राम अनुज भरत भाग ३७
(शोकाकुल श्रीराम)
श्रीराम जयराम जय जयराम!!
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.
प्रभू अश्या रीतीने, भरताला,एक उत्तम व आदर्श राज्य कर्ता होण्याच्या दृष्टीने, बोधवचन करता करता, अचानक थांबले. इतका समय, भावविभोर अवस्था आणि तदनंतर, राज्याची नित्य कर्तव्य, यांचां बोध भरताला देताना, प्रभू, एक गोष्ट विसरून गेले, जी आता त्यांच्या ध्यानात आली. भरत हा राजवस्त्रां मधे आला नसून, तो वल्कलं आणि मृगचर्म परिधान करून, जटा बांधून, अनवाणी पायाने, आपल्याकडे आला आहे. इतक्या समयात, भावनेच्या भरात आणि भरताच्या भेटीच्या नादात, आपलं लक्ष गेलं नाही, याचं वाईट वाटून, प्रभू म्हणाले.
" हे अनुज, इतक्या समयात आमच्या लक्षात आलं नाही. वास्तविक, तू आलास, तेंव्हाच ध्यानात यायला हवं होतं, पण आता आमच्या लक्षात आल की, तू राजा असून राजवस्त्रात का नाहीस आणि पिताश्री का आले नाहीत. कदाचित, मला या वनवासाची आज्ञा दिल्याचं ओझ मना वर असल्यामुळे, त्याना माझ्या समोर येण्यास संकोच वाटत असावा. पण त्यांनी अशी आज्ञा देऊन, रघुकुलाची उच्च परंपरा पालन केलं आहे. म्हणून त्यांना संकोच वाटायची आवश्यकता नाही. माझा संदेश आणि माझा साष्टांग दंडवत पिताश्री, रघुकुल भूषण महाराज दशरथ याना जरूर सांग. "
ज्येष्ठ बंधू श्रीराम यांचे हे शब्द ऐकून,भरत, दुःख:तिरेकाने अतीव वेदना पुन्हा जागृत झाल्यामुळे,अश्रुमय आवाजात कापऱ्या स्वरात म्हणाला.
" हे रघुनाथ,कैकयीचा हट्टाग्रह पूर्ण करण्याच्या कर्तव्यात, पिताश्री, तुमच्या वियोगाच्या दुःखात, तुमच्याच नावाचा जाप करत करत, देवलोकाला प्राप्त करते झाले. कैकयी मुळे, आपलं दुर्दैव, इतकं कठोरपणे उद्भवलं की, मृत्यु समयी, चार पुत्रांपैकी एकही पुत्र,त्यांना गंगाजल तुलसी पत्र देण्यासाठीसुद्धा उपस्थित नव्हता.याला मानव निर्मित दुर्दैव, यापेक्षा अधिक योग्य काय म्हणणार, ज्येष्ठ भ्राता. "
इतक जेमतेम भरत बोलू शकला,त्याच्या चर्येवर दुःख: पेक्षा अगतिकता आणि कैकयीच्या कारस्थानामुळे घड लेल्या सर्व विपरीत परिस्थितीचा संताप जास्त दिसत होता. "
प्रभूना सुद्धा प्रचंड मानसिक आघात झाला. पण तरीही त्याला समजावण्याच्या प्रयत्नात म्हणाले.
" हे सौम्य, हा सर्व नियतीचा खेळ आहे, यात माता कैकयीचां काहीही दोष नाही. मातेला अकारण दूषणं देणं राघुकुल भूषण भरत, याला शोभायमान नाही. तू मातेचं नाव घेऊन संबोधन करायला कधीपासून सुरुवात केलीस. ही परंपरा, धर्म आणि संस्कृती विरोधी आहे, इतकेही तुला ज्ञात नाही. हे करताना आपल्या बेचाळीस पिढ्यांनी जोपासलेल्या उच्ध परंपरेचा, तुला कसा काय विसर पडला. "
भरताने खजील होऊन, विनम्रपणे आपल्या ज्येष्ठ बंधूची क्षमा प्रार्थना केली. या चुकीच्या बोलण्याला दुरुस्त करण्याच्या नादात, आपण मुख्य संदेश विसरलो आणि पिताश्रीच्या मृत्यूचा धक्का अचानक श्रीरामांना भानावर घेऊन आला. क्षणात, अत्यंत कारुण्यमय अवस्थेत, विश्र्व मुर्ती, जगत्पती श्रीराम, "पिताश्री" असा आर्त, गगन भेदी टाहो फोडत, अंगातील त्राण जाऊन, अंगातील सर्व बल गेल्यासमान, खाली कोसळले.
ते आपले दोन्ही तळहात, भूवर आपटून, अतीव दुःखाने , पिताश्रीना आर्त साद घालू लागले. तद्नंतर, त्यांनी बसल्या बसल्या, आकाशाकडे पाहून, आक्रांदत वेदना दायक साद घालत म्हटले.
" हे माझ्या कर्मांनो, या आघाताचा हा विषप्राय प्याला, मला द्यायचा सोडून, माझ्या परमपूज्य, पुण्याप्रतापी, देव तुल्य, महाराज दशरथ याना का पाजलात. माझ्या घोर अपराधाचं परिनार्जन, करण्यासाठी, पितृ आज्ञा बद्ध मी, त्यांना एकटं सोडून, प्रायश्चित्त करण्यासाठी या वनवासात आलोच होतो. पण तो घाव माझ्या पिताश्रीना कमी होता, म्हणून तू त्यांना माझ्या विरहाच्या दुःखातून ओढून, देहातून स्वर्गात घेऊन गेलास."
असं बोलून अत्यंत शोकविव्हळ अवस्थेत, प्रभू रुदन करायला लागले. इकडे भ्राता लक्ष्मण या दुःखद वार्तेने दुःख: सागरात लोटला गेला. तो त्याच अवस्थेत गेला,ज्या अवस्थेला, प्रभू श्रीराम पोचले होते.
श्रीराम जयराम जय जयराम!!
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!
ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा, ही नम्र विनंती.
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
१५/०७/२०२३
9049353809
9960762179
Comments
Post a Comment