Skip to main content

Posts

Showing posts from June, 2021

भोग आणि ईश्वर २१२

भोग आणि ईश्वर  २१२ भक्तिमार्गात येण्यासाठी भगवंतांनी एक सांगितलं आहे की, चित्त शुद्धी ही पहिली पायरी आहे. म्हणून नामाची सुरवात करताना, प्रथम संकल्प  चित्तशुद्धी हा असावा.  चित्तशुद्धीवर मागे काही भागात विस्ताराने लिहिलं आहे. त्यामुळे आता त्यावर न बोलता, मनःशांतीच्या मार्गातील दोन मुख्य शत्रू काम व क्रोध यावर बोलू.  वास्तविक मनुष्याचा स्थायी स्वभाव हा जन्मतः लिहिलेला असतो, त्याच्या संचितानुसार. त्यामुळे मूळ स्वभावाची वा वृत्तीची ही मुळी जन्मतः खरतर दृढ अर्थात घट्ट असते. म्हणूनच आपण एखाद्याबद्दल बोलताना म्हणतो की, तो थोडा तुसडा आहे, तो रागीट आहे, तो शांत आहे, तो चिकित्सक आहे, इत्यादी इत्यादी.  म्हणजेच माणसाला मूलतः जे प्राप्त आहे त्यानुसार त्याचं पुढील कर्म घडत जाणार. अर्थात, त्यानुसार त्याची पुढील कर्मगती ठरणार आणि पुढील कर्मफल. आधीच्या कर्माने त्याने प्राप्त भोग, उपभोग योग हे सर्व ठरवलेलं असतं. म्हणजेच रागीट असल्याने, क्रोधाने अयोग्य कृती करणं, क्रोधात संबंध तोडणं, त्यासाठी भांडणं करणं, रागाच्या भरात वाईट बोलणं इत्यादी सर्व, जे घडणाऱ्या  कर्मफला  बद्दल...

हलकं फुलकं ६

हलकं फुलकं ६  विषय : प्रत्यक्षालासुदधा हल्ली प्रमाण लागतं आणि दिसतं  तसं नसतं. बघा तुम्हीच. प्रसंग १ सौ जरा फोनवर, एका खास मैत्रिणीशी बोलत होती. यांचं एक छान असतं. प्रत्येक जीवलग मैत्रिणीशी वेगळे वेगळे विषय ठरलेले असतात आणि त्याच विषयावर तिच्याशी हितगुज होतं. प्रत्येक संवाद हा हितगुजच असतो.  तर तिसऱ्या कुठल्यातरी क्ष मैत्रिणीच्या नवर्याबद्दल चर्चा सुरू होती. सौ. अगं त्या क्षचा नवरा, ती सांगत होती, एरवीचं सोड,पण आता लोकडाऊन आहे, वर्क फ्रॉम होम आहे, तरीही एक काम करत नाही. सतत आपलं त्या लॅपटॉप मध्ये तोंड खुपसून बसलेला असतो आणि सारख्या मिटींग मीटिंग करत कामं टाळतो. मैत्रीण तिकडून उपयुक्त प्रतिसाद देत होती. सौ : हो ना. अगदीच आळशी आणि कामचुकार आहे. बघ की, एवढं काय मेलं ऑफिसचं काम असतं.  मला यात लेकी बोले सुने लागे चा वास यायला लागला. म्हणून मी माझ्या लपटॉपवर काम करण्यासाठी आत पसार झालो.  शेवटी जाऊ दे आपण बरं आणि आपला संसार बरा आपल्याला काय करायचं आहे......... हे भरतवाक्य ऐकलं आणि लक्षात आलं, तासाभराने फोन झाला. प्रसंग २  त्याच मैत्रिणीशी पुन्हा हुतगुज. बहुतेक या ...

भोग आणि ईश्वर २११

भोग आणि ईश्वर २११ भक्तीच्या अनेक व्याख्या दिल्या जातात वा केल्या जातात. सर्व त्या त्या ठिकाणी योग्य आहेत. पण सर्वात सोप्पी व्याख्या म्हणजे मूळ अंशापासून विभक्त झालेले आत्मरुप आपण, त्या मूळ अंशास पुन्हा प्राप्त होण्या साठी केलेली आळवणी म्हणजे भक्ती. भगवंत आणि भक्त या दोन भिन्न रुपात वावरणाऱ्या दिव्यतेजांना पुन्हा एका ज्योतीरुपात आणण्याचा प्रवास म्हणजे भक्ती. मी जो देहरूपात आल्यामुळे भिन्न वाटतो किंवा जाहलो, तो मी खरतर अभिन्न आहे. कारण हे भिन्नत्व फक्त वेगळ्या देहात, तेच आत्मतेज प्रकट झाल्यामुळे जाणवणारी पोकळी आहे. ती पोकळी भरून काढण्या साठी आणि ईश्वरासमीप जाण्याचा प्रवास साध्य करण्यासाठी केलेलं कर्म म्हणजे भक्ती. अर्थात भक्तीत ईश्वर प्राप्तीचं कर्म आहे. पण याची सुरवात मी भिन्न झालो आहे आणि मला भगवंतांशी जोडलं जायचं आहे ही जाणीव जागृत झाल्यामुळे वाटणारी विरहाची भावना हे यथार्थ ज्ञान आहे. म्हणजे भक्तीत कर्मयोग आणि ज्ञानयोग दोन्ही समाविष्ट आहे. याच कारणाने भगवान श्रीकृष्ण यांनी श्रीमद्भागवद्गीतेत भक्तियोग हा सर्वात शेवटी सांगून महाभक्त अर्जुनासह सर्व भगवतभक्तांची ईश्वर व मोक्ष प्राप...
प्रार्थना तोडीता तोडवेना पाश काम क्रोध मायेचे बद्ध झाला जीव देवा देहसाखळीत मौजे ll नाश पाहवेना देवा किती जन्म घालवले उमजता, लोचनात पश्चात्ताप अश्रू आले ll तूच सावरवे मजला जीव तुझ्या चरणांशी कृपावंता ब्रीद राखी कर-मस्तक पायांशी ll बोध जाहला जन्मांचा सुधरेल आता सारे पहाटेच्या समयास सूर्यकिरण पसरे ll मीच माझा शत्रू होतो कर्मगती ज्ञात नसता आता नित्य कर्म देवा घडो तुजला स्मरता घडो तुजला स्मरता ll ©® रचनाकार : प्रसन्न आठवले २९/०६/२०२१

