Skip to main content

राम अनुज भरत भाग १२

राम अनुज भरत भाग १२

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.

निषाद आपल्या नेत्रात पाणी आणून सांगत होता. 

"परंतु मला एका गैरसमजाची कबुली द्यायची आहे. आपल्याला ससैन्य येताना पाहून, मी समजलो होतो की, आपण अयोध्येचं सैन्य घेऊन, त्रिलोकाचे पालक, श्रीराम याना वनवासातून कैद करून घेऊन जाण्यासाठी आलेला आहात. कारण आपल्या मातोश्री राणी कैकयी यांनीच प्रभूंना वनवासाची आज्ञा, महाराज दशरथ याना द्यायला लावली, अशी वार्ता कानी आल्यापासून, आपल्यावर संदेह निर्माण होऊन, आपल्याबद्दल मनात किंतु जागृत झाला होता. 

परंतु आपले,प्रभू श्रीराम यांच्याबद्दल विशेष स्नेहपूर्ण विचार ऐकून, मनातील संदेह दूर झाला आणि मन आपल्याबाबत पूर्ण निःसंशय झालं." 

निषादाचे शब्द ऐकून, कानात लोहाचा रस ओतावा तसा भास झालेला भरत, पुन्हा हात जोडून. म्हणाला

" हे गूह, म्हणूनच मला ज्येष्ठ भ्राता श्रीराम याना त्वरित भेटून, हे निष्कंटक राज्य त्यांना सोपवून, त्यांची सेवा करण्यात, पूर्ण जीवन व्यतीत करायचं आहे. जर त्यांनी यायला नकार दिलाच तर, त्यांच्यासोबत मीसुद्धा, वन वासात जाईन. पण हे राज्य आणि राज्यपद स्वप्नात सुद्धा माझ्या मनात मोह निर्माण करू शकणार नाही. याच कारणाने भ्राता गेले त्याचं मार्गाने, अती शीघ्र जाऊन त्यांना घेऊन येण्याचा मनोदय आहे."

" हे गुह, पण आपलं मन स्पष्ट करून आपण, आपल्या मनाचा. आरसा किती.स्वच्छ आहे आणि किती सुंदर आहे, हेच सिद्ध केलंय. त्यामुळे मी आपला कृपाभिलाषी आहे. मी आपल्याला विनंती करायला आली आहे की, आमच्या सर्व सैन्य, आप्त, आप्तेष्ट, राजपरिवार, जन साधारण यांच्या गंगापार जाण्याची व्यवस्था करून, आम्हाला उपकृत करावे." 

इतकं बोलून, राम प्रिय अनुज राजकुमार भरत यांनी, गुह यांना प्रणाम केला. गुह या प्रणामाने संकोचून म्हणाले, 

" सदा जन हितेषी विचार करणारे श्रीराम, यांचे प्रिय बंधू,  राजकुमार भरत, आपण असे हात जोडून नमस्कार करणं योग्य नव्हे. आपली आज्ञा शिरसावंद्य आहे. पण त्याआधी आपण आम्हाला आपली थोडी सेवा करण्याची संधी व त्या सेवेचा आनंद प्राप्त करून द्यावा. तोपर्यंत मी सर्व व्यवस्था करून घेण्याची आज्ञा देतो." 

अर्थातच राजकुमार भरत यांनी, यास संमती दिली. गुहाने त्यांना आसनस्थ होण्यासाठी उत्तम व्यवस्था, जवळच्या एका अतिविशाल वटवृक्षाच्या बांधलेल्या गोलाकार चौथऱ्या वर  केली  आपल्या बंधूला तिथे थांबायला सांगून, गुह त्वरेने तिथून निघाला आणि आपल्या बांधवां मधे आला. इथे त्याचे बांधव, सैनिक त्याच्या प्रतीक्षेत होतेच. त्यांना येऊन त्याने सर्व सत्य घटना, राजकुमार भरत यांच्या येण्याचं प्रयोजन आणि त्यासाठी लागणारी सर्व व्यवस्था, याची पूर्ण माहिती सर्वांना दिली. 

ताबडतोब, अनेक मोठमोठ्या नावा, घेऊन येण्याची व्यवस्था करायला सांगून, गुह स्वतः गंगेचं पावित्र जल, क्षीर अर्थात दूध, थोडंसं उष्ण जल, आरतीच तबक व सर्व सामग्री, यांसह आपल्या कुटुंबास व बांधवांना घेऊन, भरत व आर्य सुमंत यांच्या समीप आला. 

राजकुमार भरत, सर्व माता, स्नुषा याना, विशाल वटवृक्ष व त्याभोवती असलेल्या मोठ्या चौथऱ्यावर घातलेल्या स्वच्छ सुंदर आसनांवर बसायची व्यवस्था  गुहाने केली होतीच. भरतासह सर्व राजपरिवार आसनस्थ झाला. गुहानें, भरत व शत्रुघ्न याचे, तर त्याच्या धर्मपत्नीने राज परिवारातील समस्त स्त्रीवर्ग यांचे चरण शुद्ध गंगाजल, क्षीर अर्थात दुग्ध व उष्ण जल आणि पुन्हा शुद्ध गंगाजल यांनी धुवून काढले. 

भरत व राजपरिवारासाठी वनातील उत्तमोत्तम, फुलांचा संचित केलेला मधुरस, सर्वोत्तम फळांच्या गरापासून तयार केलेले व स्वादिष्ट स्थानिक पदार्थ यांची तबकं समोर आणली. अर्थातच भरताने, या सेवेचा उचित मान राखत, यातील काही अंश ग्रहण करून,बाकीचे सोबत आलेल्या मंत्री व सुरक्षा सैनिकांना ग्रहण करण्यास दिले. या सर्व सेवेने गुहांच्या मनातील, आधी संदेह केल्याचे न्युन, पार निघून गेले आणि त्याने, पुढील व्यवस्था करण्याची अनुमती मागितली. भरताने, त्यावर शीघ्र व्यवस्था व्हावी असा आदेश दिला.

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा, ही नम्र विनंती. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
२०/०६/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...