Skip to main content

राम अनुज भरत भाग ४१(भरताचा श्रीरामांना आर्जव -१)

राम अनुज भरत भाग ४१
(भरताचा श्रीरामांना आर्जव -१)

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.

त्या दिवशी सर्वांनी एकमेकांची ख्यालीखुशाली विचारली. एकमेकांना सांत्वना दिली आणि स्वर्गीय महाराज दशरथ याना, त्यांच्या सात्विक पुण्यकर्मासाठी, देवदेवता कडून, उत्तम प्रकारची फलप्राप्ती होवो, यासाठी कामना करत, दिवस घालवला. प्रभूंप्रमाणेच सर्वांनी, वनातील, कंदमुळं, फळं, फुलांचा मधुरस, इत्यादींच्या सेवन, भक्षण व ग्रहणात संध्या समय व्यतीत केला. 

रात्रीच्या समयी, पुत्र राम यांनी,आपल्या तीनही मातांच्या सेवेत रत राहून, त्या निद्राधीन झाल्यावर, मग आपल्या मऊ तृणांनी तयार केलेल्या, आपल्या बिछान्यावर अंग टेकले.पिताश्री महाराज दशरथ यांच्या आठवणीत, चारही बंधू शेजारी शेजारी पहुडले.अर्थातच प्रभूंच्या हृदयात प्रिय स्थान प्राप्त भरत,प्रभूंच्या शेजारी स्थिरावला. लक्ष्मणाने निश्चयरुपी, निग्रह, धारण केलेला असल्यामुळे, तो समस्त परिवार, जनसाधरण यांच्यावर देखरेख ठेवत, त्यांच्या सुरक्षेची चिंता करत करत, पूर्ण रात्र जागृत राहिला. 

भल्या पहाटे उठून, नित्य कर्म आटोपून, स्नान संध्या, अग्निहोत्र आदी सर्व संस्कार व याग पार पाडल्यानंतर, समस्तजन, अर्थात प्रमुख प्रमुख मंडळी, पुन्हा एकदा एकमेकांसमोर बसली.ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांनी, आपल्या शेजारी भरताला बसण्यास सांगितले. अर्थातच भरत अत्यंत आनंदाने बसला.पण आधी तीनही बंधूंनी आपल्या तीनही माता याना व पितास्वरुप असलेले ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांना चरणस्पर्श करून, मगच स्थानग्रहण केलं. 

भरताने प्रभूंना हात जोडून, एक विनंती करण्याची अनुमती मागितली. प्रभूंनी ती.अनुमती त्वरित दिली आणि भरत बोलू लागला.

" प्रभू आपण दिव्य, रघुकुल परंपरा जाणता आणि आपल्या शास्त्र, वेद इत्यादींच्या कथनानुसार असलेली आजवरची इक्ष्वाकू वंशीय अखंडित परंपरा जाणता. ज्यानुसार, पित्याच्या पश्चात राजपट हा सर्वात ज्येष्ठ पुत्राला प्राप्त होतो. कोणत्याही, इतर बंधू, जन यांचं त्याला अनुमोदन असतंच. नव्हे ती अनुमती त्यांनी जन्मतः दिलेली असते. 

ज्येष्ठ भ्राता सांगेल ती पूर्व आणि त्यांच्या आज्ञेत, राज्यात जी जबाबदारी प्राप्त होईल, ती यथास्थित निभावून नेणे, हेच आपले परम जीवन कर्तव्य आहे, इतकचं इतर बंधू जाणतात. हाच त्यांचा कुलधर्म आणि कुलाचार आहे. रघुकुलातील कोणीही, याचे उल्लंघन केल्याचे उदाहरण सापडणे, अशक्य आहे, प्रभू. हे आपणही जाणताच.

सद्यस्थितीत, पिताश्रीच्या नसण्याने, रिक्त असलेल्या, अयोध्येच्या, बलाढ्य, राज्याला, आपण राजा म्हणून स्वीकृत करावे. तोच आपला सद्य धर्म आहे. आपण आपल्या या धर्माचे, सहसा पालन करावे, हेच सर्वथा उचित आहे. हेच कुलरीत याना धरून आहे. प्रजेला एक योग्य, शास्त्रसंमत, कुलरीत भूषण असा राजा प्राप्त व्हावा, हा प्रजेचा देखील अधिकार आहे. प्रजेच्या या अधिकाराचा सन्मान करणं, हे त्या राज वंशाचं उत्तरं दायित्व आहे.

आपल्या आत्मसन्मानाची सुद्धा पर्वा न करता, राजाने, आपल्या प्रजेसाठी असलेल्या आपल्या आद्य कर्तव्याचा प्रथम विचार करावा, असच शास्त्र आणि ज्ञानीजन सांगत आले आहेत. राज्य म्हणजे फक्त प्रजा, राजवंश, सैन्य, सचिव, मंत्री अधिकारी, सेवक इतकचं नाही. तर त्या भूमीच्या अपेक्षांची सुद्धा जाण त्या राज परिवार व वंशाने ठेवली पाहिजे, ज्या भूमीच्या भागावर, आधारित राज्य, त्या परिवाराला प्राप्त झालेलं आहे. 

आपल्या राज्याला, वंशाला, प्रजेला, भूमीला, कदापिही असुरक्षित वाटेल,असं कोणतंही,वर्तन करण्याचा अधिकार राजा, परिवार व वंशज याना नाही. क्रमप्राप्त वर्तन, जबाबदारी आणि उत्तर दायित्व, हे स्वीकृत उत्तर दायित्वा हून श्रेष्ठ आहे. आपल्या पिताश्रीच्या पश्चात, या सर्व इति कर्तव्यांचं उत्तरदायित्व, ज्येष्ठ पुत्र या नात्याने आपल्याकडेच आहे, ज्येष्ठ भ्राताश्री. नव्हे तर मी माझ्या अधिकाराच्या पुढे जाऊन, हेदेखील म्हणू इच्छितो की, तेच आपले, या क्षणी प्रथम कर्तव्य आहे. 

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
१९/०७/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...