Skip to main content

राम अनुज -भरत भाग ५

राम अनुज - भरत भाग ५

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.

नाईलाजाने, कैकयी भरताला सांगते. 

"माझ्या प्राणप्रिय पुत्रा, रामाच्या, वनवासात जाण्याच्या विरहाच्या धक्क्यातून, स्वतःला न सावरता, महाराज दशरथ यांनी, रामाच्या नावाचं स्मरण करत करत, प्राणत्याग केला." 

हे ऐकताच, भरत आपल्या मातेला, अत्यंत क्रोधाने तप्त होत, सवेगे दूर लोटतो आणि रागाने उठून उभा राहतो आणि त्वेषाने म्हणतो

" हे पापिणी, तू ही गोष्ट इतक्या सहजतेने कशी काय सांगू शकतेस. आपल्या पतीला, पुत्र विरहात लोटून, त्याला मृत्यू पंथी धाडून आणि माझ्या प्राणांचा प्राण असलेल्या, महानायक, अतिगंभीर, धीर पुरुष असलेल्या सर्वोत्तम चारित्र्याच्या श्रीराम, याना वनवासात पाठवून, तू अजूनही जीवंत कशी काय. तू कोण्या कारणे, हा विचार केलास की,रामभक्त, रामसेवक राम अनुज ही बिरुदावली पदकांसारखी भूषवणारा हा भरत, तुझ्या या नीच, पापी, कुलनाशक कट कारस्थानात तुझ्या बाजूने असेल आणि तू  माझ्या बंधुंवर जो अन्याय आणि आपल्याच प्राणप्रिय पतीचा जो घात केला आहेस,त्या पापाची माहिती झाल्या नंतर सुद्धा, हा भरत, क्षणमात्र तरी तुला माता म्हणून, कसा काय साद घालेल. 

इतक्या कुल घातक कृत्याचा विचार तरी तुझ्या या बुद्धीत, मनात आलाच कसा आणि तसा विचार येऊन, तो तू अंमलात देखील आणलास तरी कसा. एक क्षण सुद्धा, याच्या परिणामांची तू पर्वा केली नाहीस. नव्हे तू तर विचारही केला नसशील की, आपण इतकं सर्व करून सुद्धा भरत, हे विषप्राय मरण यातना देणारं दुःख उराशी बाळगून सुद्धा, या मनाला विदीर्ण करणाऱ्या राज्याचा भार स्वीकारून, अभिषिक्त होण्यास्तव होकार भरेल. 

त्यापेक्षा हे कलंकिनी, तू माझा जन्मतः जरी गळा घोटला असतास, तरी ते महापाप, या कुलविघातक पापापेक्षा अक्षम्य झालं असतं. महाराज दशरथ, काळाच्या ओघात ते दुःख सहजी पचवू शकले असते. पण हा विचार तुझ्या दगडाच्या, नव्हे वज्राहून कठोर असलेल्या मनात आलाच नाही, की भ्राता राम, या आपल्या प्राणप्रिय पुत्राच्या विरहाग्नीत, तात क्षणमात्र जीवित राहू शकणार नाहीत. की, हे जाणून सुद्धा तू हे अधमी कृत्य केलंस. निदान आपल्या कुलशील, कैकेय राज्याची वैभव शाली राज परंपरा, राजा रघु यांच्यासह मागील बेचाळीस पिढ्यांनी, प्राणाने जपलेला, रघुवंशाचा हा युगा युगातील ठेवा, क्षणात चूर्ण करण्याच्या इराद्यानेच तू हे नरकवास घडवणारं कुकृत्य केलंस. 

महापापिणी, कुलविनाशिनी, दुष्ट, नीच, आजन्म तुला माता या नावाने मी कधीही साद घालणार नाही. यापुढे जगतात कधीही कुमाता म्हणून उल्लेख करण्याचा विषय आला की, फक्त तुझच नाव युगानुयुगे घेतलं जाईल. मृत्यु पश्चात तुला रौरव नरक सुद्धा नशिबी येणार नाही. 

जगताचे पालनकर्ता, मनोहर दृष्टीचे, अविजेय श्रीराम, लक्ष्मी स्वरूप देवी सीता आणि या सर्वात काहीही अपराध नसताना ओढला गेलेला, माझा भ्राता लक्ष्मण, याना वनवासातून पुन्हा आणून, श्रीरामांना राज्याभिषेक घडवून आणणार नाही, तोपर्यंत हा भरत स्वस्थ.श्वास घेणार नाही. यदाकदाचित, रघुकुल शिरोमणी, पितृ वचनाचे भोक्ते व आज्ञा पालनकर्ते श्रीराम यांनी, जर वनातून येण्यास नकार दिला, तर हा भरत सुद्धा, त्यांच्या समवेत वनात राहील." 

मातेला धिक्कारत, तिची निर्भत्सना करत, तिची हेटाळणी करत, तिला सर्व प्रकारचे क्रोधयुक्त बोल बोलून, भरत तडक निघून माता कौसल्येच्या महालाकडे निघाला. कैकयी त्याला अडवण्याचा आटोकाट प्रयत्न करते. पण तिचा हात झटकून, भरत क्रोधाने, दुःखाने, अगतिकतेने व रुदनाने लाल झालेल्या आपल्या नजरेने क्रोधग्नीचा एक जळजळीत कटाक्ष, तिच्याकडे टाकून, अत्यंत वेगाने कौसल्या मातेला साद घालतच, तिच्या महालाकडे धाव घेतो. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कैकयी हताशपणे पहात, डोळ्यातील अश्रुना वाट मोकळी करून देते. 

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा, ही नम्र विनंती. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
१३/०६/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...