भोग आणि ईश्वर २१०

भोग आणि ईश्वर  २१०  गेले दोन तीन दिवस आपण कर्म ज्ञान यावर विस्तृतपणे चर्चा केली. आज भक्तियोग काय याचा विचार  करू. खरतर भक्ती या विषयावर अखंड आणि प्रचंड लिहिलं गेलंय. अगदी विस्ताराने लिहिलं गेलंय. त्यामुळे हा विषय खूप सोप्पा करून सांगण्यात आला आहेच. मुळात श्रीमद्भागवद्गीतेत या विषयावर प्रत्यक्ष भगवंतांनी निवेदन आणि विवेचन केल्यानंतर पुन्हा यावर बोलण्यासारखं उरत नाही.  पण याचं कारण, या विषयावरील उपलब्ध प्रचंड लिखाण वा विवेचन वा प्रवचनं नसून, भक्ती हा मुळातच समज ण्याचा, जाणण्याचा विषय नसून, तो फक्त अनुभवण्याचा विषय आहे. भक्ती म्हणजे मनात एखाद्या गोष्टी, व्यक्ती  विषयी असलेलं प्रेम, आपुलकी जिव्हाळा हे व्यक्त करण्याचा मार्ग. आपण एखाद्यावर प्रेम करतो म्हणजे काय करतो, तर सतत , नित्य, क्षणोक्षणी फक्त त्याच व्यक्तीचा विचार करतो.  म्हणजेच नित्य त्याच व्यक्तीचं मनात, हृदयात, आठवणीत चिंतन करतो, मनन करतो आणि स्मरण करतो. असं एखाद्या विषयी चिंतन स्मरण करताना, त्याचं आणि आपलं काही नातं असतं वा संबंध असतो.  त्या संबंधातून हे प्रेम जन्म घेतं. मग तो नातेसंबंध आई मुलाचा व...

प्रश्नोत्तरे

प्रश्न १ : नाम हे आपल्या मनाने च घ्यायला सुरुवात केली तर त्याचा प्रभाव किती असतो, किंवा ज्यांना श्री सद्गुरूंकडून प्राप्त झाले आहे, त्याचा प्रभाव जास्त असतो?कारण असे नाम हे शक्तीने भारीत असते ना? उत्तर : *नाम हे नाम आहे, ते शुद्ध मनाने घेतलं तर कार्य करतच. कारण शेवटी नामाची शक्ती त्यासोबत असते. पण ते गुरूंकडून मिळतं वा प्राप्त होत, त्यावेळी तुमच्या संकल्पमागे गुरुशक्ती कार्य करते, जी तुमच्या ध्येयाच्या आणि निश्चयाच्या मागे उभी असते. प्रभाव दोन्ही स्थितीत तुमच्या आत्मशक्तीच्या जागृतीवर अवलंबून आहे आणि आत्मशक्ती मनाच्या कार्यावर. गुरू याबाबत आपलं मनोधैर्य वाढवून, आत्मबळ देण्याचं कार्य जरूर करतात. म्हणजे काही कारणाने मन विचलित झालं, भ्रमित झालं तर, त्या सर्व काळात सद्गुरू पाठीशी असतात हा मुख्य लाभ* प्रश्न २ : ते प्राप्त झाल्यानंतर, ते वाणीचे एकूण4प्रकार आहेत ना?त्यातील कोणत्यापद्धतीने घ्यायला हवे?वैखरी, मध्यमा, परा, पश्यन्ति कृपया 4ही वाणीची व्याख्या सांगावी ही नम्र विनंती उत्तर: *वाणीचे चार प्रकार आहेत वैखरी, मध्यमा परा आणि पश्यन्ति वैखरी म्हणजे आपण सर्वसामान्यपणे बोलतो ती...

भोग आणि ईश्वर २०८

भोग आणि ईश्वर  २०८ खरतर कर्म ज्ञान व भक्ती या तिन्ही योगांबद्दल आपण विस्ताराने बोललो, तरीही काही राहिल्याची जाणीव झाल्यामुळे पुन्हा थोडं त्याविषयी. कर्ममार्गी आणि ज्ञानी अर्थात मुमुक्षु हे आपल्या मार्गाने उन्नत होत जातात. ज्ञानाने ज्ञानी जनांच्या जाणीवा प्रगल्भ होत जातात आणि तसतसा जीवनाकडे, नैतिकतेकडे, संसाराकडे, सुख दुःख वासना माया याकडे बघण्याची वेगळी दृष्टी प्राप्त झालेली असते. याबाबत अधिक सुजाणता आल्यामुळे त्यांना स्थितप्रज्ञता येत जाते.  स्थितप्रज्ञ म्हणजे जो सुख दुःख, आयुष्यातील चढउतार, भावभावना या सर्वांतून मुक्त झालेला असतो. म्हणजेच मनाच्या अश्या अवस्थेला पोचलेला असतो की, जिथे काही मिळवायचं किंवा काही गमवायचं नसतं. मन ज्ञानयुक्त स्थितीला गेल्यामुळे घडणारी प्रत्येक गोष्ट ही  मायेचं बंधन आहे आणि मी आता त्यापासून मुक्त होऊन पुढे आलो आहे, ही जाणीव जागृत झालेली असते.  त्यामुळे हे बांधनाचे दोर मला आता बांधू शकत नाहीत. मनाची स्थिती ही फक्त आणि फक्त एका ध्येयावर स्थिर असते.  ते ध्येय म्हणजे आत्मतत्वाचं परमात्मतत्वात सामावलं जाणं. या स्थितीप्रत ज्ञानी आलेला असतो ...

