Skip to main content

राम अनुज भरत भाग ६

राम अनुज भरत भाग ६

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.

भरत तडक निघून माता कौसल्येच्या महालाकडे दाखल झाला. सेविका राजकुमार भरत आल्याची सूचना देण्या साठी आत जायला निघते. परंतु मातेच्या महाली जायला काय अनुमती घ्यायची,अश्या विचाराने, भरत, सेविकेच्या मागे धावत मातेच्या कक्षात अंत:पुरात जातो. 

त्याला आपल्या पुढे धावत गेलेला पाहून, सेविका पुन्हा मागे वळून, आपल्या मूळ स्थानी येऊन उभी राहते. मातेच्या समोर जाऊन, भरत मातेचे चरणस्पर्श करण्या साठी वाकतो आणि माता कौसल्या दोन पावलं, मागे सरकते. ते पाहून, भरत, उठून आश्चर्याने मातेकडे पाहतो. तो काही बोलणार, इतक्यात, माता त्याच्याकडे दृष्टी न फिरवता वदते.

" झालं ना तुझ्या आणि तुझ्या मातेच्या मनासारखं. आता हे राजवैभव, हे राज्य,सुखेनैव तुम्हा दोघांनाही उपभोगता येईल. माझा राम आणि महाराज हे दोन्ही अडथळे, कैकयीने आपल्या मार्गातून, कुटनितीने, दूर केले. तू तर इथे नव्हतास, त्यामुळे तू या पापातून सहजी, नामानिराळा झालास." 

क्रोधाने माता कौसल्या अजूनही काही बोलणार होती. पण तिला अश्रू आणि राग यामुळे शब्द फुटत नव्हते. मातेच्या या विपरित रुपाकडे व बोलण्याकडे पाहून, भरत गोंधळून गेला. पण स्वतःला सावरत मातेला म्हणाला.

" माता, माझ्या प्राणाहून प्रिय, ज्येष्ठ भ्राता कमललोचन श्रीराम, यांच्या विषयी इतका घृणास्पद कट मी करू शकेन असा गैरसमज तुझा कसा काय झाला. हाय रे दैवा. ज्या जगत्पती श्रीराम याना जन्म देणारी, म्हणजेच विश्वात्मक तेज सामावून घेणारी तुझी कुस, आज अशी क्रोधाग्नीने तप्त आणि मध्यान्हीच्या सूर्याच्या प्रखरते समान कशी काय झाली माते. मी इतकी नीच पातळी गाठेन हा विचार तरी तुझ्या मनात कसा आला. 

अर्थात बरोबर आहे. ज्याची माता इतकी कुलक्षणी, कुलनाशिनी, नीच आहे, त्या पुत्राचे विचार असेच असतील, असा सहजी विचार, माते तुझ्या मनात आला असेल आणि प्राप्त परिस्थिती, पतीच्या निधनाचं दुःख आणि जनप्रिय पुत्राचा विरह, यांनी मोहवश तू हे सर्व वदते आहेस, हे मी जाणतो. योग्यही आहे ते. कारण ज्याच्या मातेने तुला पतीचा विरह, आणि पुत्र वनवासी या अकारण दारुण दुःस्थितीत लोटलं आहे, त्या मातेच्या दुधाने पोसलेला, तिचा पुत्र तसाच असणार, हा तुझा तर्क, अत्यंत संयुक्तिक आहे."  

माता कौसल्या अजूनही, भरताकडे पाठ करून, क्रोधाने संतप्त स्थितीत उभी आहे. भरत पुढे बोलतो.

" परंतु माते, तू हे कसं काय विसरलीस की, माता कैकयी ही दुसऱ्या घराण्यातील आहे आणि तिचे पूर्वाश्रमीचे संस्कार, श्रेष्ठ असू शकतात, ज्यायोगे तिला पुत्रमोह झाला आणि क्षणाचाही विचार न करता, तिने होत्याचं नव्हतं करून टाकलं. सारीपाटावरील एका मोहऱ्याने, सारा सारीपाट उधळून लावला. पण मी तर याचं राज घराण्यात जन्म घेतलेला आणि रघुकुलातील राजांची परंपरा, कुलरीत, वचनांना प्राणपणाने जपण्याची रीत, याची जाण जाणीव असलेला 

आणि अवघं ब्रम्हांड कवेत घेऊ शकणाऱ्या श्रीरामांनी लाड करून, प्रेम देऊन मोठा केलेला हा भरत, कौसल्या माते, असा वागू शकेल, हा विचार ज्या क्षणी, तुझ्या मनात आला, त्या क्षणी खरतर जगण्याचा हक्कही मी गमावून बसलो आहे. आज, आता मला जाणवत आहे की, येताना प्रत्येक जनसाधारण माझ्याकडे इतक्या घृणास्पद नजरेने आणि अविर्भावाने का पहात होता.

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा, ही नम्र विनंती. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
१४/०६/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...