अध्यात्म विराम २०२
एखादी सेवा प्राप्त करून घ्यायची असेल तर त्या सेवेचे मूल्य चुकते केले की ती सेवा आपल्याला प्राप्त होते. म्हणजेच कोणत्याही सेवेचा लाभ घेण्यासाठी, त्याचे आवश्यक मूल्य प्रदान करणे क्रमप्राप्त आहे. दुसरी अट त्यासाठी ही आहे की, ती सेवा जिथे उपलब्ध आहे तिथे आपल्याला जावे लागते. या जगतात आल्यानंतर, या जगतातील प्रत्येक गोष्टीचा उपयोग करून आपण अनेक गोष्टी गेल्या करोडो वर्षात निर्माण केल्या. ज्याचा लाभ अब्जावधी देहांनी घेतला.
हे सर्व सेवन करून आपण या देहाचा उदरनिर्वाह करतो. उदर म्हणजे पोट. म्हणजे आपण पोटाच्या माध्यमातून, या देहाचा निर्वाह करतो.अर्थातच यामधे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे या देहाचं सर्व सूत्रसंचालन उदर अर्थात पोट या माध्यमाने करण्याची सोय,देह निर्माण करताना, ईश्वराने निर्माण केली. मुळात एक लक्षात घ्या की, प्रजोत्पादन करण्याचं मुख्य कार्य, सूत्र व व्यवस्था ही ईश्वर निर्मित असल्यामुळे, या मानवी देहातून, जी जी निर्मिती होते, ती ईश्वरीय देणगीतून घडते.
कारण कार्य देह करत असला तरीही, त्यामागे ऊर्जा शक्ति व चैतन्य हे, संपूर्णपणे ईश्वर निर्मित आहे. याचं सर्वात मोठ उदाहरण म्हणजे तेच चैतन्य देह सोडून गेल्यावर, त्याचं देहाने शून्य कर्मझ कार्य होत आणि मी मी म्हणणारे देह शून्यवत होतात. निर्मात्याने निर्मिती करताना कोणतीही न्यूनता ठेवलेली नाही. किंवा प्रारंभी ठेवलेली नसणार, हे नक्कीच.
कारण सर्वच आत्म्यात तोच आहे आणि सर्वच देहांच्या निर्मिती मागे, त्याचीच चैतन्यशक्ती प्रेरणास्रोत आहे. पण मग ही अनेकानेक देहात असलेली कमी अधिक न्यूनता किंवा एखाद्याला देहात भरभरून बुद्धी, ऊर्जा, शक्ती व चैतन्य यांचा उत्तम लाभ प्राप्त होतो. तर एखाद्याला त्यात न्यूनता प्राप्त होते, याचं कारण काय असू शकेल, यावर विचार करताना लक्षात येईल की,
सुरुवातील किंवा विश्वाच्या प्रारंभी जीव या जगतात पाठवताना, ईश्वर समान ऊर्जा, शक्ती, बल व चैतन्य देऊन पाठवतो. पण सर्व गती, मती, वृत्ती आणि निवृत्ती ही कर्मा धिष्ठीत करण्याचं कार्य ईश्वराने केलेल असल्या मुळे, ही कमी अधिक वाटणी किंवा प्राप्ती, त्या कर्माच्या आधारावर माणसाने स्वकर्माने घडवली किंवा प्राप्त केली. याचाच अर्थ मुळात सर्वत्र सर्व काही सम प्रमाणात देऊनच पहिल्या जन्मात,ईश्वराने जीव पाठवला.माणसाने मात्र माया, वासना, काम क्रोध, लोभ, मोह, मत्सर, द्वेष इत्यादी नकारात्मक वृत्ती धारण करून, आपल्या कर्माने पुढील जन्मात ही न्यूनता निर्माण केली.
हे सर्व आपल्याच कर्माने आपण घडवलेले असूनही, काही कमीजास्त प्राप्त झाले किंवा काही न्यूनता आली की,आपण त्याचं ईश्वराला मधे आणून, दोष देतो वा आपल्या दुःखाचं कारण मानतो किंवा निदान उत्तर मागतो. वास्तविक ही कर्माची न्यूनता कर्मानेच सोडवता येते किंवा येऊ शकते. हे उत्तरही त्यानेच देऊन ठेवलं आहे. असं उत्तम कर्म हे काय असावं, ज्यामुळे आपली, आपणच निर्माण केलेली ही कर्माची न्यूनता, आपणच कमी करून आत्म्याला त्या शुद्धतेपर्यंत नेऊ शकतो, जिथे काहीही न्यूनता, उणेअधिक उरणार नाही आणि आपल्या मूळ शुद्धतेकडे आत्मा पुन्हा जाईल.
ही कर्माने प्राप्त होणारी शुद्धता, ज्ञान, कर्म व भक्ती या तीनही मार्गांनी प्राप्त होते वा होऊ शकते. कर्मात, आपण आधी उत्तम कर्माकडे स्वतःला नेऊन, आपल्या कर्माने चित्तशुद्धी आणि आत्मशुध्दी प्राप्त करू शकतो..ज्ञानाने उत्तम काय, स्व त्यागून आत्मतेज प्राप्तीचा खरा मार्ग कोणता हे जाणून, त्यावर वाटचाल करण्याची प्रवृत्ती तयार होऊ शकते.
याबद्दल अधिक पुढील भागात जाणून घेऊया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
हे कॉपी राईट नोंदणीकृत लेखन आहे. त्यामुळे हे नावासकट प्रसारित करावे.
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२४/०६/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment