अध्यात्म विराम २००
आज या मालिकेचे २०० भाग झाले, त्याबद्दल मी सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज, यांचा व वाचकांचा सदैव ऋणी राहीन.
तारुण्याच्या, उत्साहाच्या, अविवेकाच्या रेट्यात, माणूस कित्येकदा, अगदी देवाचं अस्तित्व सुद्धा नाकारतो. म्हणजे मी जन्माला आलो त्यात माझं स्वतःचं काय कर्तृत्व आहे, त्या अनुषंगाने विचार करावा. अर्थात इतकी जाण असलेला मनुष्य असल्या गोष्टी करणार नाही, हे नक्कीच. पण आपण आपल्याला प्राप्त, बुद्धीची कुवत आणि मनाचं स्वातंत्र्य या जोरावर किती उड्या माराव्यात, याला काही मर्यादा असतात. आपल्याच कर्माच्या दोषाने, ज्यावेळी या मर्यादा पार करून, आपणच संकटं उभी करतो, तेंव्हा सुद्धा आपण त्या अस्तित्वात नसलेल्या देवाला नावं ठेवतो, तेंव्हा हे विसरतो की एकेकाळी, याचं तथाकथित देवाचं अस्तित्व आपणच नाकारलं होतं.
असो. आपल्याला, आपल्याही नकळत, सावरण्याचा, थांबवण्याचा व अडवण्याचा प्रयत्न, सद्गुरू व ईश्वर अनेक वेळा गूढ व गहन संकेत देऊन, कित्येकदा करत असतात. आपल्याला ते लक्षात येत नाही किंवा लक्षात येऊन आपण ते नाकारतो. आता सांकेतिक किंवा गूढ संदेश का दिले जातात, याबद्दल जरा विचार करूया. मुळात ईश्वराचा मानवाशी संपर्क साधण्याचा एकमेव मार्ग, आत्मा, सुप्तमन ते जागृत मन असा आहे. कारण ते संकेत हे लहरी स्वरूपात असतात.
त्या लहरींना प्राप्त करून, त्यांचं पृथक्करण करण्याची सोय अर्थात facility ईश्वराने मनात अनेकानेक केंद्रात निर्माण करून ठेवली आहे. त्या विविध केंद्रांना जन्मतः किंवा आत्म्याच्या शुद्ध अवस्थेत पूर्ण जागृती असते. पण अनेक जन्मात माणूस त्या शुद्धतेवर अनेक अशुद्ध, चुकीच्या कर्मांचा लेप अर्थात मुलामा देत जातो आणि ही गूढ, गहन सांकेतिक भाषा जाणण्याचं वओळखण्याचं, मूळ स्थितीत प्राप्त असलेलं तंत्र, हळूहळू धूसर आणि अप्रकाशित होत जातं.
अर्थातच त्यामुळे, हे संकेत व त्यांची परिभाषा आपण जाणू शकत नाही. पण ज्यांनी ज्यांनी ही आत्म्याची शुद्धता टिकवली आहे किंवा अनेक मार्गांपैकी एक असलेल्या आत्म शुद्धीच्या प्रक्रियेचा सदुपयोग करून, पुन्हा ती शुद्धता प्राप्त केली आहे, त्यांना हे गूढ संकेत वाचण्याचं, जाणण्याचं तंत्र ज्ञात असतं. अश्या तज्ञांना आपण कधीकधी मनातील, शंका, स्वप्नात दिसलेल्या आणि आपल्याला गूढ वाटणाऱ्या गोष्टी इत्यादींचे अर्थ विचारू शकतो किंवा विचारतो.
अर्थात हे गूढ गहन जाणण्याची आवश्यकता आपल्याला त्यावेळी भासणार नाही, ज्यावेळी माणूस सर्व कर्म ही शुद्ध भावाने, हेतूने प्रेरित होऊन करेल आणि कोणताही संदेह, शंका मनात न बाळगता, त्यांचे परिणाम वा कर्मफलं स्वीकारत पुढे जाईल. तर चित्ताची तीच शुद्धता पुन्हा प्राप्त करू शकेल. अर्थात त्यासाठी शुद्ध हेतूने कर्म, शुद्ध अशी आत्मिक ज्ञानाची प्राप्ती, भगवत भक्तीचा साधासोपा मार्ग अवलंबू शकतो. यातील कोणतीही गोष्ट जाणूनबुजून व अनावधानाने जरी घडली तरीही परिणाम तोच असतो.
पण यात अत्यंत सोपा मार्ग, म्हणजे प्रत्येक कर्म, प्रत्येक ज्ञान व भक्तीसाठी केलेली प्रत्येक गोष्ट ही त्या ईश्वराच्या स्मरणात, नामात राहून केली तर, त्या स्मरणाच्या लहरी, त्या ईश्वरीय शक्ती पर्यंत सहजी पोचून, चित्तशुद्धी व आत्मशुद्धी साधण्यास मदत होते. म्हणूनच स्मरण हे अत्यंत आवश्यक भक्ती कर्म आहे. किंबहुना मनात केलेलं स्मरण हे कोणत्याही भक्तीमार्गापेक्षा, श्रेष्ठ आहे.
याच मुद्द्याला पुढच्या भागात अधिक विस्ताराने जाणून घेऊया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
हे कॉपी राईट नोंदणीकृत लेखन आहे. त्यामुळे हे नावासकट प्रसारित करावे.
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१५/०६/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment