राम अनुज भरत भाग ४९
श्रीराम जयराम जय जयराम!!
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले..
ती चटई राजकुमार भरत याने खाली जमिनीवर मांडली आणि खाली जमिनीवर मांडी घालून, त्यावर बैठक मारून बसला. त्याने तसे केलेले पाहून, प्रभू विस्मयित झाले. त्याच विस्मयकारक भावात प्रभू भरताला म्हणाले.
' हे अनुज भरत, हे काय आरंभले आहेस. मी माझ्या कर्तव्याच्या आणि आज्ञा पालनाच्या मार्गावर जात असताना, माझा मार्ग अडवण्यासाठी, काय हे धरणे धरून बसला आहेस. हा हट्ट सोड आणि पिताश्रीच्याच आज्ञेने पालन करून, धर्म निभावून ने. त्यातच सर्वांचे भले आहे."
हे ऐकून भरत हताशपणे, जमलेले प्रजाजन यांच्याकडे पाहून म्हणाला
" हे अयोध्या प्रजाजन हो, माझ्या या हट्टाला आपणही साथ देऊन, ज्येष्ठ भ्राता श्रीराम याना विनवून, पुन्हा माघारी येण्यासाठी आग्रह करावा."
भरताच्या या बोलांनी काही महाजन पुढे येऊन म्हणाले
" रघुकुल भूषण कुमार भरत, आपला आग्रह रास्त आहे. पण तरीही पितृ आज्ञेचे पालन करण्याचे वचन दिलेले श्रीराम, यांचे कथन योग्यच आहे. त्यांना पितृ आज्ञेचे पालन करणे क्रमप्राप्त आहे."
प्रजेचे हे म्हणणे ऐकून, श्रीराम म्हणाले,
हे महाबाहो, तू तुझा हट्टाग्रह त्यागून, येथून माघारी जावेस हे सर्वथा उचित आहे."
हे सर्व संवाद व दृश्य पाहणारे आणि लंकाधिपती रावण याच्या वधाची कामना करत असलेले, अवकाशात उपस्थित सुरवर, महर्षी, महान ऋषीमुनी व गंधर्व भूवर उतरून आले आणि भरता समोर हात जोडून, त्याला म्हणाले,
"हे रघुनंदन, काकुस्थ, आपले ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांच्या वचन पूर्तीच्या मार्गात, आपण अडसर निर्माण न करता, आपण सर्व मिळून श्रीरामांना त्यांच्या वचन पूर्तीच्या यशासाठी कामना करूया. आपण हा दुराग्रह सोडून, श्रीरामांच्या कथनाचा विनम्रपणे स्वीकार करून, त्यांचा पुढील मार्ग प्रशस्त करून द्यावा."
इतकं विनवून, प्रभू, देवी जानकी, शेषावतारी लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि माता, आचार्य याना अभिवादन करून, सुरवर, गंधर्व आदी सर्व, अंतर्धान पावले. तत पश्चात, प्रभूंनी अत्यंत प्रसन्नता पूर्वक आणि अत्यंत शांत आणि गंभीर स्वरात, भरताला संबोधित केलं.
" हे परम प्रतापी, कैकयी नंदन, तुझा हा हट्ट अनावश्यक आहे. मी माझ्या वचनांनी बद्ध असून, कोणत्याही स्थितीत, यातून सुटका करून घेण्याच्या मनस्थितीत नाही."
भरत यावर म्हणाला.
" हे नवनीत हृदयी, सूकोमल मनाचे स्वामी, आपल्या या दुढ निश्चयाने, प्रत्यक्ष काळाला सुद्धा संभ्रमात, टाकलेले आहे. यावर माझ्या मनात एक भाव येत आहे की, मी या समस्त अयोध्येचे राज्य चालवण्यास सक्षम नाही. म्हणून माझा असा आर्जव आहे की, आपण आपल्या ऐवजीं आपला प्रतिनिधी म्हणून मला,आपल्या जागी, वनवासात जाण्याची आज्ञा द्यावी व आपण हे अयोध्येचे सार्वभौम राज्य, आपल्या हाती घ्यावे."
यावर स्मित करून, प्रभू म्हणाले.
" हे भरता, पिताश्री महाराज दशरथ यांची आज्ञा, म्हणजे काही राज्याचे मंत्रीपद, सचिवपद किंवा आधिकारिक पद नव्हे, की जिथे प्रतिनिधी नेमून, कार्य करवून घेता येईल. ती महाराज दशरथ यांची माझ्यासाठीच केलेली आज्ञा आहे आणि त्याच्या पूर्ततेसाठी मी दिलेलं ते एक वचन आहे. त्याची पूर्तता स्वये मलाच केली पाहिजे, हे ध्यानात घे."
भरताने हताशपणे, श्रीरामांना पाहिलं.
श्रीराम जयराम जय जयराम!!
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!
ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकटच करावा.
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
२७/०७/२०२३
9049353809
9960762179
Comments
Post a Comment