भोग आणि ईश्वर ५७७ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) भले भले महात्मे,संत इत्यादी, संसार सागर का म्हणतात, याचा बोध काल आला असेल. मूळ स्व साध्य करण्या साठी करत असलेल्या कर्मातून, मिळणारं फल समोर आल्यावर सामान्य जन, नेहमी त्यात वाहात जातो. हे अंतिम सत्य जोपर्यंत आहे, तोपर्यंत त्या फलाच्या प्राप्तीने आनंद व दुःख होतच राहणार. हे अपरिहार्य व अनिवार्य आहे.माणूस कुठे चुकतो,तर त्याची स्वीकृती वा अस्वीकृती माणूस प्राप्त परिणामांवर ठरवतो. या चुकीचा अर्थ आणि परिणाम असा आहे की, स्वीकृत फल मनाला आनंद देते आणि अस्वीकृत फल मनाला क्लेश देते. हा आनंद आणि क्लेश हेच सर्व दुःखाचं मूळ कारण आहे. आनंद हे दुःखाचं कारण कसं असेल, असा साहजिक प्रश्न मनात येईल. विचार करा की, एकदा एका कर्मफलातून आनंद प्राप्ती झाली की, माणूस त्याचं प्रकारच्या कर्मात स्वतःला अडकवत जातो. याची एक शृंखला तयार होते. यामध्ये मागील कर्माचा दुःख भोग आला की, मनात अविचार येतात. माणूस चुकीचा मार्ग आणि चुकीचं कृत्य करण्यास प्रवृत्त होतो. कारण ओढ इच्छा आणि अपेक्षा यातून तयार झालेली आसक्ती ही माणसाला दुःख भोग आणि अनिष्ट फल स्वीकारू...