भोग आणि ईश्वर २०७

भोग आणि ईश्वर  २०७ निर्विकार व्हायचं म्हणजे नक्की काय, तर दुःखात जाणवणारा उद्वेग, दुःख, कारुण्य, भावनेचा आवेग हे मनातून काढून टाकून जगायचं. आपण दुसऱ्याच्या घरात आहोत, अगदी अनोळखी घरात. अश्या वेळी त्यांच्या घरी घडणाऱ्या गोष्टी, आपण त्यांच्या घरातुन बाहेर पडल्यावर फार मनात धरून ठेवणार नाही. खंत वाटेल, मन खिन्न होईल, पण ते काही काळासाठी. त्याचप्रमाणे आपलं दुःख हे परदुःख मानून जगण्याचा प्रयत्न करावा. खरतर हे सांगणं जितकं सहज आहे, तितकं ते प्रत्यक्षात आणणं, त्याहून अत्यंत कठीण आहे, हे मान्य आहे. पण गीतेत सांगितलेल्या कर्मसिद्धांताचा उपयोग याचसाठी आहे की, मनाला समजावून सांगावं, जे दुःख, दैन्य, तापत्रय, सांसारिक चिंता , मनातील विकार, मनात उत्पन्न विचार , घडणारं कर्म हे सर्व पूर्वसुकृत आहे. म्हणजेच जी पटकथा आपण आधीच लिहून ठेवली, तीच आपण प्रत्यक्षात अनुभवतो, अंमलात आणतो. म्हणजेच या पटकथेचा लेखक, निर्माता आणि मुख्य अभिनेता मीच आहे.  एकदा ही पक्की खात्री झाली, की एक गोष्ट लक्षात येईल, एकदा लिहून झालेल्या कथेत बदल विधातासुद्धा करू शकत नाही. म्हणजे जे आता भोगतोय किंवा उपभोगतोय ते आधीचं केल...

भोग आणि ईश्वर २०६

भोग आणि ईश्वर  २०६   योगाबद्दल चर्चा करताना आपण ज्ञानयोग आणि भक्तियोग यावर प्रदीर्घ चर्चा केली. योग हा शब्द श्रीमद्भगवद्गीतेत विस्तृतपणे कथन करताना भगवान श्रीकृष्ण यांनी अजून एक योग सांगितला . तो म्हणजे कर्मयोग. कर्माने प्राप्त संचित भोगत असताना पुढील कर्मभोग भोगायला लागू नये म्हणून खूप विचारपूर्वक हा योग सांगितला आहे. मुळात प्रत्येक मनुष्य हा कर्मरत असतोच असतो. म्हणजे एकाच वेळी तो मागील हिशोब चुकता करत असतानाच पुढील हिशोबाच्या वह्या स्वहस्ते निर्माण करत असतो. हे कळतनकळतपणे घडत असतं  खरतर घडत असतं या शब्दात, आपोआप असं सूतोवाच होतं, असा अर्थ अभिप्रेत आहे. पण इथे तसा अर्थ अपेक्षित आहेसुद्धा आणि नाहीसुद्धा.  आहे या अर्थाने की, आपण प्रत्येक कर्म करताना किंवा आधीच्या कर्माचे भोग भोगताना, नकळत पुढील कर्मात बद्ध होतो म्हणून आपोआप असा अर्थ त्यात अभिप्रेत आहे  आणि नाही याअर्थी की, कर्माची ही बद्ध करणारी साखळी, आपण जाणीव आणि अज्ञान अश्या दोन्ही पातळीवर जाऊन करत असतो, म्हणून नाहीसुद्धा. थोडसं गोंधळात टाकणारं आहे. म्हणून आपण उदाहरणं घेऊन सोप्प करूया. ज्यावेळी आपण नवीन कर्म ...

भोग आणि ईश्वर २०९

भोग आणि ईश्वर  २०९ खरतर ज्ञानी असण्याची स्थिती, ही उत्तम स्थिती आहे. कारण माया, मोह, काम, क्रोध यांचं स्थान आणि महत्व कितपत आहे आणि त्यांचा उपयोग करून त्यांना कसं आणि का त्यागून पुढे जायचं, हे ज्ञात झालेलं असतं. ही स्थिती खरतर सर्वोत्तम आहे. पण इथेच घसरण्याचा धोका जास्त असतो.  कारण या स्थितीत येताना मनुष्य बरेचदा , आपण जगता हून भिन्न आहोत आणि जगत मायकार व मी ब्रम्ह जाणणारा, या अभिमानात जाऊ शकतो आणि हा वृथा अहंकार, घात करतो आणि माणूस सर्व जगताकडे तुच्छतेने पाहायला लागतो. आत्म्यज्ञान प्राप्तीनंतर, जगत हे जरी मिथ्या वाटलं, तरीही ते मायाकारी ईश्वराचीच एक लीला आहे, हे ज्ञान लोप पावतं. मग अश्याच ज्ञानी उद्धवाला , श्रीकृष्णांना गोपींकडे पाठवावं लागतं, खऱ्या भक्तीच्या व खऱ्या आत्मज्ञानाच्या शोधार्थ.  म्हणजे ज्ञानी होण्यात एक प्रकारे आत्मा स्वहित सुद्धा प्रसंगी विसरू शकतो. म्हणजेच ज्ञान हे साध्य नसून साधन आहे, याची विस्मृती होते आणि ज्ञान हे साध्य मानून ज्ञानी माणसाचा अहं जागा होतो. तो सर्व दृश्य जगत भ्रम मानून, आपण प्राप्त केलेलं ज्ञान हे श्रेष्ठ  म्हणजेच ते ज्ञान प्राप्त के...

भोग आणि ईश्वर २०३

भोग आणि ईश्वर  २०३   कालच्या विषयाला पुढे नेताना, आपण आज आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त योग म्हणजे नक्की काय आहे आणि  आपल्या विषयासंदर्भात त्याचा  काय अर्थ व त्याचं काय कार्य आहे ते बघूया. श्रीमद्भगवद्गीतेत दुसऱ्या अध्यायात अठ्ठेचाळीसाव्या श्लोकात आणि पन्नासाव्या श्लोकात भगवंतांनी योग शब्दाचा वापर केला आहे. भगवंत म्हणतात  “समत्वं योग उच्यते”(गीता २/४८) आणि  योग: कर्मसु कौशलम्” (गीता २/५०) आधी अठ्ठेचाळीसाव्या श्लोकाचं विवेचन व विश्लेषण करूया. त्या श्लोकाचा सरळ अर्थ आहे, समत्व साधल्याने योग उच्च होतो. अर्थात बुद्धी देह व मन यांच्यात समत्व म्हणजेच समन्वय साधून कोणतेही कार्य केल्याने योग अर्थात त्या कार्यात आपला संपूर्ण सहभाग दिल्याने कार्यसिद्धी होते. म्हणजेच योग साधतो. पण म्हणजे आपला संपूर्ण सहभाग हाच योग आहे असं भगवंत म्हणतात.  पण मग जर हा समन्वय साधला तर योग्य फल मिळेल याची शास्वती भगवंत देतात का.? किंवा तसं म्हणायला वाव आहे का? तर नाही. कारण आधीच्याच श्लोकात भगवंत म्हणतात  "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्...

भोग आणि ईश्वर २०४

भोग आणि ईश्वर  २०४   काल योग या विषयावर आपण विस्तृत चर्चा केली. तरीही योगाचे अनेक पैलू बघायचे बाकी आहेत. योग म्हणजे अविनाशी आत्मा, चंचल मन, अस्थिर बुद्धी, आणि देह यांचं सुसूत्रीकरण. योग म्हणजे समत्व या शब्दावरून योग म्हणजे ध्यान, धारणा, देहाला सुस्थितीत आणि सदृढ ठेवून, मनाचं स्वास्थ्य साधून, मन शुद्ध व भेदरहीत करणं. त्यानंतर भेदरहीत मनाला, साक्षी ईश्वराच्या सगुण अथवा निर्गुण प्रतिमा, नाम, वा स्वरूपाशी एकरूप करण्याचा प्रयत्न करणं.  सर्वात प्रथम ईश्वरी उपासना आणि भक्तीचा मार्ग चोखळण्यासाठी देहाची मनाची व आत्म्याची शुद्धता अत्यंत जरुरी आहे. म्हणजेच देह बुद्धी मन व आत्मा यांचा योग अर्थात समन्वय किंवा समत्व, म्हणजेच एकतानता, साधण्यासाठी, या सर्वांची शुद्धता जरुरी आहे. आपण व्यवहारात पाहतो की, अशुद्ध पाणी पिण्यायोग्य बनवण्यासाठी त्याला विशेष शुद्धीकरण प्रक्रियेद्वारे शुद्ध करून, मगच पिण्यासाठी वापरतात. मग जर परम आत्म्याला भेटायला जायचं असेल तर, ज्या देहातून तो प्रवास करतोय, ज्या मनाने तो व्याप्त आहे, त्या दोन्हींना शुद्ध करून घेणं किती गरजेचं आहे. यामध्ये शुद्धता शरीरासाठी, ज्या...

भोग आणि ईश्वर २०५

भोग आणि ईश्वर  २०५   काल आपण संन्यासी, ब्रम्हाचारी आणि साधुपुरुष यांच्याविषयी विस्ताराने चर्चा केली. त्यांना निरुपाधिक राहून, साधनेवर कोणताही डाग लागणार नाही याची काळजी घेत, मार्गक्रमण करावं लागतं. यामध्ये त्यांचे सद्गुरू मार्गदर्शन करतात आणि वेळोवेळी परीक्षा पण घेतात. शिष्य आपल्या साधनेतील प्रगतीनुसार त्यात उत्तीर्ण वा अनुत्तीर्ण होतात, पण मार्गक्रमण सुरूच ठेवतात. आता विचार करा साधनशुचिता पाळून, दीर्घ प्रयत्नां नंतर,  कष्टप्रद साधना करून, त्यात काही विकारी विघ्न येऊ नये म्हणुन सतत नियम व शास्त्र यांची तारेवरची कसरत करून उच्चपदी पोचण्याची तपश्चर्या, या मार्गा तील साधकांना करावी लागते. त्यानंतरही यश वा अपयश, काहीही फल पदरी पडू शकते.  मग तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जीवांची काय कथा.  म्हणजे आपल्याला किती त्रास , कष्ट, मेहनत व नियमांची पराकाष्ठा करावी लागेल. पण मग आपल्याला या सर्व शास्त्र नियम यांच्या मार्गाने न जातासुद्धा अन्य काही मार्ग नाही का, ज्यायोगे आपण विधात्याप्रत पोचू आणि अंतरात्मा परमात्मा यांचा संयोग साधू शकू. नक्कीच असा एकच मार्ग जो या सर्व कर्मकठीण,...

भोग आणि ईश्वर २०१

भोग आणि ईश्वर  २०१   आत्मविश्वास ही पहिली पायरी असण्याचं कारण, आत्मा व आत्म्याचा आधार असलेला श्वास हे आहेत म्हणजे तो ईश्वर आहे आणि तो ईश्वर आहे म्हणजे मला दृढतेने त्याच्यापर्यंत जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. दुसऱ्या अर्थाने जेंव्हा एखादी गोष्ट श्वासापासून करायची असेल तेंव्हा आत्मा ओतून ती गोष्ट केल्यास परिणाम निश्चित सकारात्मक होईल. दुसऱ्या अर्थाने सर्व विश्वाचा  चालक मालक याच्यावर आस ठेवून, आपण फक्त कर्म करत राहणं. तिसऱ्या अर्थाने स्व म्हणजेच आत्मा यावर पूर्ण विश्वास असेल, तरच प्रत्येक कृती वा कर्म हे ठामपणे होतं.  आत्मविश्वास हा दृढ यासाठी सुद्धा असावा किंवा धरावा की, कर्मगतीच्या फेऱ्यात फलाची आस सोडून ती परमात्म्यावर ठेवली की, बाकी कुठेही ती आस ठेवायची गरज पडणार नाही किंवा गरज वाटणार नाही. एकदा स्वतःसह ईश्वरावर विश्वास ठेवला की घडणाऱ्या प्रत्येक कर्माचा अंत हा त्याच्या चरणांशी होणार. मन निश्चिन्त होणार आणि आपोआप, भय, चंचलता या सर्वांची जागा संयम घेईल वा घेतो. कारण माझं प्रत्येक कर्म योग्य करून घेण्याची जबाबदारी, आपण आत्मा अर्थात ईश्वरीय प्रतिनिधी याच्यावर सोपवल...

भोग आणि ईश्वर २०२

भोग आणि ईश्वर २०२ आत्मविश्वास आणि आत्मसंयम असलेल्या व्यक्तीचं मन शांत असतं वा होतं. कारण स्वतःच्या कर्मावर ठाम विश्वास आणि आपल्या ध्येयावर पूर्ण श्रद्धा असल्या कारणाने , किंतुपरंतु वा शंकाकुशंका यांना मनात कुठेही थारा नसतो. किंबहुना आलेले सर्व अनुभव, भेटलेल्या सर्व व्यक्ती व समोर आलेले सुखदुःखाचे प्रसंग आणि आयुष्यातील चढउतार हे आपल्या कर्मफलाची परिणती आहे आणि पुढील कर्म हे ईश्वरार्पण भावाने, पण ठामपणे केलं जात असल्यामुळे, सदर व्यक्ती पुढील कर्मगती बाबत साशंकीत नसते. म्हणूनच अशी व्यक्ती प्रत्येक कर्म आत्मविश्वास व आत्म संयमाने करत असल्याचे, मन पूर्णपणे कर्मात रत असतं. अश्या शांत मनात, फक्त सकारात्मक तरंग लहरी उत्पन्न होतात. त्या लहरी या, त्या व्यक्तीसह आजूबाजूचा परिसर, यांना व्यापून, सकारात्मकतेची लाट निर्माण करतात. या शिवाय स्थिर मनाला स्थिर बुद्धीचा आधार असतो. ज्यामुळे मन निर्विकार, बुद्धी स्थिर आणि व्यक्ती विचारी होतो. मनाच्या शांततेमुळे वृत्ती निर्गुण निराकार होते. म्हणजेच, त्या व्यक्तीला सर्व ठिकाणी आपल्या ध्येयाचा व सद्गुरूंचाच वास दिसतो. यामुळे व्यक्तिमत्व सर्वव्यापी आणि...

