Skip to main content

भोग आणि ईश्वर १२३

भोग आणि ईश्वर  १२३
 
खूपवेळा एखादी गोष्ट, वा मुद्दा वा विचार आपल्याला पडतो, पण मनाला तो पचवता येत नाही. याचा अर्थ इथे बुद्धी आणि मन यांत भेद निर्माण होतो. बुद्धी ही जडत्वाचं प्रतीक आहे. त्यामुळे तिला ज्ञान आणि अनुभव या आधारे वळवता येतं किंवा वळवावं लागतं. पण बुद्धीला एखादी गोष्ट पटली की बुद्धी त्यानुसार विचार करायला तयार असते. समस्या मनाची आहे.

मन हे वायु आणि आकाशतत्वाचं प्रतीक आहे. त्यामुळे ते चंचल आणि अस्थिर आहे. ते कधीकधी कृष्णविवराप्रमाणे खोल वा गहन आणि अप्राप्य भासतं, तर कधी एखाद्या उथळ जलाशयातील प्रवाहाप्रमाणे अधीर, अस्थिर आणि अविचारी वाटतं.  हा मनाचा स्वभाव वा वृत्ती मनुष्याला चिकटवून, एखाद्याला आपण उथळ अविचारी म्हणून संबोधतो. इथे एक गोष्ट लक्षात घ्या की, त्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे त्याची बुद्धी चंचल वा अस्थिर असेलच असं नाही. 

किंबहुना बरेचवेळा, त्या बुद्धीच्या स्थिरतेपेक्षा मनाची चंचलता कैकपट असल्यामुळे, बुद्धीच्या कार्याला वाव आणि वेळ मिळत नाही. सदर व्यक्तीचं मन कर्म करून घेतं आणि बुद्धी नन्तर विचार करून न्यूनगंड अथवा गिल्ट निर्माण होतो. या गिल्टचं मुख्य कारण चंचल मनाने केलेली अविचारी कृती आणि बुद्धीच्या विचारांना अर्थात विवेकाला वापरण्याची नसलेली सवय आणि  या भिन्नतेमुळे निर्माण झालेली अविचारी कृती आणि नंतरचा पश्चाताप ही अवस्था. यामध्ये आपल्याला काय करता येऊ शकतं याचा विचार करूया.

इथेसुद्धा मनाला एखादा नामासारखा नित्य छंद वा नाद अथवा सवय असेल तर, ज्यावेळी मनाचा वेग बुद्धीच्या वेगापेक्षा जास्त होतो आणि अविचारी कृती होण्याचा संभव असतो, त्यावेळी क्षणात मनाला नामाच्या छंदाकडे वळवायचं. इथेच विवेक वा बुद्धी जागी राहण्याची गरज आणि त्यायोगे सवय, जडवून घेतली जाईल. कोणतीही नवीन गोष्ट करताना आणि त्याचं सूत्र शरीर, बुद्धी मन यांना पटायला आणि त्यांचा ताळमेळ जमून ते समीकरण साध्य व्हायला प्रयास अर्थात प्रॅक्टिस हे नेहमी उपयोगी पडतात.

आपण वाहन चालवायला शिकतो, ते काय आहे. तर तंत्राची सवय देह अर्थात हात पाय, बुद्धी आणि मन यांना लावून त्यांची एकसूत्रता साधणं. म्हणजेच क्लच, ब्रेक अँक्सलरेटर स्टेअरिंग व्हील, दिशा वेग यांचं ज्ञान, आकलन, अनुमान, या सर्वांसह गाडीचं नियंत्रण इत्यादी सर्व गोष्टी, काही दिवसाच्या प्रॅक्टिसने सहजी साध्य होऊन, आपण जुजबी ते उत्तम कार चालवायला लागतो. यात इतक्या सर्व गोष्टी करण्याची सवय आधी देह मग बुद्धी आणि त्यानंतर मन यांना जमल्यानंतर, एका ठराविक काळानंतर आपण गाडी चालवतो आहोत हे देखील आपल्याला गाडी चालवताना लक्षात रहात नाही, इतकं ते सहज होऊन जातं. 

याच तंत्राचा आणि मंत्राचा वापर करायचा, प्रयास , प्रयत्न हे जाणूनबुजून करायचे, मनाला देहाच्या माध्यमातून वळवून अविचारी कृती करण्यापासून रोखायचं आणि कृतीआधी विचार व विवेक आणि बुद्धीचा वापर या गोष्टी सवयीच्या करायच्या. हे सूत्र बुद्धीत देहात आणि मनात, कार चालवण्या प्रमाणे, खूणगाठ म्हणून बांधून घेतल्यास, नक्कीच एका ठराविक काळानंतर आपण अविचारी कृती आणि नंतर पश्चाताप यातून बाहेर येऊ शकतो. 

यात एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा की, मन हे वायुरूप असल्यामुळे उत्साहित आणि प्रोत्साहित होऊन अविचारी कृती घडते. मनाच्या या प्रोत्साहित होण्यालाच आपल्याला बांध घालायचा आहे. या प्रोत्साहित होण्याची कारणं एकतर पटकन अतिआनंदी होणारं किंवा पटकन रागावून निर्णय व कृती करणारं किंवा एखाद्या नकारात्मक, दुःखी, इतरांनी लावलेल्या दूषणांनी पटकन नाराज,निराश वा दुःखी होणारं, आपलं मन अर्थात वृत्ती वा स्वभाव आहे. 

त्याचा बुद्धिपूर्वक अभ्यास करून असे क्षण आले वा येत आहेत हे जाणवलं किंवा अधिच ज्ञात झालं की, त्याक्षणी एकतर शांत राहून बुद्धीला कार्य करू देणं, शांत राहून समोरच्याचा रसभंग करणं, किंवा शक्य नसल्यास त्या क्षणापूरती ती जागा सोडून निघून जाणं, या सवयीने आपण मनाला वळवू शकतो वा शीघ्रविचार व शीघ्रकृती यातून बाहेर पडू शकतो. 

 वरील काहीही शक्य नसेल तर त्याक्षणी मन नामात गुंतवून घ्यायची सवय लावावी. याने दोन गोष्टी साध्य होतात. एक आपण नामाचा अभ्यास दृढ करतो आणि समोरच्या घटनेकडे, बोलण्याकडे दुर्लक्ष होऊन, शब्दाने आपल्या चंचल मनात उडणारे वा उडू शकणारे स्पार्क अर्थात ऋणभारित विद्युत कण न उडता आपण अविचारातून बाहेर पडू, त्याक्षणी केलेल्या एखाद्या धनभारीत कृतीने. 

आता मनावरच्या धनभारीत व ऋणभारित शक्ती वा बला बद्दल उद्या चर्चा करूया. तोपर्यंत नामात रहा आणि नित्य नामाचाच विचार करा, म्हणजे अविचार व अविचारी कृती टळेल. 

भोग आणि ईश्वर भाग १ या पुस्तकाची नोंदणी सुरू आहे, आपली प्रत योग्य वेळी राखून ठेवा, कारण किती प्रति विकल्या जातील याचा अंदाज नसल्यामुळे कमी प्रति छापत आहे. शंभराच्यावर पुस्तकांची नोंदणी झाली आहे.बाकी तपशिलासाठी खालील क्रमांकावर संदेश पाठवा किंवा फोन करा. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०२/०४/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...