अध्यात्म विराम १९१
ईश्वराला, कलियुगात घडत जाणाऱ्या घटना, दिसल्या असणार. त्या अनुषंगाने ईश्वर भक्तीत होत जाणारी घट आणि भक्तीपेक्षा, देवाची, ईश्वराची हेटाळणी करण्याने संतुष्ट होणारी वाढती प्रजा, या गोष्टी नक्कीच त्रिकाल ज्ञान यामुळे, माहीत असणार,नव्हे दिसलं सुद्धा असणार. त्यामुळे ते घडतं असताना सुद्धा, भक्तांच्या मनोधैर्याची पातळी कमी न होता, निदान आहे ती राखली जाईल, त्यासाठी भक्तांनी काय केलं पाहिजे, याची रूपरेषा, ईश्वराने गीतेतील त्या श्लोकात स्पष्टपणे सांगितली आहे. लक्षात घ्या, ईश्वर जो निर्गुण, निराकार परब्रम्ह आहे, त्याला आपल्या स्तुतीने आणि टीकेने काही फरक पडत नाही किंवा पडणार नाही.
पण भुलोकी आलेला प्रत्येक जीव आपली अध्यात्मिक व पारमार्थिक उन्नती करवून घेण्यास पात्र आहे, या एका सद् इच्छेने ईश्वराने, खास कलियुगासाठी भक्ती आणि साधना यांच्या सुलभते साठी, अत्यंत सोपा राजमार्ग, सामान्य जनांसाठी आखून दिलेला आहे. राजमार्ग म्हटल की त्यावर कोणीही चालू शकतो व ईश्वराने सांगितलेल्या धोरणानुसार पावलं टाकली की, ईश्वराकडे आत्मरुप पोचण्याचा शुद्धिमार्ग नक्कीच आपल्याला हाती लागेल. शुद्धीमार्ग यासाठी म्हटलं की, ईश्वर हा अत्यंत, शुद्ध व सात्विक स्वरूप आहे.
त्यामुळे त्याच्याकडे पोचण्यासाठी या जगतात जन्मो जन्मी मलिन झालेला आत्मा, शुद्ध करून मगच तिथपर्यंत जातं येते. पण त्यासाठी अनेक शुद्धिक्रिया करणं गरजेचं आहे. त्यासाठीच ज्ञान, वैराग्य, विवेक, कर्मशुद्धी, योगक्रिया यज्ञयाग, अष्टांग मार्ग, नवविधा भक्तिमार्ग, असे अनेक उपाय ईश्वराने स्वतः योजून दिलेले आहेत. पण या सर्वात सामान्य माणसाचा पार लागणं, जन्मोजन्मी त्यावर चालता येणं आणि ते चालणं एक समान राखणं अत्यंत दुर्लभ आहे.
कारण प्रत्येक जन्मानंतर पुढचा जन्म त्या पुढील पायरीचा मिळेल याची शाश्वती नाही. कारण शेवटी संचित आणि अन्ते मती सा गती या नुसार कोणता जन्म आपण लिहून ठेवलेला आहे, हे देखील अशाश्वत आहे. म्हणून अश्या स्थितीत प्रवाह पतीत झालेल्या सामान्य ते अती सामान्य जीवांनी काय करायचं, हा प्रश्न या श्लोकात ईश्वराने सोडवून दिलेला आहे. जो कोणी, म्हणजे यामधे, तो भक्तच असावा, त्याचं पूर्वकर्म पुण्यवान असावं, त्याने ज्ञान,भक्ती व कर्मशुद्धी साधलेली असावी,असा कोणताही नियम व अट यामधे प्रभूंनी घातलेली नाही किंवा त्यांना अपेक्षित आहे. तर असा जो कोणी, अनन्य भावाने, अनन्यतेने माझे नित्य, निरंतर चिंतन करून, माझी उपासना करेल.
इथे नित्य का आवश्यक कारण प्रसंगोपात भक्ती किंवा ईश्वर चिंतन होऊ शकत नाही, तर तो एक निव्वळ व्यवहार वा सौदा होऊ शकतो. म्हणजे नित्य असणं आवश्यक आहे. निरपेक्ष असाव का, तर हो कारण निरपेक्ष असल्या शिवाय अनन्य होताच येणार नाही. आपण एखाद्याला आपलं मानतो पण काही योग्य आणि तार्किक कारणांमुळे तो आपल्या उपयोगात आला नाही. त्यानंतर आपण मनात म्हणालो की, तुला मी आपला मानला आणि तू मला उपयोगात आला नाहीस, मग तुझा काय फायदा.
ही अनन्यता नाही. अनन्य असणं म्हणजे, अजून एक भाव यात अपेक्षित आहे, तुझ्या व्यतिरिक्त अन्य कोणीही माझं नाही. किंवा मी दुसऱ्या कोणालाही भजत, पूजत व अर्चत नाही. म्हणजे तू एकमेव आहेस, ज्याला मी आपला मानतो आणि फक्त तुझच नित्य चिंतन करतो. बरं हे चिंतन कसं असावं, तर क्षणोक्षणी त्याची आठवण, स्मरण असाव. किंबहुना स्मरण हे विस्मरण झाल किंवा होऊ शकेल म्हणून केलं जातं. ईश्वर स्मरण हे त्याही पलीकडे असावं.
यातील अजून काही मुद्दे आपण पुढील भागात पाहूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२६/०५/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment