भोग आणि ईश्वर १५०
एखादा गहन विषय घेऊन सलगपणे त्यावर १५० दिवस लिहिणं,हे केवळ माझे सद्गुरू श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या कृपाप्रसादाचा आंज वाचक प्रतिसादाचा परिणाम आहे. अन्यथा १ डिसेंबरला सुरू झालेला हा लेखन प्रवास पहिल्या भागाच्या पुस्तक प्रकाशनापर्यंत आणि वाचकांच्या उदंड प्रतिसदपर्यंत पोचलाच नसता. हनुमान जन्मोत्सवाला एका दिवसात मी, सौ, मुलगी, माझी मेव्हणी आणि भाचा आम्ही मिळून जवळजवळ २०० पुस्तकाचं पॅकिंग आणि कुरियर वितरण केलं.हे सुद्धा स्वप्नवत वाटावं असं घडलं.
काल कुरियर वाल्याने सर्व पार्सल्स नेऊन वितरणाची व्यवस्था केली आणि एका कार्याची कृतकृत्यता घडल्याचा आनंद मिळाला. आता श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ या पुस्तकावर काम सुरू केलं आहे. सर्व गोष्टी जुळून आल्यास, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी त्यासंबंधी आगाऊ नोंदणीची सूचना इथेच पोस्ट करीन. असो.
आता विषयाकडे वळूया. मुळात आपण विषयाचा आनंद घेतो त्यावेळी, वासनेच्या जोरावर वा शक्तीमुळे मन तिथे खेचलं जातं आणि नकळतपणे एकाग्रतेने काम होतं. या वासनांमध्ये काम क्रोध मद मत्सर इत्यादी सर्व वासना सामावलेल्या आहेत. त्या त्यावेळी त्या त्या कर्मात मन रममाण होऊन, त्या क्षणाचा आनंद घेतं. पण वास्तविक हा आनंद मन न घेता वासनारूपातील असुरशक्ती घेतात.
यात एक गोष्ट लक्षात घ्या की, यामध्ये नैतिकदृष्टीने योग्य आणि धर्ममान्य काम सात्विक संताप इत्यादी वगळण्यात आले आहेत. त्यामुळे त्याबाबत गैरसमज नसावा. परंतु त्याचा अतिरेक नसावा आणि एका विशिष्ट वयानंतर त्यातून हळूहळू निवृत्ती व्हावी. अन्यथा चुकीच्या वयातील एका मोहापायी आपल्या कर्तृत्ववान मुलाचा अधिकार डावलून मोहापायी तो चुकीच्या वारसांच्या हातात गेला नसता आणि पुढील सर्व महाभारत टळलं असतं.
मूळ मुद्दा हा की त्या त्या वासनेच्या उपभोगात, मन एकाग्र होऊन चित्त त्या गोष्टींचा आनंद घेतं, त्यावेळी आपण मनाची एकाग्रता कशी काय होते, किंवा चिंता काळज्या करण्याच्या नादात आपलं भान कसं हरपतं, याचा विचारदेखील आपण कधी करत नाही. पण यातून एक नक्की लक्षात येईल की, मन एकाग्र होऊ शकतं. म्हणजेच एकाग्रता हा विषय मनाला नवीन नाही. फक्त ते त्या मनाच्या आवडीच्या, चवीच्या विषयांमध्ये नक्कीच एकाग्र होतं, आपली इच्छा असो वा नसो.
पण आपल्याला हवं आहे त्यावेळी किंवा आत्मोन्नत्तीच्या मार्गावर, जिथे आपल्या आत्म्याचा उद्धार अवलंबून आहे, त्यावेळी हेच मन नको नको ते विचार भविष्यातील वा वर्तमानातील चिंता, भूतकाळातील चुका, प्रमाद यांना उभं करून, एकाग्रतेचा नेहमी भंग करतं. याचं महत्वाचं कारण म्हणजे विषयाकडे, चिंतेकडे व काळजी यांकडे एकूणच असलेला मनाचा ओढा. मागील काही लेखांमध्ये सांगितल्या प्रमाणे या नकारात्मक गोष्टी, विचार, काळज्या, विषयवासना कामक्रोधादी विकार यांच्या लहरी तीव्र असल्यामुळे मन सहजच त्याकडे आकृष्ट होतं.
दुसरं कारण म्हणजे मनाला एकूणच श्रम वा त्रास आणि विषरहित होणं, यांची आवड नसते. त्यामुळे ते आपल्यालासुद्धा त्यापासून परावृत्त करण्यासाठी अनेक विचार, अवेळी मनात आणून, एकाग्र होण्यास एक प्रकारे असहकार करतं. यात आपला निग्रह, आपली निष्ठा, चिकाटी, श्रद्धा, यांची परीक्षा वा कस लागतो. तो तसा लागत आहे हे ध्यानात धरून जर नामस्मरण वा साधन केलं तर, अवेळी येणारे विचार आणि एकाग्रता भंग करणारे मनाचे खेळ यातून सहजी पुढे जाता येईल. प्रश्न आहे निष्ठा, चिकाटी, श्रद्धा आणि नेट यांचा.
बघूया त्यासाठी काय करता येईल. तोपर्यंत नाम घेत रहा, साधनेत रहा. शेवटी आपली साधनाच पुढील मार्ग प्रशस्त करणार आहे.
भोग आणि ईश्वर भाग १, या पुस्तकाची आगाऊ नोंदणी केलेल्या सर्वांची पुस्तकं रवाना झाली आहेत.
अजूनही ज्यांना पुस्तक हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प
क्रमांकावर संपर्क करावा.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२९/०४/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment