अध्यात्म विराम १९७
ईश्वराची आज्ञावली आत्म्याला देऊन, त्याला या जगतात धाडताना, ईश्वर हे नक्कीच जाणत असतो की, ही आज्ञावली, अशुद्ध आणि विकाराने ग्रस्त होऊ शकते. म्हणूनच त्याने अनेक प्रकारची साधनं निर्माण करून, ही अशुद्धता कमी करून, शुद्धता वाढवण्याचा प्रयत्न प्रत्येक देहाने करावा,अशी योजना निर्माण करून दिली. त्या साठी श्रवण कीर्तन आदी भक्तीची अंग, उप अंग निर्माण केली.
पण प्रत्येक युगात जसजशी, माया, असुरादिक शक्तींची स्वरूपं, त्यांची अस्त्र शस्त्र, काळाचे बदलते रूप, त्यामुळे उद्भवणारी भौतिक व पारमार्थिक संकटं, आपदा, विपदा, कर्मावर येऊ शकणारी बंधनं हे सर्व जाणून, ईश्वराने कर्म कांड रहित शुद्धता वाढवणारा आणि कर्माची शून्यता हळू हळू वाढवत नेणारा सर्वोत्तम उपाय आखून दिला. आता हा उपाय कोणता, जो माणसाला मायादिक भौतिक जगताची आज्ञावली, विसरायला लावून,पारमार्थिक मार्गा वरील ईश्वरी आज्ञावली अर्थात programme कडे घेऊन जातो, यावर आता विचार करूया.
ईश्वराने आखून दिलेल्या अज्ञात मार्गाकडे जाण्यासाठी, त्या ईश्वराच्या स्मरणाचा मार्ग हा सर्वोत्तम मार्ग, आहे. त्याचं कोणत्याही स्वरूपातील, रुपातील नाम यांचं, स्मरण करून, आपण त्याला आपल्या समीप येण्यासाठी साद घालू शकतो. शास्त्र, वेद व पुराणं यांनी सांगितल्या प्रमाणे आणि संत, महंत, ऋषीमुनी यांनी दिलेल्या साक्षी प्रमाणे, ईश्वर हा हृदयात स्थित, आत्म्याच्या गाभाऱ्यात विराजमान असलेल्या ईश्वर रूप परम आत्म्याला, त्याच सक्षित्वाने स्मरण करताच, तो आपल्या अस्तित्वाची साक्ष देतो.
नुसतीच साक्ष देत नाही तर आपल्या अस्तित्वाची प्रचिती देतो. पण यासाठी त्याला पाहण्याची अलौकिक दृष्टी आणि त्यासाठीची अपार श्रद्धा मात्र, मनात स्थिरपणे स्थापित असणं, गरजेचं आहे. श्रद्धा मनातील इच्छांना बांधून, त्यांना एकाच लक्षामागे स्थिर उभ करण्याची शक्ती देते आणि असलेली वाढवते. शक्ती वाढली की मनातील ऊर्जा त्या कार्याच्या मागे पूर्ण एकाग्र होऊन, कार्याला सहाय्य भूत होते. ही इच्छेची शक्ती आणि ऊर्जा प्रत्येक शुभ आणि अशुभ, सकारात्मक व नकारात्मक कार्यात लक्षापर्यंत जाण्यासाठी परिपूर्ण सहाय्य व सहकार्य करते.
म्हणजेच एक स्मरण, इच्छेला जागृत करून, मनाला एकाग्र करून, शक्ती व ऊर्जा यांचा पूर्ण प्रवाह एकाच दिशेने जाईल आणि राहील, हे पहातं. आपल्या मनाला ज्याची जास्त गरज भासते किंवा मनाची ज्या गोष्टीकडे, उद्देशाकडे ओढ जास्त असते, त्याचं स्मरण हे मनाला सतत होत असतं. म्हणजेच मनाचा नैसर्गिक ओढा हा वासना, मोह, माया यामुळे चुकीच्या गोष्टीकडे, त्या आकर्षणामुळे जास्त असतो.
देह, बुद्धी व मन यांमुळे, अनेकदा हा ओढा निसर्गतः चुकीच्या गोष्टीकडे अनिर्बंध असतो.अनेकदा हा ओढा, मूळ आत्म्याच्या इच्छेविरुद्ध सुद्धा मनाला, बुद्धीला व देहाला वाहून नेतो आणि अनेक अहितकारक, चुकीच्या स्मरणात, विघातक कर्म करायला भाग पाडतो. म्हणजेच स्मरण हे देहासाठी, बुद्धिसाठी, मनासाठी व आत्म्यासाठी अहेतुक व सहेतुक असतं.
आता हे अहेतुक व सहेतुक स्मरण म्हणजे काय आणि कर्म शून्यता यावर पुढच्या भागात चिंतन करूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०७/०६/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment