राम अनुज - भरत भाग ३
श्रीराम जयराम जय जयराम!!
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.
मामाचा आज्ञा संदेश प्राप्त होताच, भरत आपल्या कक्षातून, शिघ्रतेने, राजप्रासादाच्या अतिथी अभ्यागत कक्षात उपस्थित झाला. दुताला पाहून, स्मित वदन करून,भरत दूताला म्हणतो
"तुझा प्रवास सुखावह झाला ना. अयोध्येतील सारे क्षेम कुशल आहे ना. पिताश्री अयोध्या नरेश महाराज श्री दशरथ सकुशल आहेत ना. परमप्रतापी, त्रिलोक विजयी ज्येष्ठ भ्राता श्रीरघुनाथ यथास्थित आहेत ना. तीनही माता सुखानंदी स्थिर आहेत ना."
दूताने राजकुमार महापराक्रमी भरत याला प्रणाम करून उत्तर दिलं की
" हे महाबली राजकुमार श्री भरत आपण ज्यांची विचारणा केली ते सर्व ठिकच आहेत. पण राजपुरोहित श्री वसिष्ठ गुरुदेव यांनी हा संदेश पाठवला आहे आणि आपल्याला त्वरित अयोध्येला विशेष उद्देशासाठी व कार्यासाठी पाचारण केलं आहे."
इतके बोलून, दुताने कमरेच्या शेल्यामधे खोचून ठेवलेला संदेशाचा लखोटा काढून, राजकुमार भरत याच्या हातात दिला आणि तो चार पावलं मागे येऊन उभा राहिला. भरताने हातामधे लखोटा उघडून संदेश वाचला. त्यामधे राजपुरोहित गुरुदेव श्री वसिष्ठ यांनी, काही महत्वाच्या धर्म कार्यासाठी त्वरेने, अतिजलद अयोध्येला माघारी यावे, असा संदेश लिहिला होता. संदेश वाचल्यानंतर, दुताने पुढे होऊन, भरताला सांगितले की,
" अयोध्येतील राजपरिवाराकडून, कैकेय नरेश श्री अश्वपती, राजपुत्र युधाजीत आणि राजपरिवारातील सर्व सदस्यांसाठी ह्या भेटवस्तू पाठवल्या आहेत, त्या भेटवस्तू आपण अयोध्या प्रतिनिधी या नात्याने, राजांना, युवराजांना प्रदान कराव्यात."
भरताने आपले नाना अर्थात आजोबा, राजे श्री अश्वपती यांसह सर्व परिवार सदस्यांना त्वरित तिथे बोलावून घेतले. दुताच्या आगमनाचा वृत्तान्त कथित करून, आपल्याला त्वरेने निघावयास हवे असे म्हणून, राजांकडून त्वरित प्रस्थनाची आज्ञा प्राप्तीची विनंती केली. राजा श्री अश्वपती, प्रसंग आणि संदेश वाचून, तशी अनुमती देऊन, त्वरित निघण्यासाठी, सोबत काही सैन्य आणि अयोध्ये साठी, खास भेटवस्तू, सोन्या चांदीने भरलेली तबकं, पाठवण्याची आज्ञा देतात आणि युधाजीतला तशी व्यवस्था करण्याची सूचना देतात.
थोड्याच अवधीत, राजकुमार भरत, शत्रुघ्न तयार होऊन, आले. रथ सज्ज असतोच. सर्व भेटवस्तू, सोन्याचांदीचे दागिने जडजवाहीर हे सर्व व्यवस्थित लावून, सैन्य सुसज्ज आहे.भरत आपल्या मागील रथात दुताला बसण्यास सांगतो. आपले आजोबा, मामा आणि राजपरिवारातील सर्व ज्येष्ठांना चरण स्पर्श करून, भरताने सर्वांचा निरोप घेतला.
साधारण सात रात्रींचा मुक्काम करत, भरत आणि शत्रुघ्न राजधानी अयोध्येत पोचतात. अयोध्येत नगरीतील मार्गात अनेक जण या दोघांना वंदन न करता, चित्र विचित्र नजरेने पाहतात. अर्थातच बुद्धिमान भरत काहीतरी घडलंय, अश्या शंकेने ग्रस्त असतो. त्याचं शंकास्पद मानसिक स्थितीत राजप्रासादाच्या समीप येऊन पोचला.
श्रीराम जयराम जय जयराम!!
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!!
ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा, ही नम्र विनंती.
©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
११/०६/२०२३
9049353809
9960762179
Comments
Post a Comment