राम अनुज भरत भाग १०
श्रीराम जयराम जय जयराम!!
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.
निषाद राज गुह, प्रभूंना वनवासात निघाल्यावर भेटलेला आणि भक्त झालेला. तो या सर्व नाविक, मल्लाह अर्थात निषाद यांचा प्रमुख म्हणजेच त्यांचा सर्वस्व, राजा होता. ते सारेजण गंगा तटावर येणाऱ्या यात्री, प्रवासी जनांची प्रतीक्षा करत होते. तसा त्यांचा तो नित्य दिनक्रम होता. संध्याकाळ पर्यंत किंवा कधी कधी, काही विशेष यात्रा, सणवार असेल तर रात्री उशिरापर्यंत, लोकांना गंगा पार करून आणणं, हे त्यांच्या चरितार्थाचं पिढ्यान् पिढ्याचं साधन होता.
त्यांच्यातील काही जणांनी मासेमारी आणि तत्सम व्यवसाय करत आपला जीवन चरितार्थ चालवण्याचा उद्योग धरला होता. काहींनी एकाचं घरात दोन्ही कामं विनासायास वाटून घेतली होती. त्यांचा राजा अर्थात निषादराज गूह याचा शब्द त्यांच्यासाठी अंतिम होता. आजपर्यंत एकही तंटा असा झाला नाही, ज्यामधे, निषादराज गुहाने केलेला निवाडा स्वीकारला गेला नाही.
गूह याच्या या कर्तृत्वाला आधार त्याचा सरळ स्वभाव, सत्याच्या बाजूने निर्भिडपणे उभ राहण्याचा धीट पणा आणि आपल्या बांधवांसाठी प्रसंगी जीव संकटात टाकण्याची वृत्ती होता.याच त्यांच्यातील सच्या माणसाला, सर्व समाज बांधव यांनी मुख्य किंवा निषाद समाजाचा राजा म्हणून मान्यता दिली होती.
आपल्या व्यवसाय बंधुंसह आपल्या व्यवसायासाठी गंगा तटी गरजुंच्या प्रतीक्षेत असलेल्या निषाद राज गूह, याना लांबून अयोध्येची चतुरंग सेना येताना दिसली. सर्वांच्या पुढे अर्थात राजकुमार भरत, शत्रुघ्न आणि त्यांच्या सोबत बाजूच्याच रथात, आर्य सुमंत त्यामागे, आखीव रेखीव पद्धतीने आणि शिस्तबद्धतेने, अनेक रथात आरुढ अयोध्येचे अती रथी, महारथी, रथी, त्यामागे, अश्वदळ, गजदळ, पददळ आणि या सर्वांच्या मध्यभागी असलेले राजपरिवारा तील स्त्रिया यांचे रथ, सेवक व सेविका, असा संपूर्ण ताफा घेऊन जणूकाही समोरून संपूर्ण अयोध्येचं सैन्यच चालून येत आहे, असाच भास गुहाला झाला.
त्या पाठीमागे असलेले असंख्य प्रजाजन, अजून दृष्टीस पडले नव्हते आणि राणी परिवार व इतर स्त्रीवर्ग हा सुरक्षेच्या कारणास्तव मध्यभागी असल्यामुळे, गुहाच्या दृष्टीस पडले नव्हते. त्यामुळे त्याचा असा समज झाला की, वनवासात पाठवलेल्या श्रीराम याना पकडून न्यायला, स्वतः भरत चाल करून येत आहे. त्याने लगोलग आपल्या सर्व बांधवांना, साथीदारांना सज्ज केलं.
आपल्या राज्यातील सर्व सैनिकांना तातडीने आदेश पाठवून, सुसज्ज होऊन, तीर कमठे, भाले, खड्ग व इतर सर्व युद्ध साहित्य घेऊन, काही क्षणात जमवलं. यातून त्याची चतुरस्त्र वृत्ती, सावधता, सजगता, चाणाक्ष वृत्ती, आपल्या राज्या साठी सतर्क असण्याची वृत्ती आणि श्रीराम प्रती प्रेमभाव आपुलकी, भक्ती दिसून आली. त्याने त्वरित आपल्या काही दुतांना, गुप्तपणे पुढे धाडून, कोण कोण आहे, किती सैन्य आहे, काय काय तयारी आहे, काय योजना आहे, नक्की का व कशासाठी येत आहेत, याची संपूर्ण माहिती घेऊन येण्याचा आदर्श दिला.
त्याच्या हेरांनी फार कमी अवधीत माहिती आणली की, हे सर्व श्रीराम यांच्या भेटीसाठी निघाले आहेत. याव्यतिरिक्त त्यांचा उद्देश श्रीरामांना घेऊन येण्याचा आहे. पण तरीही सावध गुहाने यावर पूर्णतः विसंबून न राहता आपल्या सैनिकांना योग्य योग्य गुप्त जागी सज्ज होऊन, उभ राहून, आपल्या आज्ञेची प्रतीक्षा करावी, अशी सूचना केली. प्रत्येकाने आपली आपली ठरवून दिलेली जागा घेऊन, येणाऱ्या सैन्याची व राजा गुहा यांच्या आदेशाकडे नजर ठेवून सावध पावित्रां घेतला.
श्रीराम जयराम जय जयराम!!
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!
ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा, ही नम्र विनंती.
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
१८/०६/२०२३
9049353809
9960762179
Comments
Post a Comment