भोग आणि ईश्वर २००

भोग आणि ईश्वर  २०० १ डिसेंबर, २०२० रोजी, खरतर फक्त दोन लेख लिहायचं ठरवून सुरू केलेली ही लेखमाला, आज बघता बघता २०० व्या भागापर्यंत आली. खरतर हा २०० दिवसांचा हा प्रवास, अद्भुत असा होता. ही मालिका किंवा यातील प्रत्येक लेख लिहिताना माझ्या व्यक्तिगत विचार सरणीत आणि व्यक्तमत्वात खूप फरक पडला, हे नक्कीच. महाराजांनी या ज्ञानाच्या माध्यमातून, लोकांना मार्गदर्शन करताना, अत्यंत कुशलतेने मलासुद्धा घडवत नेलं. या दोनशे दिवसात अनेक व्यक्तीशी संपर्क आला. काही प्रतिक्रिया देण्याच्या निमित्ताने, काही प्रश्न विचारण्याच्या निमित्ताने, काही पुस्तकासंदर्भात बोलण्याच्या निमित्ताने, अश्या विविध कारणांसाठी जनसंपर्क आला. महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या, किंबहुना जगाच्या सर्व विभागातून लोकांनी खास फोन करून प्रतिक्रिया दिल्या. वास्तविक पुस्तकाची संकल्पना पूर्णपणे वाचकांचीच. ती इतक्या उत्तमरीतीने प्रत्यक्षात येईल हे स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. किंबहुना एका क्षणाला ही कल्पना सोडून द्यावी असाही विचार आला. पण त्या स्थितीत एक वाचक आणि त्यांच्या माध्यमातून माझ्या एका बालमित्राला ही गोष्ट समजल्यावर, त्याने तात्काळ फो...

भोग आणि ईश्वर १९८

भोग आणि ईश्वर  १९८ आता चित्ताची शुद्धता आणि वृत्तीची स्थिरता हे कसं साध्य होतं यावर आज चर्चा करूया. मुळात वृत्ती म्हणजे अंतर्मनाचं  स्वरूप, अर्थात अंतर्मनातील तरंगांचं देहाच्या माध्यमातून प्रकटीकरण,  म्हणजे वृत्ती. अर्थात नेहमी हे प्रकट स्वरूपात दिसेल असं सरसकट म्हणता येणार नाही. कधी कधी एखादी व्यक्ती शांत असते पण हा झाला स्वभाव. आता वृत्ती म्हणजे त्या शांत असलेल्या माणसाचं वर्तन कसं असेल तर, तो जास्त कोणाशी बोलणार नाही, आपल्या कामात मग्न राहील, फार कोणात मिसळणार नाही, मिसळला तरी फार बोलणार नाही, मोजकं पण कामा पूरतं बोलेल.  या सर्वातून त्याचा स्वभाव, वर्तन व वागणूक दिसेल. पण वृत्ती म्हणजे या सर्वांतुन एकत्रितपणे प्रकट वा अप्रकट होणारं व्यक्तिमत्व वा व्यक्तित्व. ज्याला इंग्रजीत attitude म्हणतात ती म्हणजे वृत्ती. म्हणजे असं की, तो शांत आहे म्हणजे सोशिक असेलच असं नाही, चिडचिडा नसेलच असं नाही, शांत आहे म्हणजे माणुसघाणा असेलच असं नाही. सर्वार्थाने शांत आहे म्हणजे संयमी असेलच असं नाही. थोडक्यात बाह्य रुपात देहबोलीतून प्रकट होणाऱ्या रूपाच्या पलीकडे जाऊन, त्या व्यक्तित्वाची ...

भोग आणि ईश्वर १९९

भोग आणि ईश्वर  १९९ माणसाच्या वृत्तीवरून व्यक्तित्व तयार होतं. त्यामुळे वृत्तीतील बदल, हा वरवरचा असेल तर तो फार काळ टिकणार नाही आणि मूळ प्रवृत्ती कधीना कधी तरी नक्कीच बाहेर येईल. खूप ठिकाणी व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा आयोजित केल्या जातात. मुख्यतः त्या व्यवसाय नोकरी या संदर्भात, व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात बदल घडावेत या हेतूने आयोजित केल्या जातात आणि त्यात त्याच कारणांसाठी भाग घेतला जातो.  त्यातून आपण नोकरीत, मुलाखतीत आणि व्यावसायिक सादरीकरणात काय गोष्टी टाळल्या पाहिजेत, काय आवर्जून केल्या पाहिजेत आणि काय काय नसलेल्या अंगिकारल्या पाहिजेत, याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण, मोबदला घेऊन दिलं जातं. इथे अश्या प्रकारच्या प्रशिक्षणाने उमेदवारांना व नोकरदारांना टिकाव धरून प्रगती साधता येते. ज्याला व्यावसायिकरण म्हणतात ते आत्मसात करण्यासाठी हे गरजेचं असतं. अध्यात्मिक क्षेत्रात येतांना वा आलेल्या व्यक्तींनी आपल्या वृत्तीतील दोष ओळखणं आणि ओळखून त्यावर नियंत्रण मिळवून, मात करणं, साधनेच्या दृष्टीने जरुरी आहे. कारण वृत्तीतील दोषांवर चित्ताची शांती आणि  त्यावर नामात गती आणि प्रगती अवलंबून आहे....

