भोग आणि ईश्वर १४६
नामस्मरणाचं महत्व खरतर अनेक संत महंत इत्यादींनी आपल्या जीवनाने आणि आपल्या कार्याने सिद्ध केलं आहे. एवढं असलं तरी अजूनही अनेकांना याचं महत्व विषद करत राहावं लागतंय आणि लागणार आहे. याचं कारण प्रत्येक पिढीनंतर वा पिढीदरपिढी प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी हस्तांतरित होतेच असं नाही. याचं कारण या हस्तांतरणासाठी शारीरिक, मानसिक आणि आत्मिक सहभाग, सर्व संस्कारांचं मनातून मनात हस्तांतरण होणं आणि आत्म्याचा यात सहभाग असणं महत्वाचं आहे.
यात अजून एक महत्वाचा भाग म्हणजे काळ. काळाचा कोणता भाग आहे ज्यामध्ये हे हस्तांतरण होत आहे, त्या काळाची गती, इतिहासातील त्या काळाचं स्थान या सर्वांवर या संस्कारांचं पुढे पुढे जाणं अवलंबून आहे. विचार करा आजपासून कित्येक शतकं आधी, जेंव्हा कागद वा लेखनाचं माध्यम आणि सदर लेखन साठवणुकीचे काहीही पर्याय उपलब्ध नसतानासुद्धा ही स्तोत्र, श्लोक, वेदाध्ययन, इत्यादी माध्यमांनी हे ज्ञान, हा नामाचा महिमा, या भगवंताच्या नामाच्या महिमेच्या कथा हे सर्व हजारो वर्षे हस्तांतरित होत राहिलं, हे या सनातन धर्माचं यश आणि रहस्य आहे.
मुळात असे अनेक ज्ञात व अज्ञात करोडो जनसामान्य आणि ज्ञानी संत महंत यांबरोबर, त्या सर्व घरातील अनामिक स्त्रीया ज्यांनी हे हस्तांतरण लहान वयात परवचा, शुभंकरोती यासारख्या छोट्या छोट्या गोष्टीतून, त्याचं महत्व लहान वयातच मनामध्ये कोरून, अश्या गोष्टींचे संस्कार आत्म्यावर केले. या सर्व हस्तांतरणात फक्त एखाद्या जातीचा वा जमातीचाच सहभाग होता असं नाही, तर सर्व समाजाने आणि समाजातील प्रत्येक घटकाने आपापल्या परीने आणि क्षमतेने या हस्तांतरणाला साथ दिली.
याच गोष्टीला वा मुद्द्याला जाणून संतश्रेष्ठ ज्ञानोबा माउलींनी प्रथमच प्राकृतात श्रीमदभगवद्गीता, ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ दीपिका या रुपात मांडून या संस्कारांच्या ठेव्याला व्यापक स्वरूप प्राप्त करून दिलं. ज्याचा वसा व वारसा त्याच काळात आणि तद्नंतर अनेक संतांनी भगवंताच्या या नामचं महत्व विषद करण्यासाठी प्राकृतात अर्थात मायबोलीत अगणित अभंग रचून हा प्रवाह वाहता ठेवला. या प्रवाहात आपापल्या क्षमतेनुसार कित्येक ज्ञात अज्ञात ज्ञानी आणि पुण्यवंत व्यक्तींनी आपलं ओंजळभर ज्ञान ओतून या नामामार्गाच्या प्रवाहाला आपल्यापर्यंत पोहोचतं केलं आहे, हे कदापिही विसरून चालणार नाही.
मौखिक स्वरूपात सुरवातीला असलेल्या या ज्ञानाचं दालन काळाच्या ओघात आणि वेगात विविध माध्यमात प्रसारित होऊन हस्ते परहस्ते आता फक्त एका बोटावर प्राप्त झालं आहे. म्हणजे मला हवे असलेले ज्ञान वा कोणताही धार्मिक ग्रंथ वा त्यावरील टीका किंवा भावार्थ हा सहजी उपलब्ध होऊन, त्याचं प्रसारण हातातील छोट्या मशीनमध्ये प्राप्त झालेलं आहे.
खरतर हे त्या अनंताचे उपकार आहेत की त्याने काळाच्या अश्या टप्प्यावर जन्माला घातलं आहे जिथे, संस्कारांच्या, धर्माच्या नामाच्या संबंधीच्या कथा, भावार्थ लेख लेखन हे सर्व सहजी उपलब्ध होऊन, या सर्वांच्या माध्यमातून परमेश्वरी नाम व त्याची भक्ती आणि प्रेम यांचं प्रसारण होत आहे आणि आपण त्याचा लाभ घेत आहोत.माझ्या मते हे सर्व भगवंताचे मुद्रित प्रसारित अवतारच आहेत, अत्यंत सूक्ष्म अश्या तांत्रिक रूपातील.
एक उदाहरण देतो. आज या माझ्याच मालिकेचं प्रसारण हे फेसबुक व व्हाट्सअप्प या माध्यमातून कुठे कुठे होत आहे, हे मला फोन व व्हाट्सअप्पवर येणाऱ्या प्रतिक्रिया, प्रतिसाद यामुळे लक्षात येतं. आता गेल्या पाच ते दहा वर्षातील या सूक्ष्मरूप अवतारी नारायणाचं विश्लेषण मी कसं करतो ते पुढील भागात पाहूया.
आज इथेच थांबू आणि उद्या नवीन चिंतन घेऊन येईन. तोपर्यंत नाम घ्या आणि साधनेत रहा, त्यातूनच नक्की मार्ग मिळतील.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२५/०४/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment