणि पिताश्री महाराज दशरथ यांच्या दुःखद निधनापश्र्चात उपवास धारण केलेला असल्या कारणाने, त्या अशक्तपणामुळे कृश झाल्या आहेत. या सर्वाला कैकईचा राज्य लोभ कारणीभूत आहे."
यावर,त्रिकाल ज्ञानी आणि श्रीराम जन्माचं अंतिम प्रयोजन जाणणारे महर्षी भारद्वाज अत्यंत शांतचित्ताने आणि आपल्या धीरगंभीर स्वरात वदले.
" हे परमप्रतापी, महावीर रघुकुल नंदन भरत, श्रीरामाच्या वनात जाण्याने, समस्त जगतासह, त्रिलोकाच कल्याण आहे. आपण व्यर्थ त्रागा करू नये, इतकचं मी सांगू इच्छितो."
याहून जास्त महर्षी सांगू शकत नसल्यामुळे, त्यांनी माता कौसल्या यांना, पुत्र विरहापेक्षा, पुत्राची प्रतिमा मनपटला वर आणून, त्याचेच स्मरण करण्यास सांगितले. हेदेखील सांगितले की, श्रीरामांची प्रतिमा आणि त्याचं अखंड स्मरण आपल्या सर्व कष्ट चिंता आणि विवंचना दूर करेल.
त्यांनी सर्वांना शुभाशीर्वाद दिला. सर्वांनी, समस्त आश्रम वासिय जनांच्या, पाठकांच्या, ब्रम्हवृंदांच्या आगत्याचे कौतुक केले. आता प्रस्थान ठेवण्याचा समय आला आणि भरताने आर्य सुमंत यांना सर्व सैन्यासह, प्रजाजन, परिवार यांच्यासह, सर्वांना प्रस्थानाची आज्ञा दिली.
अवकाशातून, प्रत्यक्ष नारद मुनी स्वतः हा सर्व भाव सोहळा आणि सर्वांचं, श्रीराम यांना घेऊन येण्यास जाणं, अवलोकत होते. वरून हा जनसागर एखाद्या युद्धासाठी निघाला आहे असाच भास होत होता. अत्यंत अल्प गतीने,अयोध्येच्या सेनेचा आणि प्रजेचा हा सागर अविरत आपल्या लक्षाप्रती जात होता. या जनसागराच्या जयजयकाराच्या, वाद्य, मृदंग, भेरी, तुताऱ्या, ढोल, यांच्या गजरामुळे, वनातील वाघ, सिंह, यांसारखे हिस्त्र पशू सुद्धा भयभीत होत होते.
हत्तीचे कळप, हा कोलाहल ऐकून, आपला परिक्रमेचा मार्ग सोडून, भितिग्रस्त होऊन, इतरत्र सैरावैरा धावायला लागले होते. अन्य समयी या विस्तीर्ण वनात, मूलनिवासी, वन्य वसाहतीत राहणारे मनुष्य व इतर सर्व जीव, काही संकटं, युद्धजन्य परिस्थितीची भीती वाटून, वनावर काही परचक्री आक्रमण जाणून, अविचल होऊन, सुरक्षित स्थानाच्या शोधार्थ पळायला लागले होते.
श्रीराम जयराम जय जयराम!!
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!
ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा, ही नम्र विनंती.
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
०१/०७/२०२३
9049353809
9960762179
Comments
Post a Comment