राम अनुज भरत भाग १९
श्रीराम जयराम जय जयराम!!
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.
दोन्ही ऋषिवरांनी,एकमेकांची आस्थेने आपापल्या गुरुकुल, विद्यार्थी, पाठक यांच्या विषयीची प्रूच्छा केली. जमलेले सर्वजण विद्वत्ता, ज्ञान यांनी परिपूर्ण असलेले, पण तरीही शांत, गंभीर आणि विनम्र असलेले, सप्तर्षी पैकी दोन असलेले, हे व्युत्पन्न पाहून सुख समाधान व आनंदाची अनुभूती घेत होते.
ऋषिवरांची भेट झाल्यावर महर्षी भारद्वाज भरताकडे वळून म्हणाले.
"हे अयोध्या भूषण भरत, आपल्या मातांचा आणि राज स्नुषांचा परिचय आम्हास घडवावा."
भरताने अत्यंत आदरयुक्त भावाने, सादर वंदन करून, जशी आपली आज्ञा, असं म्हणून ज्येष्ठ माता कौसल्या यांच्याकडे अंगुली निर्देश केला.
" साक्षात श्री नारायणाचे तेज, ज्यांनी आपल्या उदरी धारण केले, मूळ कौसल देशाच्या राजकन्या आणि स्वर्गीय महाराज दशरथ यांच्या प्रथम पत्नी व ज्येष्ठ भ्राताश्री रघुनंदन यांच्या मातोश्री, माता कौसल्या."
ऋषी भारद्वाज यांनी त्यांना आदरयुक्त भावात प्रणाम केला. त्यानंतर माता सुमित्रा यांच्याकडे निर्देश करून भरत म्हणाला
" हे ब्रह्मस्वरूप ऋषिवर, या माता सुमित्रा. काशी नरेश यांची राजकन्या आणि महाराज दशरथ यांच्या द्वितीय भार्या आणि महापराक्रमी, राममय स्वरूप असलेल्या भ्राता लक्ष्मण आणि माझा प्रिय सखा स्वरूप असलेल्या या शत्रुघ्न अश्या दोन जागृत तेजाच्या माता असलेल्या. त्याचप्रमाणे मला, माता कौसल्या यांच्या प्रमाणेच प्रिय असलेल्या अश्या माता सुमित्रा. "
महर्षीनी दोन्ही कर जोडून नमस्कार केला. त्यानंतर भरताने माता कैकयी हिच्याकडे निर्देश करून सांगितले की,
" स्वर्गीय महाराज दशरथ यांच्या सर्वात प्रिय असलेल्या, कैकेय नरेश राजा श्री अश्वपती, यांची कन्या असलेल्या माता कैकयी. यांच्याच आज्ञेने प्राणप्रिय श्री दशरथ नंदन कुलभूषण श्रीराम यांना वनवास घडला आणि पुढील सर्व अप्रिय घटनाक्रम घटित झाला. त्याला जबाबदार असलेल्या या राजा दशरथ यांच्या प्रिय पत्नी असूनही, त्यांच्या करुणाजनक मृत्यूस जबाबदार असलेल्या कैकयी देवी."
भरताचा क्रोध त्यांच्या नेत्रातून आणि शब्द बाणातून जाणवत होता. महर्षी भारद्वाज शांत स्वरात, भरताकडे पाहून म्हणाले
" हे रघुकुल भूषण, दशरथ नंदन भरत, जे काही झालं, त्याचा प्रत्यक्ष श्रीराम, देवी जानकी याना तिळमात्र सुद्धा कोणताही क्रोध वा अन्य कोणताही गैर भाव नाही. त्याच प्रमाणे मी स्पष्ट शब्दात पुन्हा सांगू इच्छितो की, जे काही घडलं ते नियतीच्या इच्छेने आणि अत्यंत दूरगामी दृष्टीने घडले आहे. त्यामुळे तू व्यर्थ क्रोध व उद्विग्न भाव प्रकट करणे टाळावे आणि आहे ते स्वीकारून पुढे जावे "
भरत, महर्षींच्या गंभीर बोलांनी लज्जित झाला आणि विनम्रतेने त्याने आपला प्रिय बंधू शत्रुघ्न यांसह आर्य सुमंत मांडवी आणि श्रुतकिर्ती यांचा सुपरीचय करून दिला. महर्षीनी सर्वांना, हस्तपाद प्रक्षालन, करून स्वस्थ होण्याची आग्रहाची विनंती केली. अर्थातच सर्वजण निर्गमित झाल्यावर, भरताला घेऊन, आपल्या एक,दोन ज्येष्ठ ऋषीवर सहाय्यकांसह आपल्या अग्निशाळेत गेले.
तिथे गेल्यावर, महर्षीं दर्भाच्या आसनावर,पद्मासन घालून, स्थानापन्न झाले. त्यानंतर त्यांनी द्विराचामन अर्थात दोन वेळा आचमन करून, मंत्र म्हणून खालील प्रकारे आवाहन केलं.
श्रीराम जयराम जय जयराम!!
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!
ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा, ही नम्र विनंती.
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
२७/०६/२०२३
9049353809
9960762179
Comments
Post a Comment