Skip to main content

भोग आणि ईश्वर १४७

भोग आणि ईश्वर  १४७
 
खरतर ह्या पाच ते दहा वर्षातील तंत्राचा प्रभाव आणि त्यायोगे अध्यात्मिक, पौराणिक ज्ञान, त्याचं विश्लेषण ही सहजसाध्य गोष्ट भासली तरी, माझ्यामते यामागे अनेक युगांचं त्या युगातील त्या त्या समाजाची सामूहिक आणि अनेकांची व्यक्तिगत पुण्याई, हा ज्ञान व नामप्रवाह पिढ्यान्पिढ्या वाहता ठेवण्यासाठी, प्रसंगी आलेल्या संकटातून पुढे जात जात, अनेक स्थित्यंतरं पार करत त्याला आपल्यापर्यंत पोचवणाऱ्या लाखो अज्ञात पारमथिकांचं आणि तितकंच महत्व त्यांच्या रक्षणार्थ प्राण गमावलेल्या लाखो वीरांचं योगदान हे शव्दातीत आहे. 

हा अखंड वाहणारा व वाहता राहणारा आत्मयज्ञ आहे. यात अगणित कर्माच्या आहुत्या पडल्या आहेत आणि पडत राहतील. प्रत्येकानेच आपल्या परीने यात सहभाग घेतला आहे. संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींपासून पुढचा प्रवास आपल्याला ज्ञात आहेच. त्या आधीच्या काळातील यातील शिलेदार हे अज्ञात असले तरीही त्यांना न स्मरता व त्यांना वंदन न करता आपण पुढे जाऊ शकत नाही. 

आज जे आपल्याला माहितीस्वरूपात नेटवर गुगलवर विकिपीडियावर सहजी उपलब्ध होतं ते, कुठेतरी या अनेक धर्मवीरांनी प्रामाणिकपणे जतन करत करत, अनेक धर्मसंकटात,  इथपर्यंत आणून ठेवलं आहे, हे विसरून चालणार नाही. नामाची ही कास अगदी भक्तप्रल्हाद, बाळ ध्रुव ते अनेक संत महंत, महाराज, स्वामी यांच्यापर्यंत येऊन पोचते. यांनी स्वत्वाचा त्याग करून कुठेतरी आपली निष्ठा, श्रद्धा, भक्ती आणि प्रेम आपल्या आराध्याच्या चरणी वाहिली आणि निष्ठेची कसोटी वा परिमाणं मांडून ठेवली. 

मुळात पुराणात सांगितल्याप्रमाणे कलियुग हे फक्त आणि फक्त स्मरण चैतन्यमय आहे आणि अंतापर्यंत राहील. स्मरण चैतन्य म्हणजे स्मरणातून चैतन्य, ऊर्जा, चेतना, आत्मशक्ती प्रदान करणारं. बाकी भक्तीचे तपादी सर्व मार्ग हे या युगात क्षीण आहेत आणि असतील. म्हणजेच प्रभुस्मरण हा ईश्वराला भेटण्याचा, संकटात व दुःखात साद घालण्याचा, सदोदित जवळ पाहण्याचा एकमेव मार्ग शिल्लक आहे. 

आता यावर काहीजण म्हणतील आम्ही फक्त एकदा नमस्कार करतो, बाकी स्मरण काही करत नाही किंवा जमत नाही. यावर उत्तर असं आहे की, एकदा नमस्कार हा सुद्धा स्मरणाचाच प्रकार वा भाग आहे. कसं, तर आपण ज्यावेळी नमस्कार करतो त्यावेळी , एक क्षण का होईना,त्या रुपाला पाहतो. हे झालं चक्षुस्मरण अर्थात पंचेंद्रियातील एका इंद्रियाने त्या रुपाला पाहून केलेलं स्मरण वा चिंतन.  नमस्कार करताना आपण कर जोडतो, हे झालं कायेद्वारे स्मरण. 

नमस्कार करताना एक क्षण डोळ्यातून ती प्रतिमा मनात जाते आणि तिथे त्याचं नकळत स्मरण अर्थात मनातील भगवंताशी त्या प्रतिमेची क्षणमात्र एकरूपता होते. म्हणजेच मन स्मरण झालं. मनात वा प्रत्यक्षात आपण नमस्कार करताना नाम मुखातून वैखरीने वा परा, पश्यन्ति वाणीने घेतोच. म्हणजे हे झाले वाचिक स्मरण आणि या सर्वाचा एकत्रित परिणाम मेंदूत नोंदवून तो आत्म्यापर्यंत पोचवला जातो आणि त्या एका क्षणाने आत्मा सुखावतो हे झालं आत्मस्मरण, चैतन्य व ऊर्जा प्राप्ती होते, एकवार मस्तक झुकवण्याने. 

म्हणजेच एका नमस्कारात इतकी स्मरणं सामावलेली आहेत, तर मग प्रत्यक्षात नामस्मरण करण्यात किती अद्भुत आनंद, समाधान, चैतन्य समाविष्ट आहे याचा अनुभव अर्थात अनुभूती घेऊनच, त्याचं प्रत्यंतर वा प्रत्यय आणि त्याद्वारे आत्मप्रचिती घेऊन पाहिलं, तरच या सर्वाचं सार लक्षात येईल. कारण हजारो पानं नामस्मरणावर लिहून ते मांडणं कनिष्ठ आहे. पण प्रत्यक्ष एकदा त्याचा अनुभव घेऊन, प्रचिती घेणं हे सर्वश्रेष्ठ आहे. 

यात प्रत्यक्ष नाम घेणं, त्या नामासंबंधी वाचून मनाला सात्विक आनंद देत राहणं आणि या गोष्टीचा उपलब्ध तंत्र साधनांद्वारे प्रसार करून दुसऱ्यापर्यंत पोचवणं हा देखील सनातन धर्म प्रचाराचाच एक भाग आहे. कारण आपण तो प्रभुस्मरणाचा आनंद घेता घेता अनेकांना त्यात सामील करून, तोच आनंद द्विगुणित पंचगुणीत करणं हा धर्माचाच भाग आहे आणि तो जसजशी साधनांची उपलब्धता वाढेल आणि आधुनिक तंत्रज्ञान पुढे जाईल, तसतसा हा प्रचार व प्रसार करत राहूया. कदाचित अनेक मुखी आधुनिक तंत्रज्ञानाचा हा भगवंत अवतार असेल किंवा वाईटातून चांगलं शोधण्याच्या आपल्या वृत्तीचा हा भाग असेल. 

म्हणूनच या तंत्रज्ञानाचा फायदा घेत घेत, नामप्रसार, प्रचार आणि त्याद्वारे धर्मकार्य करण्यासाठी करत राहूया. या आधुनिकतेचा वापर धर्म नाम व चिंतन यांच्या प्रसारार्थ करून घेऊया. नाममार्गी होऊया. नामामार्गात अनेकांना आणूया. बघूया उद्या नवीन विषय पण तोपर्यंत नाम घ्या आणि साधनेत रहा, त्यातूनच नक्की मार्ग मिळतील. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२६/०४/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...