राम अनुज भरत भाग ४८
(श्रीरामांचा दृढ संकल्प आणि भरताचा दृढ निश्चय)
श्रीराम जयराम जय जयराम!!
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले..
वसिष्ठ ऋषींच्या या कथनावर अयोध्यावासी, आर्य सुमंत, आणि परिवारातील मंडळींना आशेचा किरण दिसायला लागला. आचार्य पुढे म्हणाले.
" हे राघवेंद्र, प्रत्येकाला आयुष्यात तीन गुरू असतातच. माता, पिता आणि गुरू. पिता आपल्या पुत्राला देह प्रदान करतात या अर्थाने ते त्याचे प्रथम सद्गुरू आहेत. माता त्याला नऊ महिने गर्भात धारण करून, जन्म देते, त्यामुळे ती दुसरी गुरू ठरते. सद्गुरू पुत्राला, विद्या, ज्ञान प्रदान करून,जगण्याला दिशा व अर्थ प्रदान करून, पुरुषार्थ सिद्धीचा मार्ग आणि मोक्षाची सिद्धता प्रदान करतात.
हे रामचंद्रा, या सर्व गुरूंनी सिद्ध केलेला पुत्र सर्व कर्म व कर्तव्य करण्यास, पात्र ठरतो. त्यामुळे यातील कोणत्याही एकाचं कथन न ऐकणं, कोणताही वचनभंग ठरत नाही. कारण जर तो धर्म मार्गी असेल आणि आपल्या परंपरेचा पालनकर्ता असेल तर, नक्कीच त्याचा सर्वांना अभिमान वाटेल.
दुसरं म्हणजे अनुज भरत याचा आर्जव मान्य करून, तू जर अयोध्येला परत येऊन राज्यपट स्वीकारलास, तरीही तू कुठलाही वचनभंग करणार नाहीस, हे मी स्वतः तुला सांगतो आहे. हे पुरुष प्रवर, इथे आलेले प्रजाजन, अनुज भरत शत्रुघ्न, मंत्री, सचिव, अधिकारी, परिवार यांच्या विनंतीला मान देऊन, तू धर्मपर कार्य केलंस, तरीही तू कोणत्याही पाप कर्माचा धनी होणार नाहीस.
तू माझ्या आज्ञेचे पालन करून, कोणतंही अधर्म कृत्य करत नाहीस, याची मी तुला खात्री देतो. तू एक थोर मातृभक्त आहेस. त्यामुळे आपल्या मातेचा आर्जव ऐकून, त्यानुसार निर्णय घेतलास तर ते एक धर्म कर्म ठरेल."
या प्रकारे महर्षी वसिष्ठ यांनी आपल्या तर्क बुद्धी व ज्ञान यानुसार प्रभूंना हरप्रकारे, समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आता सर्वांच्या नजरा प्रभूंच्या चर्येवर स्थिरावल्या.
महर्षी वसिष्ठ गुरूवर यांच्या या प्रिय वचनांनी विचलित न होता, परंतु आपल्या मर्यादा स्वरूप स्वभावाची मर्यादा उल्लंघनही न करता, प्रभू अती मृदू स्वरात म्हणाले.
" हे सत्पर्षी शिरोमणी, महातेजस्वी, महाज्ञानी गुरुदेव वसिष्ठ, आपल्या कथनाला मी प्रणाम करतो. परंतु माता आणि पिता आपल्या पुत्रांसाठी सदैव उत्तम देण्याचा प्रयत्न करतात. त्यांना उत्तम अन्न, उत्तम निवारा आणि उत्तम बिछाना प्राप्त होईल,याचीच ते सदैव चिंता करतात. माझ्या माता पित्यानी तर मला, जगतातील सर्व उत्तम प्राप्त होईल, याचीच चिंता सतत केली आहे. त्यांनी आपल्या मर्जीने, माता कैकयीला दिलेल्या वचनाची पूर्तता करणं हेच माझं आद्य व परम कर्तव्य आहे. त्यापासून ढळणारा कोणताही विचार वा मनोगत मी स्वीकारू इच्छित नाही."
प्रभूंच्या या वचनांनी, महाबली भरत, अत्यंत निराश झाला. त्याच मनःस्थितीत भरत आर्य सुमंत याना म्हणाला.
" आर्य, जर ज्येष्ठ भ्राता, कुलभूषण श्रीराम यांचा हाच निश्चय असेल तर, आपण शीघ्र, तृणाची चटई आणून द्या. मी इथे या प्रभू चरणांशी बैठक मारून, धरणं धरतो."
आर्य सुमंत, प्रभूंच्या मुखाकडे, आज्ञेसाठी पाहू लागले. आर्य सुमंत काहीही हालचाल करत नाहीत, हे पाहून, श्रीराम यांच्या बाजूला बसलेला भरत, स्वतः उठून उभा राहिला आणि त्याने थोड्या दूर अंतरावर पडलेली दर्भाची चटई उचलून आणली. ती चटई त्याने खाली जमिनीवर मांडली आणि खाली जमिनीवर मांडून, त्यावर बैठक मारून बसला. त्याने तसे केलेले पाहून, प्रभू विस्मयित झाले.
श्रीराम जयराम जय जयराम!!
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!
ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा, ही नम्र विनंती.
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
२६/०७/२०२३
9049353809
9960762179
Comments
Post a Comment