Skip to main content

राम अनुज भरत भाग ३६(राजाची कर्तव्ये -२)

राम अनुज भरत भाग ३६
(राजाची कर्तव्ये -२)

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.

याचं कारण तुला सांगतो, म्हणजे ही संगती तुझ्या ध्यानात येईल. याचं कारण म्हणजे, तुझ्या अत्यंत निकट असणार, म्हणून ते सुरक्षा अंगरक्षक हे अत्यंत विश्वासू असावेत. जेणेकरून, त्यांच्यावर तू अवलंबून राहू शकशील. पण हे अवलंबित्व, अर्थातच पूर्ण काळजी घेऊन असावं.

तू राजा म्हणून प्रजेशी तुझी असलेली बांधिलकी, कधीही विसरत नसशील ना. तू अष्टौप्रहर, फक्त प्रजेशी बांधील आहेस, हे तू नक्कीच, राजा म्हणून तुझ्या मनात ठसवून घेतलं असशील. 

तू हे देखील नक्कीच जाणत असशील की, तू राजा म्हणून ईश्वराचा अंश आहेस. त्यामुळे नैतिकता हे तुझं अधिष्ठान असलं पाहिजे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अनैतिक कृत्याशी,वागण्याशी,व्यक्तींशी अथवा विचारांशी तुझा दुरान्वयानेही संबंध असता कामा नये. 

तू राजा या अर्थाने, नित्य, न्यायाशी बांधलेला आहेस ना. कारण राजाकडून, प्रजा, मंत्री, सचिव, अधिकारी, सेवक हे सर्वच न्यायाची अपेक्षा करतात. याच सूत्राने तुझं, न्याय मंडळ मांडलं गेलं आहे ना. न्यायासना समक्ष येताना, कोणत्याही सर्वसामान्य प्रजाजनाला, सुरक्षित आणि मनमोकळ वाटतं आहे ना, याची तू तटस्थ व निष्पक्ष चाचणी, सदैव ठराविक काळाने घेत असशील, असा मला विश्वास वाटतो आहे. 

हे कैकयी पुत्र भरता, तू आपल्या सर्व शत्रू राज्यांना, आपल्या खड्ग बाण यांच्या धाकात ठेवून आहेस ना. त्याचप्रमाणे त्यांच्यापासून, प्रजेतील प्रत्येक व्यक्तीला भयमुक्ति देणं, हे राजा म्हणून तुझ आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी तुझं सैन्य, रथादी वाहनं यांची निगराणी, अश्व, गज आदी प्राण्यांची सिद्धता आणि या सर्वांची देखभाल, स्वयमेव तत्वाने होत आहे, याची तू खात्री करून घेत असशील. 

स्वयमेव तत्व म्हणजे ज्यांच्या हाती, ही वाहनं आणि हे महत्वाचे प्राणी आहेत, ते स्वतःहून, आस्थेने, या सर्वांची व्यवस्था, देखभाल, चारापाणी, आरोग्य सुविधा यांची पुरेशी काळजी आपणहून बघत आहेत ना. या सर्व वाहनादी व्यवस्थेच्या चोखपणावर, सुदृढतेवर, तुझा युद्धातील जय अवलंबून आहे. 

तू राजा म्हणून ज्या तऱ्हेने तुझ्या प्रजेच्या कल्याणाशी नित्य बांधील आहेस, त्याचप्रमाणे, तू तुझ्या सैन्याच्या मनोबलाशी सुद्धा बद्ध आहेस. नव्हे ते अत्यंत आवश्यक सूत्र आहे. कारण सुदृढ देह आणि सुस्थित देह व मनोबल असलेलं सैन्य, कितीही बलवान सैन्याला तोंड देऊन आपल्या राज्याला विजयी करू शकतं. 

त्यासाठी ते पूर्ण सक्षम आहेस ना, याची खातरजमा तुला नित्य घेत राहणं आवश्यक आहे. त्याची पूर्ण व्यवस्था तू तुझ्या सेनापती मार्फत, करवून घेत असशील. तरीही तू स्वतः, त्यात ठराविक कालांतराने, ध्यान देत आहेस ना. 

तू एक राजा म्हणून तुझ्या राजधर्माला अंगिकारत असशील. किंबहुना धर्म, अर्थ, न्याय व संरक्षण ही प्रत्येक राजाची चतुःसूत्री आहे आणि उत्तम राज्य व्यवस्थेचा प्राण आहे. राज्यातील प्रजेचं कल्याण हा धर्म, योग्य व न्यायिक पद्धतीने कर संचय करणं व राजकोशात जमा धनाचा, उचित, योग्य व नियमबद्ध पद्धतीने यथार्थ विनियोग करणं, हे देखील राजाचं नैमित्तिक अर्थ कर्तव्य आहे. यात संकलनात कोठेही अन्याय व विनियोगात कोणताही दुर्व्यवहार होणार नाही, हे योग्य पद्धतीने घडवून आणणं हा तुझा धर्म आहे. तसच त्यावर नियंत्रण ठेवणं तुझं कर्तव्य आहे.

प्रभू या पद्धतीने, भरताला, एक उत्तम राज्यकर्ता होण्याच्या दृष्टीने, बोधवचन करता करता, अचानक थांबले ......

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा, ही नम्र विनंती. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
१४/०७/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...