भोग आणि ईश्वर १९७

भोग आणि ईश्वर  १९७   आता आपण प्रश्नाच्या गाभ्याकडे वळूया, जो १९५ व्या भागात सुरू केला. चित्तशुद्धी, साधनेचा आटापिटा, सन्मार्गावर सुरळीत वाटचाल, भोगाच्या तापापलीकडे जाऊन, फक्त आत्मिक स्व, म्हणजेच देहाचा स्व विसरून मार्गक्रमण करत राहिलो की, वासना सुटत जातात. हा प्रवास किंवा ही प्रक्रिया दीर्घकाळ चालेल किंवा थोड्याच काळात साधेल किंवा एखाद्या जन्मांतसुद्धा पूर्ण होईल. या विषयी निश्चितपणे सांगणं कठीण आहे. पण साधना, वृत्तीतील बदल, चित्तशुद्धी या पायऱ्या आत्मा जितक्या लवकर, देहाच्या माध्यमातून प्राप्त करू शकेल, तितक्या लवकर हे साध्य होईल. चित्तशुद्धी नन्तर साधना केल्याने, मन पूर्ण शरण जाण्यास अटकाव राहात नाही. म्हणजेच समर्पण, भक्तीतील प्रेमातून शरणागती,  आत्म्याला परमात्म्याची ओळख ही चित्तशुद्धी नन्तरच होऊ शकते.  चित्तशुद्धीवर इतका भर देण्याचं महत्वाचं कारण की, शुद्ध अंतःकरण हेच गुरुकृपा, ईश्वरकृपा होण्याचं मोठं माध्यम आहे. शुद्ध अंतःकरण व शुद्ध मन हे स्वच्छ पाण्यासमान आहे. पाणी जर स्फटिकासमान स्वच्छ असेल तर, त्या पाण्याचा ठाव वा तळ उत्तमरीत्या दिसतो. शुद्ध अंतःकरणाने केलेल...

भोग आणि ईश्वर १९६

भोग आणि ईश्वर  १९६   आपली खरी परीक्षा तिथेच सुरू होते जिथे आपण मनाने त्या परीक्षेला बसतो आणि नेटाने येणाऱ्या प्रश्नांची तयारी करून, गांभीर्याने उत्तरं देतो. हेच अध्यात्मात लागू होतं. म्हणजे आपण जर मनापासून ठरवलं की, संचिताचा भार आणि कर्माच्या गतीचा फेरा हा उलट फिरवायचा असेल आणि आपल्या मार्गाला सुलभ व सुकर करायचं असेल तर, येणाऱ्या अडचणींचा विचार न करणं, येणारे दुःखाचे आणि भोगांचे प्रसंग हे आपलं कर्म आणि संकल्पाची परीक्षा आहे, हे मनात ठाम योजूनच साधना सुरू करावी.  आता कोणत्याही मार्गावर एकदा वाटचाल करायचं ठरवलं की, इच्छित स्थानक येईपर्यंत, मार्गात येणाऱ्या स्थानकांचा, अडथळ्याचा विचार न करता, आपण गती, नियंत्रण, तोल यावर लक्ष देतो. जर आपलं चित्त वाहन चालवताना विचलित झालं तर, अपघात होणं, मार्गभ्रष्ट होणं आदि गोष्टी संभवतातच. इथे तर आपलं अंतिम स्थानक कधी, कोणत्या वेळी वा कोणत्या जन्मी येईल, हे माहीत नाही, वाटेत कोणती स्थानकं, टप्पे, अडचणी, मार्गभ्रष्ट होण्यासाठीचे चकवे आहेत हे देखील माहीत नाही.  चालणं गरजेचं आहे, हे एकदा नक्की झाल्यानंतर मार्गातील अडचणींचा विचार न करणं हा ...

भोग आणि ईश्वर १९५

भोग आणि ईश्वर  १९५   एक प्रश्न निर्माण होतो आणि सार्वत्रिक आहे की, भोग जर भोगावेच लागतात तर, मग आपण भक्ती साधना व नाम घेऊन काय साधतो. दुसरं, जर असं आहे तर मग पुण्याईच्या बळावर आत्मा तरून जातो किंवा पाप धुतलं जातं हे कसं काय. याचा आज परामर्ष घेऊ. याच्या उत्तराला बरेच कंगोरे आहेत, त्यांचा विस्ताराने विचार करावा लागेल. मुळात शुद्ध असलेला आत्मा, प्रथम जन्मापासून, भूलोकी आल्यावर माया, वासना यांच्या सापळ्यात आणि खेळात मशगुल होऊन, विषयात आणि संसारात मग्न होऊन जातो. मूळ शुद्ध सात्विक स्वरूपातील त्या आत्म्याला, देहाने केलेल्या   पापकर्म, वासनेच्या प्रभावातील, सांसारिक गरजांच्या ओघात, कामाच्या आवेगात, अहंकाराच्या अंधारात, केलेल्या अनेक गैरकर्मानी अशुद्धतेचा मुलामा चढत जातो. जो प्रत्येक जन्मी गडद होत जातो.  थोड्याफार पुण्यकर्मानी हा मुलामा थोडाफार कमी होत असतो. परंतु आत्म्याची मूळ शुद्धता पुन्हा यायला ज्या परिश्रमांची गरज असते, ती चित्तशुद्धीने साध्य होते. चित्तशुद्धीची सर्वात पहिली पायरी मनातील किल्मिष, किंतु परंतु, काम क्रोध, मोह, लोभ यांची बीजं पूर्णपणे काढून टाकावी लाग...

भोग आणि ईश्वर ९०

भोग आणि ईश्वर  ९०    सर्व सिद्धात्मे हे नित्य निरंतर आणि अखंड चैतंयशक्तीच्या रुपात या भूमंडळी वावरत असतात आणि ज्यावेळी साधकांच्या, साधनेमध्ये व्यत्यय अथवा बाधा आणणारी संकटं, उभी राहतात त्या त्यावेळी, सद्गुरू इष्टरूपाने येऊन, साधकांना मार्गभ्रष्ट होण्यापासून रोखतात आणि पुन्हा साधनामार्गात आणतात. याचा अनुभव मी स्वतःसुद्धा घेतलेला आहे.  प्रश्न हा आहे की साधना करतात, त्या सर्वांना, गुरू असतीलच असं नाही. पण मग ज्यांना सद्गुरू नाहीत किंवा ज्यांनी व्यावहारिक अर्थाने सद्गुरू केले नाहीत किंवा ज्यांना अजून सद्गुरुकृपा झाली नाही त्यांचं काय. यावर जरा विचार करू. साधनेच्या मार्गात असलेले साधक आणि एकलव्याचा मार्ग अनुसरून कोणा सिद्ध महात्म्यांना आपले गुरू कल्पून त्यांच्या तारक वा नाममंत्राचा जाप करणारे अनेक असतील. साधक हा साधना सुरू केल्यानंतर वा केल्यापासून त्या नामाशी वा सिद्धमंत्राशी जोडला जातो वा जोडला गेलेला असतो. साधनेची प्रामाणिकता आणि त्याच्या तरंगलहरींचा जोर हा साधनेच्या नित्य अनित्यतेवर अवलंबून असतो. मागे आपण पाहिलं त्याप्रमाणे आपली काया वाचा व मन यांनी केलेली प्रत्येक कृ...

