राम अनुज भरत भाग १८
श्रीराम जयराम जय जयराम!!
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.
तेजोवलयांकित महर्षी एकाग्र चित्ताने भरताचा शब्द अन् शब्द कर्ण आकृष्ट करून ऐकत होते आणि भरत पुढे बोलत होता.
" हे ब्रह्मस्वरूप महात्मन, ज्येष्ठ भ्राता, प्रेमस्वरूप, कारुण्य सागर, श्री कौसल्या नंदन, कैकयीच्या कार स्थानात, पिताश्री महाराज दशरथ, यांच्या आज्ञा प्राप्तीने, वनात प्रस्थान करते झाले आहेत. राणी कैकयी हिने हे कारस्थान, कोणत्या मिषाने केले, ते मला ज्ञात नाही. परंतु मी त्या कटाची निर्भत्सना करतो आणि घडलेल्या गोष्टीचा पश्चात्ताप व परिमार्जन करू इच्छितो. त्यासाठी ज्येष्ठ भ्राता, देवी सीता आणि लक्ष्मण यांची क्षमायाचना करून, प्रसंगी त्यांची मनधरणी व चरण याचना करून, त्यांना माघारी घेऊन जाईन.
त्याच कारणाने आपल्या इथे मी आलो आहे. आपल्या इथे येऊन भ्राताश्री जगतपालक श्रीराम पुढे गमन करते झाले आहेत.आपण त्यांचा पुढील स्थानाचा मार्ग जाणता. म्हणून,आपल्या मार्गदर्शनात आम्ही, त्यांना शोधून, त्यांना अयोध्येचा राज्यकारभार सोपवून, निश्चिंत होऊ इच्छितो."
भरताच कथन पूर्ण झाल्यावर महर्षी शांतपणे म्हणाले,
" हे दशरथ नंदन, राम प्रेमी, भरत, श्रीराम, राजकुमारी मैथिली आणि सुमित्रा नंदन लक्ष्मण यांनी येथे येऊन, घडलेल्या सर्व घटनांचा वृत्तान्त कथन केला आहे. आपण निश्चिंत असा. मी योग्य तो मार्ग आणि मार्गदर्शन जरूर करीन.परंतु आपण, त्यांच्या वनात जाण्याने व्यथित होणे उचित नाही. कारण त्यांच्या वनात जाण्याने, अनेक ऋषी मुनी, साधू जन याना संतोष प्राप्त झाला आहे. आपण आपला भ्रातृ धर्म पालनार्थ अवश्य त्यांना भेटण्यास जावे. मी आपल्याला मार्गदर्शन करीन. परंतु आज आपण इथेच, या आश्रम परिसरात विश्राम करून, उद्या पुढे प्रस्थान ठेवावे, असा माझा आग्रह आहे. "
महर्षींनी केलेली आग्रहाची विनंती ऐकून, आपल्या परिवाराची, संपूर्ण सैन्याची, प्रजाजनांची, मंत्रीगण यांची या आश्रमात कशी काय सोय सुविधा होऊ शकेल?, त्यामुळे आश्रमवासी याना असुविधा तर होणार नाही ना? असा प्रश्नार्थक चेहरा, भरताने केलेला पाहून, महर्षी स्मित वदन म्हणाले
" हे दशरथ पुत्र भरत, त्या समस्येचं चिंतन आपण करूच नये. सर्वसाक्षी श्री महाविष्णू, त्याची चिंता वाहील. आपण मात्र माझ्या विनंतीला मान देऊन, येथे राहणे अगत्याचे करावे. आपण माझं अतिथ्य स्वीकार करत असताना, आपल सैन्य आणि सोबत असलेले सामान्य प्रजाजन कश्याप्रकारे आपली रात्र घालवतील,याची आपण व्यर्थ चिंता करू नये.
आपण अयोध्या नरेश महाराज श्री दशरथ यांचे सुपुत्र आणि भावी अयोध्या पती रामचंद्र यांचे अनुज आहात. आपण प्रजा पालक आहात. त्यामुळे आपण माझ्या शक्तीची चिंता करू नये. ईश्वर माझ्याकडून सर्व काही करवून घेईल. आपण सर्वांना आश्रम परिसरात, या वनात थांबण्यास, आमच्या वतीने, आग्रह करा."
तेजाचा महासागर असलेले आणि तरीही विनम्रतेची मूर्ती असलेले, शुद्ध सात्विक स्वरूपातील, महर्षी भारद्वाज यांची ही अगत्याची विनवणी वजा आज्ञा, टाळण्याचं धैर्य, कुलशीलवान अयोध्या सुपुत्र भरत याच्याकडे नव्हतं. अर्थातच त्याने, आर्य सुमंत याना आज्ञा केली की,
सर्व सैन्य, सोबत आलेले सर्व जनसाधारण,नगरवासी, अश्व,गज,वृषभ यांना, आज रात्रीसाठी, येथेच निवास करण्यास सूचित करावे. इतर मंत्री गण याना आज्ञा केली की आपापले परिवार योग्य त्या स्थानी, पूर्ण सोयीनुसार उतरवून यावे. परंतु परिसरातील वन्यजीव, वनवासी, सन्यासी, साधू, मूलनिवासी याना कोणताही त्रास किंवा ताण होणार नाही, याची सर्वांना दक्षता घ्यायला सांगा.
शत्रुघ्नला सूचित केले की, तीनही माता व राज परिवार, कुलगुरू रघुकुल पुरोहित महर्षी वसिष्ठ या सर्वांना घेऊन, महर्षींच्या दर्शनार्थ येथे यावे. शत्रुघ्न, भरताच्या सूचने नुसार, सर्व माता व स्नुषा यांना सोबत घेऊन, महर्षी आणि भरत ज्यास्थानी चिंतन करत होते, त्यास्थानी आला. सर्व मातांना येताना पाहून,
भरत विनम्रतेने उभा राहिला. महर्षी भारद्वाज यांनी उष्णोदक,क्षीर यांनी पाद्यपूजा केली. चंदन गंध, सर्वांगी लावून त्यांचं विधिवत पूजन, अर्चन व अभिष्टचिंतन केलं. दोन्ही महर्षींनी एकमेकांना कर जोडून विनम्रतेने प्रणाम केला.
अलौकिक ज्ञान, वेदशास्त्र संपन्नता, विद्वत्ता, तप साधना, वैराग्य यांचा अद्भुत संगम असलेले आणि तरीही विनम्रतेने सजलेले दोन्ही ऋषिवर, तेजाचे दोन सूर्य समोरासमोर उभे आहेत, असाच भास, पाहणाऱ्यास होतं होता. जणू. बृहस्पतिची दोन रूपे, दोन भिन्न देहात वसलेली, परंतु अंतरी एकाच तत्वात बांधलेली, दृष्टिमान होत होती.
श्रीराम जयराम जय जयराम!!
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!
ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा, ही नम्र विनंती.
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
२६/०६/२०२३
9049353809
9960762179
Comments
Post a Comment