Skip to main content

अध्यात्म विराम १९९

अध्यात्म विराम १९९

लहापणाचा आपण जर सूक्ष्म अभ्यास केला तर, हे लक्षात येईल की, ज्या गोष्टी डोळ्यांना आकर्षित करतात, त्या लगेच मनात ओढ निर्माण करतात. कदाचित मायेच्या खेळाचा हा अवगुण असेल की, चित्ताकर्षक वस्तू, चित्र, व्यक्ती इत्यादींची ओढ आणि आकर्षण डोळ्यावाटे मनाला खेचून, तिथे बांधून ठेवतात. जर हे दृश्य काही सेकंदाचं असेल तर, मन त्या स्थानी पुन्हा पुन्हा जायला उत्सुक होतं आणि तिथेच बांधलं जातं. त्यानंतर त्याच्या प्राप्तीची ओढ मनाला नित्य त्या गोष्टीच्या आकर्षणात ठेवते. 

ही गोष्ट सर्वात प्रथम अगदी लहान मुलांच्या बाबतीत आपण पाहू शकतो की, आकर्षक रंग, वेगळ्या प्रकारची वस्तू, खेळणं इत्यादी लहान मुलांना आकर्षित करतात आणि मग त्यासाठी ते मूल काहीही करू शकतं. त्यानंतर ती गोष्ट सहज प्राप्त झाली,तर आनंद, नाही मिळाली तर रडण्यापासून ते आकांडतांडव करण्यापर्यंत सर्व हतकंडे ते मूल उपयोगात आणतं. त्याला एकदा कळलं की, हे केल्याने आपला कार्यभाग साधतो आणि आपल्याला हवं आहे ते प्राप्त होतं, हा साधा नियम त्याच्या डोक्यात फिट्ट होतो.

नंतर मात्र त्याचे आई वडील या हट्टाने बांधले जातात आणि हा नियम त्यांची अपरिहार्यता होते. त्या मुलाबाबत विचार केला तर, त्याला हव्या असलेल्या सर्व गोष्टी, सहज प्राप्त करण्याची चावी हाती लागते. पण खरतर त्यातील काय उपयोगाचं आहे आणि काय निरुपयोगी आहे, हे त्याला समजत नाही आणि ज्यांना समजतं ते हतबल असतात. अगदी हीच स्थिती ईश्वराकडून आपण मागत असलेल्या गोष्टी, भौतिक गरजा यांबाबत आहे. 

आपण सहज एखादी गोष्टी मागतो, संचीतातील कर्मफल, गुरुकृपा किंवा ईश्वरी कृपा, यामुळे त्या गोष्टी किंवा वस्तू किंवा व्यक्ती आपल्याला प्राप्त होतात सुध्दा. पण आपल्याला त्या गोष्टींची सवय होते. परंतु ज्यावेळी, एखादी गोष्ट मनाविरुद्ध, झाली की आपण लगेच म्हणतो किंवा निदान मनात तसा विचार करतो की, देव निष्ठुर झाला किंवा देव अस्तित्वातच नाही किंवा देवाचं माझ्याकडे लक्ष नाही. 

पण यावेळी दोन गोष्टी आपण विसरतो की, याआधी आपल्याला अनेक गोष्टी पुरवल्या आहेत. जरी त्या गोष्टी आपल्या कर्मानुसार प्राप्त होत असल्या तरीही, आपल्या संचितातील अनिष्ट कर्मांची फळं आपल्या मार्गात त्यावेळी येऊ, न देण्यात किंवा आलेली दूर सारण्यात, ईश्वरी कृपा व गुरुकृपा किती महत्तम कार्य करते, याची आपल्याला कल्पना येत नाही आणि कदाचित येणार नाही. कारण आपली भौतिक अवस्था, त्या मुलासारखी असते. 

ज्याला याची जाणिव त्या वयात कधीही येणार नाही की, एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त करून देण्यासाठी आई वडिलांनी काय काय कष्ट केले असतील किंवा मार्गात येणारी कोणती कोणती संकटं प्रयत्नपूर्वक दूर केली असतील. कदाचित ते, या सर्व गोष्टी कर्तव्य भावनेनेच करत असतील. पण आपण, एखादी गोष्ट न मिळाल्यास, त्याबद्दल वाईट वाटून घेतो. अर्थात यामुळे आई वडिलांच्या भूमिकेत, भावात फरक पडत नाही. 

पण अश्या एखाद्या नकारात्मक निर्णयामुळे, त्यांनी आता पर्यंत घेतलेले कष्ट, आपल्या सुखाची केलेली चिंता काळजी, याचं मोल कमी होतं. याच नियमाने, एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध किंवा प्रारब्धात असल्याप्रमाणे घडली, तर ती आताच घडणं, आपल्या हिताचं आहे, म्हणूनच, ईश्वराने ती घडू दिली किंवा त्या विघ्नांना दूर सरण्याचा प्रयत्न केलाच असणार. कदाचित असही असू शकेल की, आपल्याला बसलेला धक्का किंवा आपल्या पर्यंत आलेला संकटांचा रेटा हा, सौम्य असावा. तो सौम्य व्हावा यासाठी ईश्वर व गुरू यांच्या कृपेने काही प्रयत्न जरूर केले असतील, हा भाव मनात कायम योजावा. 

म्हणून आपण नेहमी स्वतःला त्या मुलाच्या भूमिकेत ठेवून, विचार करावा, म्हणजे ईश्वर आपल्यावर किती कृपादृष्टी ठेवून आहे किंवा किती कृपाळू व करुणामय आहे, यांचा प्रत्यय आणि प्रचिती आपल्याला येईल. विषय गहन आणि चिंतनशील असल्यामुळे, पुढच्या भागात यावर चिंतन करून मग स्मरणाच्या विषयाला पुढे नेऊया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
हे कॉपी राईट नोंदणीकृत लेखन आहे. त्यामुळे हे नावासकट प्रसारित करावे. 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१३/०६/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...