भोग आणि ईश्वर ९१

भोग आणि ईश्वर  ९१   आज आपण आत्मबलशक्ती म्हणजे काय त्याचा विचार करूया. ज्यावेळी देह गर्भात असतो त्यावेळी तो मातेच्या उदरात स्थानापन्न असताना, त्याची सुरक्षा माता स्वतः करतेच, पण त्या गर्भाची आत्मबलशक्ती त्याचं मुख्य रक्षण करते. म्हणूनच काही काही गर्भ अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा, त्या परिस्थितीला टक्कर देऊन, या जगाला पाहतात. अश्या जीवांना संपूर्ण आयुष्य त्या आत्मबल शक्तीचा लाभ होतो आणि जन्मतः प्राप्त आत्मबलशक्ती त्यांना आयुष्यभर देहाने सशक्त आणि मनाने कणखर राखते.  अश्या व्यक्ती कोणत्याही संकटात डगमगताना वा बावरलेल्या अथवा संकटाला भ्यायलेल्या दिसणार नाहीत. अश्या काहींना जन्मजात आत्मबलशक्ती प्राप्त असते, अर्थातच ती पूर्वसुकृतानेच. आत्मबलशक्ती म्हणजे अंतरात्म्याची जागृत अवस्था, ज्यायोगे, आत्म्याचं देह, मन, बुद्धी यांच्यावर स्वनियंत्रण प्राप्त असतं आणि त्यांना सदोदित एक प्रकारचा आत्मविश्वास जाणवतो.  कोणतंही काम सुरू करताना त्यांना त्याची माहिती असो वा नसो किंवा जाण असो वा नसो, पण ते न भिता वा न घाबरता त्यात झोकून  देतात. कदाचित अपयश आलं तरी, खचून न जाण्याची वृत्...

भोग आणि ईश्वर ८०

भोग आणि ईश्वर  ८०    आठवणींचा मागोवा घेणं थांबवून, त्या जशा येतील तशाच जातील हा विचार डोक्यात ठेवून, मुख्य म्हणजे त्यांचा गुंता होऊ न देता, मनातील विचारांचा ओघ कमी करत, किंवा त्यातील चांगला विचार घेऊन पुढे जात, मनाला एका शांत स्थानकावर आणायचं. हे जाणीवपूर्वक करत असतानाच, आपला नामस्मरणाचा ध्यास नित्य सुरूच ठेवायचा.  ध्यास म्हणजे काय. ध्येयाकड़े जाण्याची आस म्हणजे ध्यास, ध्येयाशी आसक्त होण्याची आस, ध्येयासाठी प्रत्येक श्वास म्हणजे ध्यास. एखाद्या गोष्टीसाठी माणूस ज्यावेळी स्वतःला झोकून देतो आणि नित्य त्याच गोष्टीचा विचार करतो, त्याला एखाद्या गोष्टीचा ध्यास घेणं म्हणतात. ध्येय जितकं शुद्ध, पवित्र आणि सकारात्मक तितकं त्याच्या प्राप्तीसाठी झटणं उत्तम आहे आणि त्याचा ध्यास श्रेयस्कर असतो.  ध्येयवेडा माणूस प्रसंगी तहानभूक विसरून आपले कष्ट सुरू ठेवतो. भौतिक जगतात माणूस आयुष्यात अनेक ध्येयं निश्चित करतो आणि त्यांच्या पाठलागासाठी तारुण्यातील  आयुष्याचे मौल्यवान क्षण वेचतो आणि त्या ध्येयाला मिळवण्यात यशस्वी होतो. यात गैर काहीच नाही. पण हीच ध्येयासक्ती अध्यात्मिक पातळीवर ...

भोग आणि ईश्वर ७९

भोग आणि ईश्वर  ७९    नामाच्या मार्गात पुढे जाताना खरतर, मार्ग सहज व सोप्पा असायला हवा. त्यावर वाटचाल करताना अडचणीच्या गोष्टी सहजी उलगडल्या पाहिजेत. पण सहसा असं घडताना दिसत नाही. त्यातील एक महत्वाचं कारण, माझ्या मते, आपल्या आठवणींचा जुडगा, जो आपण नेहमी डोक्यात आणि मनात बाळगतो आणि मनात त्याचा कुठेतरी पाठलाग करतो, तो नामस्मरण करताना आड येत असावा किंवा येतो. जुडगा यासाठी म्हटलं की, जुडग्यात अनेक चाव्या नित्य लागणाऱ्या आणि नेहमी न लागणाऱ्या, या आपण जवळ बाळगतो. म्हणून आठवणींचा जुडगा हा शब्द त्यासाठी वापरला. कारण त्या चावीच्या जुडग्याप्रमाणे याही जुडग्यात आपण अनेक आठवणी, काही हव्याश्या, पण बऱ्याचश्या नको असलेल्या, या साठवून, त्यांचं ओझं मनासोबत घेऊन फिरत असतो. त्यांचं वर्गीकरण व पृथक्करण करून त्यांचं नित्य विश्लेषण करून टिकाऊ व टाकाऊ अश्या दोन भागात त्यांचं वाटप करावं.   टिकाऊ म्हणजे ज्या आठवून, आता इथून पुढे मन विचलित न होता, त्यातून आनंद, उत्साह आणि सकारात्मक भावभावना हाती लागतील, अश्या सर्वच आठवणी येतात. या मर्मबंधात विशेष करून बालपणीच्या सुखकर आणि मन प्रसन्न व प्रफ...

