राम अनुज भरत भाग २२
श्रीराम जयराम जय जयराम!!
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.
या सर्व आतिथ्यानंतर इंद्र, यम, वरुण, कुबेर, यांसह गंधर्व, यक्ष, किन्नर, अप्सरा आणि सुरवर विनम्रतेने महर्षिसमोर अग्निशालेत प्रकट झाले. देवेंद्र दोन्ही कर जोडून अत्यंत नम्रता पूर्वक म्हणाले.
" हे ब्रम्हस्वरुप, बृहस्पती रूप महर्षी भारद्वाज, आपल्या आवाहनानुसार आम्ही आपल्या आतिथिंना स्वर्गीय आतिथ्य देण्याचा प्रयत्न केला. परंतु यात काही न्युन राहिले नाही ना. आपण आपला यजमानाचा धर्म निभावू शकलात, याचा संतोष आपल्याला, आपल्या अतिथिनी दिला असल्यास, आम्हाला आनंद वाटेल."
महर्षी म्हणाले
"हे देवेंद्र आणि यम, वरुण व कुबेर यांसह समस्त स्वर्गस्थ सुर प्रतिनिधीनो,आपण माझ्या अतिथीना पूर्ण समाधान आणि मला सात्विक आनंद प्रदान केलात. त्याबद्दल मी कृतार्थ भावाने, आपल्याला वंदन करून आभार मानतो. आपण आता निजधामाला प्राप्त करू शकता. त्यासाठी माझी अनुमती आहे."
सर्वांनी अत्यंत विनम्रतापूर्वक, महर्षींना सादर वंदन करून, निजधामी जाण्यास्तव अंतर्धान प्राप्ती केली. सर्व निर्गमन झाले, तसा आश्रमाने सुद्धा स्वतःला निद्रेच्या स्वाधीन केलं. ब्राम्हमुहुर्ती संपूर्ण आश्रम, पुन्हा आपल्या नित्यकर्म करून स्नानसंध्या आदी विधीनी विधिवत जागृत झाला.
तिकडे सर्व जनसाधारण उत्तर रात्रीपर्यंत, आयुष्यात प्रथमच प्राप्त झालेल्या स्वर्गीय सुखाने, मस्त, निद्रिस्त झालेले, पहाटे नंतर हळूहळू जागृत होऊन, जे उपभोगलं, जे पाहिलं, जे प्राशन केलं, जे भोजन केलं, ज्या मंचकी पहुडलो, जिथे रात्रभर निद्रादेवीच्या आधीन झालो, ते स्वप्न होतं की, जागृत सुषुप्ती, या चिंतनात मग्न होऊन, जागे झाले.
संपूर्ण परिसर, पहाटे पूर्ववत होत होता. ते उंची कापडाचे डेरे, तंबू, आतील राजेशाही व्यवस्था, त्या भोजनाच्या तयारीचे कुंभ, रांजण, रसपान, क्षीर पात्र, मोठमोठी पात्रे, आतील स्वर्गीय खाद्यान्न, पेये, रस, इत्यादी सर्व जाऊन, पुन्हा, वन, वृक्ष, लता, तरू वेली, असा तो प्रयाग प्रदेश जसाच्या तसा उभा होता. अयोध्यावासी जन, सैनिक, अगदी अश्वादी पशू सुद्धा, रात्रीच्या आतिथ्य प्राप्तीने तृप्त मनाने, राजकुमार भरत आणि राज परिवार व विशेष करून परम प्रिय श्रीराम यांचे, मनोमन आभार मानत होते.
कारण या एकाच कारणाने, सर्वांना सोबत यायला आणि हे आतिथ्य उपभोगायला मिळालं होतं. कृतर्थातेचा हा व्यक्तिगत आणि सामूहिक भाव, चरण सीमेवर पोचला होता. त्याचं वेळी भरत, आर्य सुमंत आणि तीनही माता व स्नुषा महर्षींच्या पर्णकुटीत, महर्षींना, सादर प्रणाम करत होते. इतकं स्वर्गीय आतिथ्य करूनही, महर्षी अत्यंत विनम्रतेने भरत याला म्हणाले.
" सूर्यवंशी, राजपुत्र, रघुकुल भूषण भरत, तुझ्या बेचाळीस पिढ्यांच्या पुण्यकारक लौकिकाला साजेसा पाहुणचार करणं, हे यजमान म्हणून माझं कर्तव्य होतं. ते करणं क्रमप्राप्त होतं. तेच आम्ही केलं. आपण अतिथी म्हणून संतुष्ट झालात. त्यामुळे आम्हाला त्रिदेवांना संतुष्ट केल्याचा लाभ प्राप्त झाला, याचं आम्हाला समाधान आहे."
भरताने यावर, मुनिवरांना, पुढील मार्ग, मार्गाची माहिती आणि प्रस्थानाची आज्ञा मागितली.मुनिवरांनी त्याला पुढील माहिती देताना म्हणाले.
" इथून वाम दिशेने साधारण दश योजने दूर दक्षिणेकडे गेल्यास, मंदाकिनी नदीचा विस्तीर्ण पात्रप्रदेश आहे. त्याच्या वामांगाला दूर अंतरावर चित्रकूट नावाचा पर्वत आहे. मंदाकिनी नदी आणि तो पर्वत यांच्या मधील वनप्रदेशात एक सुंदर साकारलेली पर्णकुटी बांधून, त्यात श्रीराम, देवी सीता आणि बंधू लक्षणं रहात आहेत.
महर्षी उन्मनी ध्यान लावून, पुढे म्हणाले
श्रीराम जयराम जय जयराम!!
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!
ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा, ही नम्र विनंती.
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
३०/०६/२०२३
9049353809
9960762179
Comments
Post a Comment