अध्यात्म विराम १९२
अनन्यता ही अनेक प्रकारची असते म्हणून आधी तिचा विचार करूया की, यातील भगवंतांना कोणती अपेक्षित आहे. फक्त भौतिक जगताचा आणि त्यातही फक्त देहा चाच विचार करणे, ही प्राणिमात्रांची मूळ प्रवृत्ती आहे. कारण त्यांना बुद्धीचा तितकाच व्यास ईश्वराने प्रदान केला आहे. माझं भक्ष, भोजन,मैथुन या इतक्या चौकडीत आयुष्य जगण्याची एक प्रकारची शिक्षा, त्या देहातील आत्म तत्वाला मिळालेली आहे. एक प्रकारे, भोगांचा उपभोग घेण्यासाठीच हा चौऱ्यांशी लक्ष योनीचा आत्म प्रवास ईश्वराने योजला आहे.
पण माणसाला यापेक्षा जास्त, बरच काही दिलेलं आहे. ज्याचा मुक्त उपयोग करण्याचं स्वातंत्र्य देखील, त्याच विधात्याने प्रदान केलेलं आहे. म्हणजे तू तुला दिलेल्या मन, बुद्धी, देहाची सुसूत्रता, सुविधा यांचा सद् उपयोग कर किंवा दुरुपयोग कर, त्याचं भोग व उपभोग रूप फल तुलाच भोगायच आहे. पण या चक्रात अडकताना माणूस अनेक प्रकारच्या अनन्यतेच्या बेड्या, आपल्या पायात, हातात व विशेषतः मनात घालून घेतो. त्याच अनुषंगाने आयुष्य जगतो आणि त्याची कृतार्थता व धन्यता मनात जपून, अंती समाधान पूर्वक पुढील प्रवासाला जातो.
जगताना बाळगलेल्या, निर्माण केलेल्या या अनन्यता कोणत्या त्याचा जरा विचार करूया. देह हाच श्रेष्ठ आणि त्या व्यतिरिक्त अन्य, जे जे दिसत नाही, किंवा दाखवता, शोधता व सिद्ध करता येत नाही, ते सर्व अस्तित्वहीन किंवा मिथ्या अशी एक वृत्ती, यातून निर्माण होते आणि तीच आयुष्यभर बाळगली, वागवली जाते. कधीतरी यातून बाहेर पडण्याच्या घटना किंवा संकेत विधी देते. कारण ईश्वराला हे अभिप्रेत आहे की, प्रत्येकाला त्या वैश्विक सत्याची जाणीव जागृत व्हावी. म्हणूनच तश्या काही सांकेतिक घटना, प्रत्येक आयुष्यात घडतात.
त्या आपणच विधीच्या हाती लिहून दिलेल्या असतात. म्हणजे एकप्रकारे आपल्या कर्मांनी आपणच विधात्याच्या हाती ती दोरी देऊन ठेवलेली असते. त्यावर आपणच म्हणतो की आम्ही विधात्याच्यां हातातील कठपुतळ्या आहोत. अगदी, पुढील अनेक जन्माच्या,जन्म मृत्यू यांच्या वेळा सुद्धा आपणच, मागील अनेक जन्मात आखून ठेवून, पुढे पुढे जातो. पण, देहाच्या पलीकडे आयुष्य, जग व ब्रम्ह आणि ब्रम्हांड माहीत नसलेले जीव, फक्त देह व देहाच्या बाबतीत असलेल्या अनन्यता जपत आयुष्य काढतात आणि निघून जातात.
या एका देहाच्या बाबतीत बाळगलेल्या अनन्यता, बुद्धी, मन, वाचा, श्रुती इंद्रिय, अवयव या सर्वांना त्याचप्रकारे व त्याचसाठी कामाला लावते. म्हणजे कदाचित यात अश्रद्ध व सश्रद्ध असे सगळेच जीव येतात, जे या देहाच्या दृष्टी पलीकडे पाहू शकत नाहीत. म्हणजे देहाच्या बाबत जे होईल, त्याच्या जाणीवा, अती जागृत असतात, त्यामुळे विकारातून जाताना, त्यांच्या मोह, लोभ, क्रोध, काम, इत्यादी शत्रूंना सहजी बळी पडतात. किंवा त्यातच जगणं आहे, हा भाव त्यांच्या ठायी दृढ असतो. त्यामुळे ईश्वर आराधन, साधन हे सर्व आपल्या देहातील, भोगांच्या, दुःखाच्या जाणीवा जागृत झाल्या की व फक्त त्या जागृत असताना दृढ असतात.
त्यामुळे ज्या ज्या वेळी भोग येतात, त्या त्या वेळी यातील सश्रद्ध जीव, ईश्वराच्या मार्गाकडे, फक्त त्या संकट, भोग व दुःख यांचं निराकरण या एकाच उद्देशाने पाहतात. म्हणजेच माझ्या अडचणीत ईश्वर असावा, पण इतर वेळी माझं त्याच्या वाचून अडणार नाही वा अडता कामा नये, अशी धारणा यांच्या मनात असते.
आता पुढच्या भागात अश्रद्ध जनांची वृत्ती आणि त्याबद्दल जाणून, या विषयात अजून पुढे जाऊ
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
३०/०५/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment