राम अनुज भरत भाग ४४
(प्रभू भरत आणि प्रभू जाबाली संवाद)
श्रीराम जयराम जय जयराम!!
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले..
जमलेले सर्वजण, भरत आणि प्रभू यांच्या संवादाकडे, आशादायक दृष्टीने पहात होते. प्रभू पुढे म्हणाले
"अविवेकी विचार माणसाला, अनेक कर्म व धर्म संकटात टाकतो. धर्म,अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थ मर्यादा घालून देण्यात आल्या आहेत, त्याचं महत्त्व तू जाणतोस. यामध्ये, जर दोन पुरुषार्थ एकमेकांना छेद देत आहेत असा प्रसंग निर्माण झाल्यास, त्यातील सर्वात श्रेष्ठ व अंतिम जे असेल, ते ग्राह्य मानून, त्यानुसार आपल्या कर्माची दिशा ठरवावी, असं धर्म, निती, शास्त्र आणि महाजन यांचं वचन आहे. आपल्या या समस्येत, राज्य कारभार करणे, पितृ आज्ञा प्रमाण मानणे या द्वैतातून काय मार्ग योग्य आहे, हे खरतर फार क्लिष्ट आहे, असं मला भासत नाही.
याचं कारण म्हणजे, भावनिक दृष्टी, कर्तव्य दृष्टी, धर्म दृष्टी आणि माया दृष्टी अश्या चार दृष्टी सहसा मानवाला अनेक ठिकाणी निर्णय घेण्यासाठी दिलेल्या असतात. यातील भावनिक आणि माया दृष्टी या दोन दृष्टी जन्मतः आणि परिवार व संगती यांच्या कडून प्राप्त होतात. कर्तव्य दृष्टी आणि धर्म दृष्टी या तुलनेने उच्च पातळीवरील दृष्टी असून, त्या सद्गुरू कृपा, ज्ञानप्राप्ती आणि विवेक याद्वारे माणसाला आत्मसात कराव्या लागतात.
ज्या नैसर्गिक आहेत त्या कनिष्ठ अशून, ज्या आत्मसात कराव्या लागतात, त्या श्रेष्ठतम आहेत. पिताश्रीनी दिलेले वर हे त्यांनी आपल्या कर्तव्य बुद्धीने दिले. जे देताना, रघुकुल रीत म्हणून आपल्याला त्याचं पालन करावच लागेल, हे त्यांना ज्ञात होतं, तरीही त्यांनी ते वर दिले.
दिलेला शब्द पालन करणं हा रघुकुल धर्म आहे. जो आपल्या कुळाचा धर्म असतो, आणि तेच आपल कर्तव्य आहे, हे ध्यानात असुदे. याच कर्तव्याच्या पालनार्थ, मी पितृआज्ञा प्रमाण मानून,धर्म आणि कर्तव्य दृष्टीने भावनिक व माया दृष्टीला अव्हेरून, वनवासात आलो आहे. आता तू मला पापाचा भागीदार होण्यासाठी आर्जव करतो आहेस. ते अशक्य आहे भरता."
इतकं बोलून, प्रभूंनी दोन्ही हात जोडून, भरताला विनम्र पणे नकार दिला. प्रभू आपलं कथन करून, शांत झाले आणि महर्षींच्या ब्रम्हवृंदातील जाबाली नामक एक विप्रवर प्रभूंना म्हणाले.
" हे रघुकुल भूषण श्रीराम, या सर्व गोष्टी बाजूला ठेवू. पण एक ध्यानात घ्या की, हे पितृ वचन, त्याचा आग्रह, त्यांचं पालन, हा सर्व एक मिथ्या मोह आहे. मुळात हे जन्म, परंपरा मृत्यू पश्चात जीवन, हेच एक आभास आहे. आपण ज्याप्रकारे व ज्यादृष्टिने याकडे पाहू, त्याप्रकारे, हे सर्व आपल्याला दिसतं किंवा भासतं असं म्हणायला हरकत नाही.
मुळातच आपण मनात योजलेली, पितृ आज्ञा हा एक प्रकारचा तर्क आहे आणि तर्क हा जसा आपण मांडू तसा मांडता येतो. तसा आपल्याला तो दिसतो आणि त्यानुसार आपली बुद्धी भ्रमित होते. म्हणून या मिथ्या व अतार्किक भ्रमात न सापडता, आपण पुन्हा परत जाण्याचा निर्णय घ्यावा. कारण प्रत्येक गोष्टीकडे, घटनेकडे बघण्याच्या अनेक दृष्टी असतात. आपण वेगळ्या दृष्टीने पाहिलं, तर मुळातच हा जन्म आणि मृत्यू, यांच्या पलीकडे असलेल्या सर्व गोष्टी एक दृष्टिकोन आहे.
पण त्या अलीकडे व पलीकडे असलेल्या सर्व गोष्टी आणि त्यासाठी आपण करत असलेले विधी, पूजा, हे कर्मकांड आहे. त्यापेक्षा जास्त त्यात काहीच तथ्य नाही. म्हणून आपण हा आज्ञा पालनाचा भ्रम आणि हट्ट सोडून द्यावा आणि आग्रहपूर्वक आपल्या समक्ष जीवित असलेल्या, आपल्या सहृदांची विनवणी मान्य करून, सर्व तर्क बाजूला ठेवून, जे समोर घडत आहे, जे नजरेला दिसत आहे, तितकेच सत्य मानून, पुनर्विचार करावा, इतकीच आपल्याला माझी नम्र विनंती आहे."
विप्र जाबाली यांच्या या अकल्पित अतर्क्य कथनाने आणि धारिष्ट्य पूर्ण वचनाने समस्त जन अचंबित झाले. प्रभू स्वयं या अतर्क्य बोलण्याने चकित झाले आणि उत्तरादाखल जाबाली याना म्हणाले.
श्रीराम जयराम जय जयराम!!
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!
ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा, ही नम्र विनंती.
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
२२/०७/२०२३
9049353809
9960762179
Comments
Post a Comment