राम अनुज भरत भाग ३५
( श्रीराम भरत भेट आणि राजाची कर्तव्ये -१)
श्रीराम जयराम जय जयराम!!
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.
त्याचे अश्रू पुन्हा पुन्हा पुसत प्रभूंनी त्याला आपल्या जवळ घेत, आलिंगन देत हृदयाशी धरले.दोन्ही हृदयातून स्नेहांकित भावाने,आपापल्या मनातील भाव, एकमेकांना मूकपणे कथन केला.आपल्या मनातील भावना मन मोकळेपणाने व्यक्त करून झाल्यावर,भरताने ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांच्या लोचनात पाहून, अश्रू पूर्ण नयन आणि स्वरात म्हटले.
" का आपल्या अनुजाला, एकटं सोडून, निघून गेलात. माझी आठवण सुद्धा नसेल का झाली आपल्याला. का असं केलत. "
प्रभूंनी, भरताचे दोन्ही स्कंद आपल्या हातांनी धरले आणि अत्यंत धीरगंभीर स्वरात म्हणाले
"हे प्राणप्रिय अनुज,भरता, माझ्या या देहातील नसानसात ज्याप्रमाणे रुधिर वहात आहे त्याचप्राणे, भरत माझ्या देहात, मनात आणि प्राणात व्याप्त आहे.माऊली ज्या प्रमाणे, आपल्या पुत्राला कदापि विसरू शकत नाही. तद्वत, हा राम आपल्या भरताला कधीही क्षणमात्र सुद्धा विसरू शकत नाही. किंबहुना तुझ्या श्वासांचा स्वर आणि मनातील विचार लहरी हे, माझा श्वास आणि मन आहेत, भरता. तुला विसरण अशक्य आहे, याबद्दल कदापिही संदेह करू नकोस."
भरत, श्रीरामांच्या भारलेल्या स्वरांने, स्नेहांकित झाला. श्रीराम पुढे वदले.
" हे भरता, रघुकुल परंपरेने बद्ध मी, पितृ आज्ञेने प्रेरित होऊन, सीता आणि लक्ष्मण यांसह, येथे वनात आलो आहे. अर्थातच तू सुद्धा महाराज दशरथ यांच्या आज्ञेने, राज सिंहासनावर आरूढ झाला असशील. त्यामुळे तुला राजाची काही कर्तव्ये, ज्ञात असतीलच. परंतु तरीही मी ती तुला कथित करतो.
तू नित्य आणि सदैव राजा आहेस, हे ध्यानात असुदे. कारण राज्यपद, ही काही चाकरी किंवा वेतन युक्त सेवा नाही. तर ते एक धर्मकार्य आहे.
तू तुझ्या समोर आलेल्या सर्व प्रश्नांची, समस्यांची सोडव णूक सभेत, सर्व मंत्री, जनप्रतिनिधी, यांच्या समक्ष करत असशील. याचं कारण राजा जो निवाडा करतो, तो सर्वां समक्ष असावा, ज्यामुळे कोणालाही पक्षपात केल्याचा आक्षेप घ्यायची संधी मिळता कामा नये.
तू नेमलेल्या मंत्री व सचिव यांची निवड, स्वतः पारखून केलेली आहेस ना. कारण राजा अनेक कर्तव्ये, निवाडे, यांची कार्यवाही या मंत्री व सचिव यांच्या मार्फत करत असतो. म्हणून योग्य व्यक्तींची,योग्य जागी निवड ही अत्यंत महत्वाची आहे.
तू राजा या नात्याने, प्रजेत फिरताना, आपला प्रजेला धाक न वाटता, राजाबद्दल विश्वास, स्नेह व श्रद्धा वाटेल, याची काळजी घेत असशीलच. नव्हे तू घेशील हा विश्वास आहेच. कारण भीतीयुक्त.भावाने दबलेली प्रजा, अश्या राजाला कधीही मनापासून स्वीकारत नाही.अश्या राजाला, मंत्री व सचिव सुद्धा भीतीने स्वीकारतात. संधी मिळताच, अश्या राजाविरुद्ध कट, कपट व कारस्थान, करून, त्याला बाजूला करण्यासाठी सतत कार्यरत राहतात.
राजा म्हणून स्वतःची सुरक्षा ही अत्यंत महत्वाची आहे. कारण आपण स्वतः जीवित असू, तरच इच्छित कार्य करता येते. म्हणून तू तुझ्या सुरक्षेत, योग्य व्यक्तींची निवड केली असशील. त्याचप्रमाणे त्यांना, सेवेचा कार्यकाळ, सेवेचा वेळ देताना, त्यात एकच सूत्र किंवा एकच नियम असणार नाही, याची देखील काळजी घेतच असशील. याचं कारण तुला सांगतो, म्हणजे ही संगती तुझ्या ध्यानात येईल.
श्रीराम भरताशी निष्ठेने, राज्यशास्त्र या विषयावर बोलत होते.
श्रीराम जयराम जय जयराम!!
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!
ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा, ही नम्र विनंती.
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
१३/०७/२०२३
9049353809
9960762179
Comments
Post a Comment