भोग आणि ईश्वर ७६

भोग आणि ईश्वर  ७६    मन हे दुधावरच्या सायीसारखं असतं. म्हणजे कसं, तर,  ज्यावेळी आपल्याला ती साय चहात किंवा कॉफीमध्ये दूध ओतताना नको असते त्यावेळी ती हमखास पुढे येऊन चहात पडणार  आणि ज्यावेळी ती हवी असते त्यावेळी ती मागे मागे जाणार. मनही तसच आहे. ज्यावेळी आपल्याला एकाग्रता हवी असते त्यावेळी ते चळवळ वा अनेक विचारात आपल्याला गुरफटून टाकणार. पण मग मन आपल्याला कसं काय साथ देणार, मदत करणार.  या सर्वांचाच विचार करून समर्थांनी मनाचे श्लोक लिहून चंचल, अस्थिर, वाऱ्यासम मनाला समजवण्याचा मार्ग आपल्याला सांगितला आहे. पण हे कसं साध्य होईल, तर मन या अदृश्य पण अस्तित्वात असलेल्या वारुचे दोन साथीदार आहेत बुद्धी आणि आत्मा. बुद्धी जसं मनाचं ऐकण्याचं कार्य करते त्याचप्रमाणे बुद्धी ही, मनाला समजावून सांगण्याचं कार्य करते. कसं. तर आपण खूप वेळा वाचतो की राग आला तर तो शांत करायला एक ते दहा किंवा त्याच्यापुढे शंभरपर्यंत आकडे मोजावे, म्हणजे राग शांत होतो. यात मन हे त्याक्षणी क्रोधीत असतं, मग आकडे कोण मोजणार, तर बुद्धी आणि आत्मा याक्षणी वा त्यावेळी बुद्धीला चेतना देणार अर्थात जेणेकरून...

भोग आणि ईश्वर १९४

भोग आणि ईश्वर  १९४   आनंद हा खरतर चारही बाजूने, किंबहुना अष्टदिशांनी भरून वाहतो आहे. प्रत्येक क्षण, प्रत्येक क्षणी, नवनवीन आहे. विश्वात , नव्हे ब्रह्मांडात सर्वत्र, म्हणजेच प्रत्येक क्षणी कुठेना कुठेतरी पुनर्निर्मिती होतच आहे. म्हणजे कुठंतरी नवीन तारे, ग्रह जन्माला येत असणार, कुठेतरी ब्रह्मांडात नवीन सूर्य व सूर्यमाला तयार होत असणार, वसुंधरेवर प्रत्येक क्षणी नवनवीन झाडं, उगवत असणार, उगवलेली प्रत्येक क्षणी वाढत असणार, नवनवीन पालवी फुटत असणार, वृक्ष बहरत असणार, नवनवीन फुलं, फळं कुठंतरी येतच असणार. इतकंच कशाला प्रत्येक क्षणी काही हजार नवीन जीव, प्राणी आणि मानव यांच्यामधून जन्माला येत असणार. असं हे अविरत आनंदाचं चक्र अव्याहतपणे चालू असतं आणि पृथ्वीच्या अंतापर्यंत सुरूच असणार. यालाच निर्मिती आणि वर्धन अर्थात वाढ होणं म्हणतात. त्रिदेवांच्या युगानुयुगांच्या संकल्पनेप्रमाणे ब्रह्मदेव अखंड निर्मितीमग्न आहेत. म्हणजेच निर्माण वा जीवन सुरू झालं की,  त्यांच्याकडून पुढच्या कार्याचा भार, अर्थातच श्रीविष्णू म्हणजेच जगतपालक वा जगतपिता, यांच्याकडे येतो.  म्हणजेच प्रत्येक सजीव वा निर्ज...

चालताना तूच सांगाती, माझा ईश्वरा

चालताना तूच सांगाती, माझा ईश्वरा बोल मी जे बोलतो, वदवून घेसी ईश्वरा मी तुझी करुणा कशी भाकू कळेना जे दिले तू, उपकार याचे मज तोलवेना  इतुके जरी मी बोललो तरीही पार तू  आत्मरंगी जाणवे, अंतरीचा ठाव तू निःशब्द करतो खेळ, मज हा श्वासाचा  श्वासही घेतो, भरवसा काय उश्वासाचा  तू दिलेले श्वास देवा, नाम घेता जाऊदे जन्म हा अर्चना करण्यात, आता जाऊदे मी शरण आलो तुला इतुकेच माझे सांगणे तूच कर्ता तूच धर्ता इतुके जगी या जाणणे श्वास सारे, मूल्य तुझे, जाणण्यात जाऊदे अंतीही तुझेच नाव ,ओठी माझ्या येऊदे  ©® कवी : प्रसन्न आठवले १२/०६/२१

भोग आणि ईश्वर १९३

भोग आणि ईश्वर  १९३   या जगाचा सर्व खेळ हा खरतर दोन गोष्टींवर अवलंबून आहे. श्रद्धा असणं किंवा श्रद्धा नसणं. श्रद्धा नसेल तर फक्त चर्मचक्षूंच्या पातळीवर जे दिसेल, ते सत्य आणि तितकंच सिद्ध. पण श्रद्धा असेल तर, जे मनाच्या नेत्रांना दिसेल जाणवेल आणि पटेल, ते ते सर्व ब्रह्ममय जगत. पुन्हा जर शब्दांचा खेळ करायचाच असेल तर श्रद्धा कशावर असेल त्यावर अवलंबून आहे. म्हणजे श्रद्धा बाह्य जगतावर असेल तर दृष्टी बहिर्यामी असेल. म्हणजेच बुद्धी तेच प्रमाण मानेल जे मेंदूच्या कक्षेत मावेल. म्हणजे तर्क आणि विचार हे त्याचं गोष्टीपर्यंत पोचतील, ज्या गोष्टी अस्तित्वात आहेत. किंबहुना ज्या ज्या गोष्टी, स्थूलपणे दाखवता येतात. ज्यांचं गणितीय समीकरण मांडता येतं, प्रमेयात्मक स्वरूपात सांगता येतं आणि शेवटी ज्या क्षला दाखवता येतं. एकप्रकारे ही देखील श्रद्धाच आहे, पण भौतिक जगतावर आणि स्थूलरूपात असणाऱ्या जगतावर. म्हणजे कुठेतरी श्रद्धा ही असावीच लागते.  दुसरीकडे ज्यांची श्रद्धा बुद्धी आणि तर्क या पलीकडील गोष्टी पाहू, समजू वा मनःचक्षूंनी जाणू शकते, ते या जगात असूनही जगापलीकडे असलेल्या जगाच्या निर्मात्याकडे त्य...